आशाताई भोसले निवर्तल्या हे स्वीकारायला, अजूनही मन तयार होत नाहीये. अफाट व्यक्तिमत्व असलेल्या आशाताई एका अढळ दीपस्तंभासारख्या जीवनात आलेल्या अनेक संकटांशी सामना करीत होत्या, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरचे खळीदार हास्य कधीच कमी झाले नव्हते! अतिशय खट्याळ, खोडकर परंतु प्रसंगी धीरगंभीर, निडर, आक्रमक… जे रुचेल, पटेल तेच करणाऱ्या आशाताई म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्त्वाची धनीच म्हणायला हवे! याबाबतीत त्यांचे वैयक्तिक असे स्वतःचे निर्णय असतील तर, ते निभावून नेण्याची क्षमता त्यांच्याकडे निश्चितच होती. खरंतर, लता मंगेशकरसारखी दैवी सुरांची नैसर्गिक देणगी असलेली मोठी बहीण लाभलेल्या आशाताईंना नेहमीच दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु लता दिदींसारख्या तेजस्वी आणि प्रतिभावान गायिकेसमोर तिच्या इतकेच मानसन्मान मिळवून तिच्याबरोबरीने गात राहून संगीत क्षेत्रात त्या काळात टिकून राहणे म्हणजे याचेच अप्रूप आहे.
आशाताईंनी प्रचंड मेहनतीने आपली गाण्याची वेगळी शैली जोपासत, लता नावाच्या संगीत वटवृक्षाच्या बाजूला, आगळ्यावेगळ्या पद्धतीने संगीत क्षेत्रातील एका विशिष्ट उंचीचे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले! जे भल्याभल्यांना जमले नाही, ते आशाताईंनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले. जीवन नेहमी एकाच सरळ रेषेत चालत नाही, अनेक वळणांवर नियतीने आशाताईंची कठोर परीक्षा घेतली, परंतु आशाताईंनी चिकाटी आणि जिद्द कधीच सोडली नाही. येणारा प्रत्येक क्षण तो सुखाचा असो की, दुःखाचा त्यांनी आनंदाने स्वीकारला आणि रडतराऊसारखे रडत न बसता आपल्या अंगीभूत गुणांनी चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं.
हेही वाचा – एक अकेला इस शहर में…
आशाताईंच्या आवाजाची व्याप्ती थक्क करणारी होती. आशाताईंच्या गायकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘व्हर्सेटिलिटी’ (अष्टपैलूत्व)! जगातील कोणत्याही गायिकेला जे जमले नाही, ते आशाताईंनी लीलया करून दाखवले. त्यांच्या आवाजात एका बाजूला खट्याळपणा होता, तर दुसऱ्या बाजूला कमालीचे गांभीर्य होते… जेव्हा त्या ‘बुगडी माझी सांडली गं…’ सारखी लावणी गात, तेव्हा त्यात अस्सल मराठी मातीचा ठसका असायचा. त्याच वेळी आर.डी. बर्मन यांच्या संगीतावर ‘दम मारो दम…’ किंवा ‘पिया तू अब तो आजा…’ म्हणताना त्यांचा आवाज जागतिक स्तरावरील पॉप स्टारसारखा भासायचा. तर, ‘उमराव जान’ मधील ‘दिल चीज क्या है…’ सारखी गझल गाताना त्यांनी जो उर्दू लहेजा आणि नजाकत पेश केली, ती पाहून मोठमोठे गझल गायकही थक्क झाले.
जागतिक कीर्ति मिळवूनही आशाताईंची आपल्या मराठी मातीशी असलेली नाळ कधी तुटली नाही. सुधीर फडके, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी दिलेली अजरामर गाणी ही मराठी संस्कृतीचा दागिना आहेत. ‘ऋतु हिरवा’ मधील ओलावा किंवा ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती…’ सारखे भक्तीरस असलेले गाणे असो आशाताईंनी प्रत्येक मानवी भावनेला सुरांचा साज चढवला.
