दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ (World Book Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नसून, मानवी संस्कृतीतील ज्ञानाचा वारसा जपणाऱ्या लेखकांचा सन्मान करण्याचा आणि वाचन संस्कृती वाढविण्याचा एक सुंदर सोहळा आहे.
पुस्तके… आपले मूक मित्र
धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेकदा शांतता शोधत असतो. पुस्तक हे अशा वेळी एक उत्तम सोबती ठरते. पुस्तकाच्या पानांत दडलेले शब्द आपल्याला कधी इतिहासाच्या सफरीवर नेतात, तर कधी भविष्यातील विज्ञानाची स्वप्ने दाखवतात. जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचतो, तेव्हा आपण केवळ अक्षरे वाचत नसून एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो. ‘वाचाल तर वाचाल’ – हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे.
हातातील मोबाइल बाजूला ठेवून, पुस्तकाचा तो विशिष्ट सुवास अनुभवत वाचन करण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही. पुस्तके ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे, जी वाटल्याने कधीही कमी होत नाही, उलट ती देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे आयुष्य समृद्ध करतात. वाचन समृद्ध असेल तर, सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज घडतो अन् त्यामुळे संपूर्ण देशाची प्रगती होतो. वाचनामुळे व्यक्तिमत्व विकासही अधिक संपन्न होतो. त्यामुळे विविध विचारवंतांची निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके वाचायलाच हवी.
आपल्याकडे इतिहासकालीन ‘नालंदा’ विद्यापीठाचा किती समृद्ध वारसा होता? परंतु तो जाळला गेला आणि कितीतरी मोठी तसेच ज्ञानाने संपन्न असलेल्या ऐतिहासिक ग्रंथालयाची कधीही भरून न निघणारी हानी झाली. त्या विद्यापीठामध्ये जगभरातील तत्त्वज्ञानाची, वेदकालीन ग्रंथांची, इतिहासाची पुस्तके संग्रहीत करून ठेवली होती, परंतु आक्रांतांच्या विनाशकारी आक्रमणाने ही ग्रंथसंपदा जळून खाक झाली आणि भारतातील एक समृद्ध संस्कृती लोप पावली.
हेही वाचा – अमृताहूनी गोड माझी माय मराठी!
खरं तर, विद्यादानासारखे दान नाही! ज्ञान वाटल्याने ते अजून वाढते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आता एआयच्या (AI) जमान्यात नवीन पिढीला सगळ्या गोष्टी त्वरित हातामध्ये उपलब्ध होत आहेत, परंतु अगदी संक्षिप्त रूपात! एखाद्या विषयाचा मागोवा घ्यायचा असेल तर, त्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, तरच तो विषय समजून घेणं सोपं होतं. परंतु आजकाल सर्वच गोष्टी त्वरित आणि कमी वेळेत (शॅार्टकटमध्ये) हव्या असल्याने लांबलचक लेखन किंवा जास्त पानांची पुस्तके वाचण्याचा लोक कंटाळा करतात, या गोष्टीची खंत वाटते; परंतु त्याचसोबत पुस्तके वाचणारी मंडळीही आपल्या लेखांमधून, कथा, कादंबऱ्यांमधून सामाजिक तसेच वैज्ञानिक विषयांवर, राजकारणावर लिहित असतात, ज्यामुळे सामान्य माणूस देखील आपसूकच त्या पुस्तकांकडे आकर्षित होतो.
ज्ञानाची भूक ही नेहमी मोठीचं असावी! ज्ञानरूपी सागर विशाल आणि अथांग आहे. या सागरातील काही ज्ञानाचे कण आपल्याला वेचता आले तर, आपलेचं वैयक्तिक आयुष्य सुचारू आणि समृद्ध होईल, यात शंका नाही! त्यामुळे पुस्तके वाचत रहा आणि पुस्तकासारखा मित्र नेहमी सोबत ठेवा! पुस्तक स्वप्नरंजन आहे, पुस्तक विरंगुळा आहे, पुस्तक दुःखावर फुंकर घालणारा सखा आहे, पुस्तक अडचणीत मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे, पुस्तक गुरू आहे – जे संकटांवर मात करायला शिकवतं, पुस्तकं हसायला शिकवतं तसंच रडायलाही भाग पाडतं… अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्या जीवनात महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे त्या आपल्या कायम स्मरणात राहतात. त्या मह्त्त्वाच्या गोष्टींमध्ये पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल!
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
आज आपण ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आणि सोशल मीडियाच्या जगात वावरत आहोत. माध्यम कोणतेही असो, मुळातील ‘वाचन’ टिकणे गरजेचे आहे. या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण एक छोटा पण महत्त्वाचा संकल्प करू शकतो :
- दिवसातील किमान 15 ते 20 मिनिटे वाचनासाठी राखून ठेवा.
- आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा मुलांना एखादे आवडीचे पुस्तक आवर्जून भेट द्या.
- आपल्या घरातील कपाटात पुस्तकांसाठी एक छोटा कोपरा (Home Library) तयार करा.
शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की, तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले आणि माहितीची साधने कितीही बदलली, तरी पुस्तकांचे स्थान अढळ आहे. पुस्तक हे केवळ कागदावरचे शाईचे ठसे नसून, ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला सोपवलेले अनुभवांचे संचित आहे. ज्या समाजात वाचन संस्कृती रुजते, तोच समाज वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होतो.
ज्याचे घर पुस्तकांनी सजलेले असते, त्याचे मन विचारांनी श्रीमंत असते!


