दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 18 जानेवारी 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 28 पौष शके 1947; तिथि : अमावस्या 25:21; नक्षत्र : पूर्वाषाढा 10:13
- योग : हर्षण 21:10; करण : चतुष्पाद 12:45
- सूर्य : मकर; चंद्र : धनु 16:40; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:21
- पक्ष : कृष्ण; ऋतू : हेमंत; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
दर्शअमावस्या
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – दिवाळी पहाट अन् फोन कॉल…
दिनविशेष
प्रसिद्ध गायक कुंदनलाल सेहगल
टीम अवांतर
प्रसिद्ध गायक आणि चित्रपट अभिनेते कुंदनलाल सेहगल यांचा जन्म जम्मू येथे एका मध्यमवर्गीय सुशिक्षित पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. बालपणी त्यांची आई त्यांना धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयातच कुंदनलाल यांच्यावर झाले.
गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सेहगल यांना सलमान युसूफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांना घेता आले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे कामही त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. 1931 साली कलकत्त्यात असताना सेहगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सेहगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा आणि जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. नंतर पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर. सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायलेली भजने लोकप्रिय ठरली.
दिग्दर्शक पी. सी. बरुआंच्या देवदास या चित्रपटातील सेहगल यांची नायकाची भूमिका अत्यंत गाजली आणि त्यांच्या गाण्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन में’ आणि ‘दुख के अब दिन बीतत नहीं’ यासारखी त्यांची गाणी प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करू क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) या गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली. सैगल डिसेंबर 1941मध्ये मुंबईत आले आणि ‘रणजित मुव्हिटोन’ या चित्रपटनिर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास व तानसेन हे चित्रपट खूप गाजले. तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शुद्ध कल्याण रागात त्यांनी गायलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ आणि ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय झाली. त्यानंतर त्यांचा शाहजहाँ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. 1947 सालचा परवाना हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला.
सेहगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझल, भजन, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने आणि सफाईने गायली. गझल तसेच भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार होते. मुकेश, मोहम्मद रफी, किशोरकुमार या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. आपल्या 15 वर्षांच्या कारकीर्दीत एकूण 36 चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी 28 हिंदी वा उर्दू, 7 बंगाली व 1 तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण 185 गाणी गायिली. त्यातील 142 चित्रपटगीते आणि ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इत्यादी) गीते होती.
मद्यपानाच्या अतिरेकामुळे जलंदर येथे वयाच्या 43व्या वर्षी 18 जानेवारी 1947 रोजी त्यांचे निधन झाले. बोलपटांच्या प्रारंभकाळात स्वत:चे अव्वल स्थान अल्पावधीत सिद्ध करणारे आणि आपल्या गाण्यांचा प्रभाव प्रदीर्घकाळ टिकवून ठेवणारे कुंदनलाल सेहगल यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टारही मानले जाते.