त्यांनी गायलेले ‘तरूण आहे रात्र अजूनी…’ हे केवळ एक गाणं नाही, तर मराठी भावसंगीताच्या लेण्यातलं एक लखलखतं रत्न आहे. आशाताईंच्या आवाजातील ‘नजाकत’ आणि ‘विरह’ यांचा इतका सुंदर मिलाफ फार क्वचित पाहायला मिळतो. या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर, काही खास गोष्टी मनाला स्पर्शून जातात. या गाण्याची सुरुवातच आशाताईंच्या एका अतिशय मृदू आणि रेशमी स्वराने होते… कवी सुरेश भट यांच्या लेखणीतून उतरलेली ही गझलसदृश कविता जेव्हा आशाताईंच्या गळ्यातून उमटते, तेव्हा ती काळजाचा ठाव घेते. ‘तरूण आहे रात्र अजूनी…’ म्हणताना त्यांच्या आवाजात जो एक प्रकारचा ‘मखमली ओलावा’ आहे, तो ऐकणाऱ्याला एका वेगळ्याच तंद्रीत घेऊन जातो. या गाण्यातील प्रत्येक शब्द आशाताईंनी ज्या पद्धतीने उच्चारला आहे, त्यातून एक अनामिक हुरहूर जाणवते…
या गाण्यातील ओळी गाताना त्यांच्या आवाजात जो संकोच आणि काळजाला हात घालणाऱी जी आर्तता आहे, त्यामुळे हे गाणे पिढ्यानपिढ्या रसिकांच्या ओठांवर रेंगाळत आहे. हे गाणे म्हणजे हृदयनाथांचे संगीत आणि आशाताईंच्या आवाजातील गारुड घातलेले ‘नगिना’आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याला दिलेली चाल अतिशय संथ, पण तितकीच प्रभावी आहे. या गाण्यात वाद्यांचा पसारा कमी असून आशाताईंच्या आवाजाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. गाण्याच्या मधे येणाऱ्या हरकती आणि ताना एखाद्या लहरीसारख्या येतात आणि मनाला शांत करून जातात. त्यांच्या आवाजातला तो ‘खट्याळपणा’ इथे बाजूला सारून, एक ‘प्रौढ’ आणि ‘गंभीर’ छटा दिसते. सुरेश भटांची अप्रतिम स्वररचना म्हणजे स्वर्गीय अनुभूती! एका सामान्य स्त्रीची प्रणयाराधना कशी असू शकेल, हे या गाण्यात स्पष्ट होतं आणि तितक्याच व्याकुळतेने तसेच याचनेने आशाताईंनी या गाण्यातील स्वर आळवले आहे. हा स्वर्गीय भावविष्कार फक्त आशाताईच करू शकतात.
रात्र तरुण आहे, पण मन मात्र जुन्या आठवणीत गुंतलेलं आहे, हा विरोधाभास त्यांनी आपल्या स्वरातून अचूक टिपला आहे. ज्या आशाताई ‘दम मारो दम…’सारखी उडती गाणी गातात, त्याच आशाताई इतक्या शांतपणे आणि संयतपणे ‘तरूण आहे रात्र अजूनी’ गाऊ शकतात, हेच त्यांच्या महानतेचं लक्षण आहे.
‘चांदणे शिंपीत जाशी…’ हे असंच आशाताईंच्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारे, एक तरल मोहिनी असलेले गाणे! आजही पूर्वी इतकेच प्रसन्न वाटते. मराठी भावसंगीताच्या अंबरात अनेक शुक्रतारे चमकले, पण आशा भोसले यांनी ‘चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले…’ या गाण्यातून जे स्वरांचे चांदणे उधळले आहे, त्याला तोड नाही. कवी संजीवनी मराठे यांचे शब्द, हृदयनाथ मंगेशकरांची अलौकिक चाल आणि आशाताईंचा तो नखरेल तरीही तितकाच ऋजू स्वर… हे त्रिवेणी संगम म्हणजे रसिक मनावर घातलेलं एक सुमधूर गारुड आहे. या गाण्याच्या ओळींना अनुसरून आशाताईंच्या स्वरांचा हा प्रवास असा उलगडत जातो. या गाण्यातील स्वरांचा हा ‘चंचल’ नखरा ऐकण्यासारखाचं आहे. गाण्याची सुरुवातच मुळी ‘चालता तू चंचले’ या संबोधनाने होते. आशाताईंनी या गाण्यात ‘चंचले’ हा शब्द ज्या पद्धतीने उच्चारला आहे, त्यातून एका अल्लड, लाजरी आणि वेगाने चालणाऱ्या तरुणीचे हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांच्या आवाजातली ती उपजत ‘लचक’ आणि ‘मुरका’ या गाण्याला एक प्रकारची गती देतो. जणू काही एखादी चपळ हरिणी शब्दांच्या कुरणात बागडते आहे, असा भास होतो.
हेही वाचा – Nostalgia : निगाहें मिलाने को जी चाहता हैं…
आशाताईंनी या गाण्यात शब्दाशब्दांतून उधळलेले ‘चांदणे’ दर्शनास येते. ‘चांदणे शिंपीत जाशी…’ असे म्हणताना आशाताईंच्या आवाजात एक विलक्षण पारदर्शकता जाणवते. चांदणे जसे शीतल असते, तसेच त्यांचे स्वर मनाला शांत करतात. त्यांच्या आवाजातली ती मखमली झाक श्रोत्यांच्या मनावर शीतलतेची फुंकर घालते. गाण्यातील प्रत्येक ‘हरकत’ घेताना त्यांनी जी नजाकत दाखवली आहे, ती खरोखरच आभाळातून चांदण्यांच्या फुले बरसावीत तशीच भासते.
