दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 22 मार्च 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 01 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्थी 21:17; नक्षत्र : भरणी 22:42;
- योग : वैधृति 15:41; करण : वणिज 10:37;
- सूर्य : मीन; चंद्र : मेष 28:13; सूर्योदय : 06:43; सूर्यास्त : 18:49;
- पक्ष : शुक्ल; मास : चैत्र; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
विनायक चतुर्थी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा
दिनविशेष
मराठी नाटककार, कथाकार, गीतकार मधुसूदन कालेलकर
टीम अवांतर
मराठी नाटककार, कथाकार, गीतकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म 22 मार्च 1924 रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय शिक्षण वेंगुर्ल्यात झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीला गिरगावात राहात असताना गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी पहिले नाटक लिहिले आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या लेखनात त्यांनी प्रामुख्याने कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे विविध प्रकारचे विषय हाताळले. हिंदी-मराठी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट, नाटक आणि गीत अशा विविध माध्यमांतून सकस साहित्यलेखन त्यांनी केले.
‘अखेर जमलं’ चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट गाजला. राजा नेने याच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. एका मागोमाग एक असे त्यांचे 75हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘अनोळखी’, ‘गुपचूप गुपचूप’ हे त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट म्हणता येतील. तर, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ चित्रपटातील ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई…’ हे अंगाई गीत तुफान लोकप्रिय झाले आणि या गीतासाठी कालेलकर यांना सर्वोत्कृष्ट गीत लेखनाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
याशिवाय, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘ही वाट दूर जाते’, ‘अबोल झालीस का?’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘ चांदणे शिंपीत जा’, ‘या घर आपलंच आहे’, ‘नाथ हा माझा’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘हे फुल चंदनाचे’, ‘अमृतवेल’ आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ‘ही श्रींची इच्छा’ ही नाटकं रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतली. ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ आणि ‘शिकार’ या त्यांच्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखविली. ‘बात एक रात की’ ,‘ब्लफ मास्टर’, ‘झुमरू’, ‘फरार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘अखियों के झरोखों से’, ‘गीत गाता चल’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपटांची नावे घेता येतील. आपल्या कारकिर्दीत मधुसूदन कालेलकर यांनी एकूण 29 नाटके आणि मराठी तसेच हिंदी मिळून 111 चित्रपटांसाठी लिखाण केले. 70हून जास्त त्यांनी चित्रपट गीते लिहिली. अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.
त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम कथा, पटकथा आणि संवाद यासाठी एकूण नऊ वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला आहे. या प्रतिभावंत लेखकाचे 17 डिसेंबर 1985 रोजी निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


