माधवी जोशी माहुलकर
कोणाच्या रंगरुपावर जाऊ नये, कारण ते काही कोणाच्या हातात नसतं! व्यक्तीमधले गुणविशेष पाहावे, चांगले गुण असतील तर ते निश्चितच दखलपात्र ठरतात. माझ्याकरिता माझ्या घरकाम करणाऱ्या बायका महत्त्वाच्या व्यक्ती आहेत! गेल्या 14 वर्षांपासून माझ्या घरी एक बाई कामाला आहे, त्यामुळे ती आता आमच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी आहे! खरंतर, पहिल्यांदा ती जेव्हा माझ्या घरी कामाला आली, तेव्हा तिला महिन्यावारी घरकामाला बोलावण्याचे माझे काही निश्चित नव्हते. तिला मी केवळ डस्टिंगकरिता बोलावले होते. डस्टिंग करायचे काम म्हणजे काय असतं, हे देखील तिला माहीत नव्हतं! उलट तिला ते काम शिकवताना माझीच अवस्था “आ बैल (नव्हे गाय) मुझे मार…” अशी झाली होती. परंतु नाईलाज असल्याने तिला ते काम देऊन डस्टिंग शिकवले आणि त्यानंतर ती प्रत्येक कामात इतकी तरबेज झाली की, तिचे काम पाहून माझ्या शेजारीपाजारच्यांकडून तिच्याकडे कामाकरिता विचारणा होऊ लागली आणि ते पाहून मला तिचे किती कौतुक करू नि किती नको, अशी झाली… म्हणजे थोडक्यात “ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इन्कार मगर इकरार, तुम्ही से कर बैठे…!” असा प्रकार होता.
पण ती माझ्या घरात दाखल झाली ती कायमचीच! आता ति माझ्या घरची विश्वस्त सदस्य झाली आहे. चौदा वर्षांच्या कालावधीमुळे आता माझ्या कुटुंबाचा तिच्याशी एक भावनिक संबंध तयार झाले आहेत. ती आता माझ्या घरी नेहमीकरिता काम करणार हे नक्की! तिने मला शब्दच तसा दिला आहे… तिने देखील आम्हाला तसाच जीव लावला आहे. त्याच विंश्वासार्हतेमुळे आणि प्रेमामुळे माझ्या घराची सर्व दारोमदार तिच्यावर सोडून मी निर्धास्त असते!
तर सांगायचा मुद्दा असा आहे की, या घऱकाम करणाऱ्या महिला या सर्व गृहिणींच्या जीवाभावाच्या असतात. त्यांनी जर एक-दोन सुट्टीवर जायचे म्हटले तर या बायकांचे मन सारखे त्या बाई, ताई, मावशी यांना उद्देशून म्हणत असते, “बेकरार कर के हमें यूं न जाईये, आप को हमारी कसम लौट आईये…” तरी जर तिने हट्ट करून सुट्टी घेतलीच तर, ती लगेच परत कधी येणार? या विचाराने गृहिणींचा जीव कासाविस होतो. म्हणूनच या गृहिणींच्या मनात कालवाकालव सुरू होऊन परत एकदा तिला त्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. ती गृहिणी तिची मनधरणी करत म्हणते कशी, “रुक जा ओ जानेवाली रुक जा…” इतके करूनही अनुकूल असे घडले नाही आणि ती सुट्टीवर गेलीच तर दुसऱ्या दिवशी तो कामाचा पसारा आणि स्वयंपाकघराचा रगाडा पाहून भांडी घासताना, स्वयंपाक करताना, कपडे धुतान, घरमालकीण बाईंची करूण अवस्था होते आणि जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी अशी सर्वत्र फक्त तिची लाडकी कामवाली बाई दिसायला लागते. तिची सारखी आठवण येऊन नकळत मालकीण बाईंच्या तोंडातून हेच शब्द बाहेर पडतात, “वो जब याद आये, बहुत याद आये…” अशा वेळेस ती कुठुन तरी देवदूत बनून यावी, असचं तिला वाटतं.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
कामवाल्या बाईची सुट्टी एक दिवसावरून वाढून जर दोन-तीन दिवस लांबली तर, मग घरातील कामं करून करून शिणलेला जीव तिला शोधत, तिचा मागोवा घेत सारखं हेच रडगाणं आळवतो – “तू कहां ये बता… माने ना मेरा दिल दिवाना…” वारंवार तिला फोन करुनही तिने जर काही रीप्लाय केला नाही तर, मग चिड येऊन त्या गृहिणीच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडत, “रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आऽऽऽ आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आऽऽऽ”