गंधाळल्या वाटा आणि स्वरांचा सुगंध
पाहसी मागे वळूनी, गंध ये गालांतूनी…
या ओळी गाताना आशाताईंच्या आवाजात एक मिश्किलपणा आणि आर्तता यांचा सुंदर मिलाफ होतो. गालातून गंध येणे ही कल्पना जितकी नाजूक आहे, तितक्याच नाजूकपणे त्यांनी यातील भाव टिपले आहेत. मागे वळून पाहण्यातला तो ‘खोडकरपणा’ त्यांनी केवळ आपल्या आवाजातील चढ-उतारांतून जिवंत केला आहे.
आशाताईंच्या आवाजात एक नैसर्गिक ‘धार’ आहे, जी या गाण्यातील ‘हससि तू की वाजवी ही, मन्मथाची बासरी’ या ओळींना वेगळ्या उंचीवर नेते. बासरीचा आवाज जसा कानात घुमत राहतो, तसेच हे गाणे संपल्यानंतरही आशाताईंच्या स्वरलहरी काळजात साठून राहतात. त्यांच्या अष्टपैलू गायकीने या गाण्याला केवळ चाल न उरता एका ‘अनुभवात’ रूपांतरित केले आहे.
आज जरी आशाताई प्रत्यक्ष आपल्यात नसल्या, तरी त्यांनी शिंपडलेले हे स्वरांचे चांदणे कधीही आटणार नाही. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्यांच्या स्वरामुळे ‘बोलका’ झाला आहे. आशाताईंनी आपल्या जादुई आवाजाने केवळ गाणी गायली नाहीत, तर शब्दांना सुगंध दिला आणि चालींना प्राण दिला. गेल्या सात-आठ दशकांपासून भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास या लता आणि आशा दोन नावांभोवतीच फिरत राहिला आहे. लता दिदींचा आवाज म्हणजे शुद्धता, पावित्र्य आणि दैवी सुरांचा संगम होता, तर आशाताईंचा आवाज म्हणजे उत्साह, लवचिकता आणि अष्टपैलूत्वाचा धबधबा होता. कोणतीही नायिका पडद्यावर जेव्हा गाणं गायची, तेव्हा तिचा चेहरा कोणताही असो, पार्श्वभूमीला लता किंवा आशा यांचा आवाज असला की, ते गाणं प्रेक्षकांच्या काळजात घर करतं.
भारतीय चित्रपट संगीतात मानवी भावनांचे जेवढे प्रकार आहेत, ते सर्व या दोन बहिणींनी व्यापले होते. केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत विश्व तर या दोघींच्या ऋणात कायमचे आहे. लता दीदींनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून ते कोळीगीतांपर्यंत सगळं अजरामर केलं. आशाताईंनी लावणीला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि गदिमा-बाबूजींच्या मराठी भावगीतांना व नाट्यगीतांना घरोघरी पोहोचवलं.
थोडक्यात सांगायचे तर… भारतीय चित्रपट संगीत जर एक ‘देह’ असेल, तर लता दिदी त्याचा ‘आत्मा’ होत्या आणि आशाताई त्या देहातील ‘चैतन्य’ किंवा ‘प्राणवायू’ होत्या. या दोघींशिवाय भारतीय संगीताचा विचार करणे म्हणजे फुलाशिवाय सुगंधाचा विचार करण्यासारखे आहे. एका बहिणीने सुरांना ‘अभिजातता’ दिली, तर दुसऱ्या बहिणीने सुरांना ‘अफाट विस्तार’ दिला. या दोन नावांच्या अनुपस्थितीत भारतीय संगीताचा प्रवास इतका गौरवशाली आणि समृद्ध कधीच झाला नसता.
आशाताई ‘फुल ऑफ लाइफ’ होत्या. त्यांच्या स्वभावातला हाच मोकळेपणा, खट्याळपणा आणि हसणं त्यांच्या गाण्यात उतरलं, म्हणूनच त्यांचं गाणं आपल्याला कधीही जुनं वाटत नाही. त्यांचं जाणं म्हणजे त्या अवखळ स्वरांचा आणि चैतन्याचा पडदा पडल्यासारखं आहे. आज या सुवर्णयुगाचा अंत झाला असला, तरी त्यांनी मागे ठेवलेला सुरांचा वारसा भारतीय संस्कृतीसाठी अढळ आहे. तो अद्वितीय स्वरप्रवाह अजूनही निर्झरासारखा अखंड खळखळून वाहत राहणार आहे!


