Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeवास्तू आणि वेधPanchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 30 सप्टेंबर 2025

Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 30 सप्टेंबर 2025

दर्शन कुलकर्णी

  • आज, दिनांक : 30 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार
  • भारतीय सौर : 08 आश्विन शके 1947; तिथि : अष्टमी 18:05; नक्षत्र : पूर्वाषाढा अहोरात्र
  • योग : शोभन 25:01; करण : बालव अहोरात्र
  • सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:28
  • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
  • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास

सरस्वतीपूजन

वेद कन्सल्टन्सी / 9987433660


आजचे राशीभविष्य

मेष – आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला असेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. काही जातकांना दूरचा प्रवास संभवतो. त्यामुळे दगदग होईल, पण त्याचा फायदाही होईल. जवळच्या मित्राच्या मदतीने काही जातकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ – आरोग्यासंदर्भातील दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता बारकाईने अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यवसायात बऱ्यापैकी नफा होऊ शकतो.

मिथुन – आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. तब्येतीच्या दृष्टीने खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. एखाद्याला दिलेली उधार रक्कम परत मिळू शकते. संध्याकाळी अचानक पाहुणे घरी येऊ शकतात. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कर्क – नवीन प्रकल्पांसाठी आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. दुसऱ्याकडील थकबाकी परत मिळवाल. पण त्याचबरोबर बोलताना नियंत्रण ठेवा, अन्यथा संबंध दुरावू शकतात. कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे.

सिंह – व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी कुणी जवळची व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस आहे. व्यग्र दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घ्याल.

हेही वाचा – छोटी सी बात!

कन्या – शारीरिक सुदृढतेसह मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज केलेली गुंतवणूक आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे.

तुळ – या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. कार्यालयात नवीन जबाबदारी देण्यात येईल, त्यामुळे कामाचा ताण वाढेल.

वृश्चिक – या राशीचे जे जातक दुधाच्या व्यवसायाशी जोडलेले आहे, त्यांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम सहकार्य मिळाल्याने कार्यालयीन काम फत्ते होईल. आजच्या दिवशी भविष्यासाठी चांगले प्लॅन बनवू शकतात. कुटुंबात शब्दाने शब्द वाढणार नाही, याची काळजी घ्या.

धनु – आपला लहरी स्वभाव वैवाहिक आयुष्यासाठी हानीकारक ठरणार नाही, याची दक्षता घ्या. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आज खर्च वाढल्याने आर्थिक ताण येऊ शकतो. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडण्याबरोबरच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल.

मकर – दातदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल, त्यासाठी ताबडतोब वैद्याकीय सल्ला घेणे योग्य. क्वचित भेटीगाठी होत असलेल्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस आहे. व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडविण्यासाठी आपले कौशल्य वापरा. कुटुंबीयांसमवेत वाद होतील, पण दिवसाच्या अखेरीस सर्वकाही सुरळीत होईल.

कुंभ – अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. पण त्याचबरोबर आरोग्याबद्दल, विशेषत: रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नवे तंत्रज्ञान शिकून आपले कौशल्य वाढविल्यास त्याचा फायदा होईल. घरातील कामे पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणींना थोडासा निवांतपणा मिळेल.

हेही वाचा – इतिहासाशी जडले नाते…

मीन – नेहमीपेक्षा आज उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. मात्र तरीही, अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. कुणाकडून उधार घेतलेले आहे, त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, त्यामुळे आर्थिक भार वाढेल. घरातील एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.


दिनविशेष

प्रतिभावान दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी

टीम अवांतर

सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1922 रोजी कलकत्त्यात (आता कोलकाता) झाला. कलकत्ता महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर तिथेच त्यांनी काही दिवस गणित आणि विज्ञान विषयाचे अध्यापनही केले. छायाचित्रणकला शिकण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्यांनी बी. एन. सरकार यांच्या न्यू थिएटर कंपनीच्या प्रोसेसिंग लॅबमध्ये नोकरी केली. तिथेच प्रख्यात सिनेसंकलक सुबोध मित्तर यांनी त्यांना सिनेमाच्या संकलनकलेची (एडिटिंग) ओळख करून दिली. त्यानंतर 1951 साली हिंदी चित्रपट क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुखर्जी सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याबरोबर मुंबईला आले. मुंबईत बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या माँ, परिणीता, बिराज बहु, देवदास आणि मधुमती या चित्रपटांचे त्यांनी संकलन केले. मधुमती या चित्रपटासाठी उत्कृष्ट संकलकाचे फिल्मफेअर पारितोषिकही त्यांनी मिळवले. पण त्यानंतर दिग्दर्शन करण्याची ओढ त्यांना लागली होती. त्याचवेळी ख्यातनाम अभिनेते दिलीप कुमार यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. हृषिकेश मुखर्जींनी 1957 साली त्यांचा पहिला चित्रपट मुसाफिर दिग्दर्शित केला. या चित्रपटाला राष्ट्रीय पातळीवरील प्रशस्तिपत्रक मिळाले आणि त्यांची फिल्म इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण झाली. पुढे 1959 साली त्यांनी दिग्दर्शित केलेला राज कपूर अभिनित अनाडी हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ऋषीदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृषिकेश मुखर्जी यांनी 40 वर्षांच्या कारकिर्दीत 42 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातील अनुराधा (1960), असली नकली (1962), अनुपमा (1966), आशीर्वाद (1968), सत्यकाम (1969), गुड्डी (1971), आनंद (1971), बावर्ची (1972), अभिमान (1973), नमकहराम (1973), मिली (1975), चुपके चुपके (1975), आलाप (1977), गोलमाल (1979), खुबसूरत (1980), बेमीसाल (1982), नरमगरम (1981), रंगबिरंगी (1983) हे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. 1998 साली प्रदर्शित झालेला ‘झूठ बोले कौवा काटे’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता. त्यांच्या अनुराधा या चित्रपटाला 1961 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन बेअर’ पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते. या चार दशकांच्या कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, अशोककुमार, धर्मेंद्र, बलराज सहानी, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, शर्मिला टागोर, जया भादुरी, रेखा अशा मातब्बर कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांत अभिनय केला आहे. मुखर्जींनी दूरदर्शनसाठी हम हिंदुस्थानी, तलाश, धुपछाव, रिश्ते, उजाले की ओर, अगर ऐसा हो तो या मालिकाही दिग्दर्शित केल्या आहेत. बिमल रॉय यांच्या तालमीत तयार झालेल्या हृषिकेश मुखर्जींचे चित्रपट मध्यमवर्गीय व्यक्तींच्या जीवनातील सामान्य विषयांना महत्त्व देतात. त्यांनी कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचा योग्य मिलाफ असलेल्या अनेक मनोरंजक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हृषिकेश मुखर्जींना त्यांच्या कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट संकलन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी अशी 9 फिल्मफेअर पारितोषिके आणि 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 1999 साली भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा समजला जाणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 2001 साली ‘एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार’ ही त्यांना मिळाला. त्याचवर्षी भारत सरकारचा ‘पद्मविभूषण पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले. आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत ते मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या बंगल्यात एकटेच रहात होते. तिथेच 27 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचे निधन झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!