खरा कहर होतो, जेव्हा कामवाल्या बाईच्या काही कारणास्तव सात-आठ दिवस सलग सुट्ट्या झाल्या की…! त्या दिवसांत तर असं वाटतं की, कोणी पाहुणे वगैरे घरी यायला नको, हृदयाची धडधड त्या सात-आठ दिवसांमधे इतकी वाढलेली असते की, ते सारखं त्या कामवाल्या मावशीला आठवून म्हणत असत, “दिल तडप तडप के कह रहा है, आ भी जा, तू हम से आंख ना चुरा, तुझे कसम है आ भी जा…”
सात-आठ दिवसांनी तिची सुट्टी संपून कामावर येत असल्याचा तिचा फोन आला की, हृदयाच्या सतारीचे तार झंकारायला लागतात, तिला सुट्टीवरून कामावर परत आल्यावर पहिल्याच दिवशी जास्त काम पुरायला नको म्हणून थोडंसं काम आधी उरकून घेतलं जातं… चेहऱ्यावर त्रासिक भाव न ठेवता स्मितहास्य विलसत ठेवण्याची गरज असते. पहिल्याच दिवशी तिच्यावर रागाने बरसायचं नसतं, ती घरात आल्यावर तिची आस्थेने चौकशी करून गरम गरम आलं घातलेला चहाचा कप समोर करायचा, अशा विविध नोंदी ती घरमालकीण लक्षात ठेवते . तिच्या घरवापसीमुळे अत्यानंदाने मालकीण बाईंचं मन थुई थुई नाचत असतं. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतो. त्या दिवशी तर त्या घर मालकीणीला तिच्याकरिता एकच गाणं आठवत, “आईये मेहरबां.. बैठीये जानेजां…”
सुट्टी संपवून कामावर परतलेल्या ताई / बाई / मावशींचा मग दोन-चार दिवसांनी हळूवारपणे समाचार घ्यायला सुरुवात होते. तेव्हाची घर मालकीणीची आणि त्या कामवाल्या बाईची परिस्थिती, “एक सवाल मैं करू… एक सवाल तुम करो…” अशी असते. या सवाल जवाबात मग दोन दिवस कसे निघून जातात, ते त्या दोघींनाही कळत नाही. त्यांची सुख-दुःख आपापसात वाटली जाऊन दोघींचा अबोला मिटतो खरा आणि पुढील काही दिवस सगळं सुरळीत राहतं… अगदी आनंदी आनंद असतो की, परत तिची पुढील महिन्याची सुट्टी या आनंदावर विरजण घालते… ते ऐकून परत मालकीण बाईंच्या कपाळावर आठ्या पडतात, चेहरा त्रासिक होतो! परत तिच्या मनाची अवस्था, “टिक टिक वाजते डोक्यात! धडधड वाढते उरात!” अशी होते. तिची सुट्टी संपून ती कामावर परत येईपर्यंत, त्या घर मालकीणीची नजर प्रत्येक वेळेस दरवाजावर टिकून असते, सकाळी तिच्या कामाच्या वेळी डोळे घडाळ्याच्या काट्याकडे वटारलेले असतात आणि कान सारखा डोअर बेलच्या आवाजाचा कानोसा घेत असतात. फरशीवर पडलेले डाग, कचरा, सिंकमध्ये उलटे-सुलटे उताणे पडलेली भांडी, कपबशा पाहून त्या गृहिणी व्याकुळ होतात.
हेही वाचा – सावळ्याची सावली!
खरंतर, ती कामवाली बाईच एक अशी व्यक्ती आहे, जिला त्या गृहिणींचे मन समजत असतं. घरामध्ये घरमालकीण एकटी असताना तीच एक अशी असते की, जी काही दुखलं खुपलं तर तिला मदत करत असते, “सर जो तेरा चकराए, या दिल डूबा जाए, आ जा प्यारे पास हमारे काहे घबराए…” तेल मालीश करून देईन” असे म्हणते. “ताई, तुम्ही जरा आराम करा बरं! मी सगळं व्यवस्थित आवरून घेते,” असा दिलासा देणारी तीच तिची जीवाभावाची कामवाली बाई असते. अपार्टमेंटमधल्या इतर बायकांचे किस्से सांगून आपल्या मालकीणबाईचे मन रिझविणारी तीच असते. ही कामवाली बाई म्हणजे प्रत्येक गृहिणीची सखी असते, जी प्रसंगी तिच्याकरिता तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी तिची “व्हॅलेनटाइन” असते.
खरंच, घरमालकीण आणि कामवाल्या बायकांचं नातंच “तुझं माझं जमेना अन् तुझ्यवाचून करमेना!” असं विचित्र आहे! दर महिन्याला घराघरातील गृहिणी आणि कामवाल्या बायकांचा हा रुसव्या-फुगव्याचा खेळ पाहून वैतागलेले नवरे मात्र दरवेळेस ही बदलती परिस्थिती पाहून अचंबित होत राहतात. आपल्या बायकोचे आणि कामवाल्या बाईचे अनोखं नातं त्यांच्या आकलनशक्तीच्या बाहेर असतं. यावर ते सर्व नवरे एकाच विचाराने ग्रासलेले दिसतात की, “हे असं कसं? स्त्री ऐसे भी एक दुसरे की व्हॅलेन्टाईन्स हो सकती है?” आश्चर्यचकित होऊन मनातल्या मनात ते म्हणत देखील असतील,”अजीब दास्तां हैं ये, कहां शुरू कहां खतम, ये मंजिले है कौनसी… ना वो समझ सके ना हम…”


