वेद बर्वे
भारताच्या विविध प्रांतामध्ये साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम! नऊ दिवस भक्तगण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून, तिच्या शक्तीचा सन्मान करतात. या काळात देशभरातील देवीच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, गोंधळ, जागरण आणि मिरवणुकांच्या माध्यमातून भक्तिरस ओसंडून वाहात असतो. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परळाखेमुंडी गावात, देवीचे एक असे मंदिर आहे जे या सर्व परंपरांना छेद देते. सोबतच, या मंदिराशी जोडलेली अनेक रहस्ये आपल्याला अचंबित करतात.
या मंदिराचे नाव आहे दांडूमारम्मा मंदिर आहे. स्थानिकांमध्ये ‘दांडू माई’ म्हणून इथली देवी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर वर्षातून फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठीच उघडते. उर्वरित ३५६ दिवस या देवळाचे दरवाजे बंदच राहतात. कित्येक वर्षांपासूनच्या इथल्या मान्यतेनुसार, देवी वर्षभर ‘विश्रांती’ घेते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांत असूरांच्या विनाशासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी गर्भगृहातून बाहेर येते. इथल्या पारंपरिक मान्यतेनुसार, रात्रीच्या वेळी दांडूमारम्मा देवी एका लहान मुलीच्या रूपात गावात भ्रमण करते आणि आपल्या भक्तांचे रक्षण करते.
स्थानिक इतिहासकार, संशोधक आणि वृत्तपत्रांच्या दाखल्यांनुसार, दांडूमारम्मा देवीचा मूळ संबंध परलाखेमुंडी (Paralakhemundi) राजघराण्याशी आहे. कथांनुसार, त्या भागातील राजांनी युद्ध करण्यापूर्वी देवीची मूर्ती त्यांच्या राजवाड्यात ठेवल्याचा उल्लेख आहे. वर्ष 1768 मध्ये परलाखेमुंडीच्या राजाचा, ज्याचे नाव जगन्नाथ गजपती नारायण देव होते, त्या काळात ब्रिटिश सैन्याशी संघर्ष झाला. युद्धानंतर ही मूर्ती राजवाडीहून दांडूमाला स्ट्रीट या भागात हलवली गेली, जिथे बऱ्यापैकी लोकवस्ती होती. त्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना या देवीची पूजा नियमीतपणे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
‘दांडूमारम्मा’ किंवा ‘दांडू मा’ या स्थानिक भाषेतील नावानुसार, ही देवी दुर्गेचे रूप मानले जाते. काही मान्यतांनुसार, दांडूमारम्मा म्हणजे गैरवर्तन करणाऱ्यांना, गैरवृत्ती असलेल्या लोकांना दंड करणारी देवी!
हेही वाचा – भगवान नरसिंहाना शांत करणारा, ‘शरभ’ अवतार…
या मंदिराशी संबंधित आणखी एक रहस्यमय गोष्ट म्हणजे इथला नारळाचा चमत्कार. नवरात्री पूर्ण झाल्यानंतर दशमीच्या रात्री गर्भगृहातील एका घट्टममध्ये (भांड्यात) एक नारळ ठेवला जातो आणि मंदिर बंद केले जाते. त्यानंतर थेट पुढच्या वर्षी जेव्हा नवरात्रीत मंदिर पुन्हा उघडले जाते, तेव्हा तो नारळ पूर्णपणे ताजा असतो. हा प्रसाद तिथले लोक मोठ्या भक्तीभावाने स्वीकारतात, कारण त्यांना वाटते की, हा देवीच्या शक्तीचे आणि चमत्काराचे प्रतीक आहे.
हे मंदिर फक्त नवरात्रीच्या काळात उघडले जात असल्यामुळे, पहिल्या दिवशी दरवाजे उघडताच हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी आणि इथले चमत्कार पाहण्यासाठी येतात. भक्तांचा दावा आहे की, याकाळात मंदिर परिसरात खास दिव्य ऊर्जा जाणवते. नवरात्रीच्या काळात इथे आलेल्या लोकांना आयुष्यातील अडचणी कमी होतात, रोग-आजार बरे होतात आणि मनःशांती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सलग नऊ दिवस देवीला विविध नैवेद्य अर्पण केले जातात, संपूर्ण गावात देवीसाठी आरती, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. अष्टमी आणि नवमीला देवीची विशेष पूजा केली जाते, तर दशमीच्या दिवशी, जवळच्याच नीलमणी दुर्गा मंदिरात प्राण्याचा बळी दिला जातो आणि त्याचा प्रसाद दांडूमारम्मा देवीला अर्पण केला जातो.
हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं
वर्षातून फक्त नऊ दिवस देवीच्या दर्शनाची संधी मिळणे, हे भक्तांसाठी आयुष्यभराचे पुण्य मानले जाते. त्यामुळेच दांडूमारम्मा मंदिर नवरात्रीच्या काळात एक विलक्षण आध्यात्मिक केंद्र बनते. भक्तांसाठी ही केवळ एक पूजा नसते, तर देवीच्या चमत्काराचा आणि रक्षणकर्ती स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक अनमोल संधी असते.


