दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 02 जून 2025
वार : सोमवार
तिथि : सप्तमी 20:34
नक्षत्र : मघा 22:54
योग : व्याघात 08:19
करण : गरज 8:10
सूर्य : वृषभ
चंद्र : सिंह
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:12
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
नाटककार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील
प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक शिक्षण तर, स. प. महाविद्यालयातून उच्च शिक्षण झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. ही पदवी संपादन केली. 1941-42च्या सुमारास बोकील यांची ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही कथा मास्टर विनायक यांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकील यांना तत्काळ बोलावून घेतले. त्या कथेचे संवादलेखन त्यांच्याकडून करून घेतले. ‘पहिली मंगळागौर’ हा तो चित्रपट. बाबूराव पै यांच्या ‘गळ्याची शपथ’ या चित्रपटाची कथा-पटकथा बोकील यांचीच होती. 1950मधील मकरंद भावे यांच्या ‘जरा जपून’ या विनोदी चित्रपटाचे संवादलेखन बोकील यांनी केले होते. बोकील यांच्या गाजलेल्या ‘गाठीभेटी’ या कादंबरीवरून दत्ता धर्माधिकारी यांनी ‘बाळा जो जो रे’ (1951) हा चित्रपट तयार केला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय त्यांनी ‘यात्रा’, ‘जीवन ऐसे नाव’, ‘सप्तपदी’, ‘वाट चुकलेले नवरे’ हे चित्रपट लिहिले. 22 एप्रिल 1973 रोजी त्यांचे निधन झाले.
ग्रेट शोमॅन राज कपूर
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, संकलक आणि दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील (सध्याच्या पाकिस्तानमधील) पेशावर येथे झाला. त्यांचे मूळ नाव रणबीरराज कपूर असे होते; पण त्यांनी सिनेसृष्टीसाठी नावातील रणबीर वगळून फक्त ‘राज कपूर’ हे नाव धारण केले. 1948 साली वयाच्या चोवीसाव्या वर्षी राज कपूर यांनी चेंबूर येथे भव्य आणि सर्व सोयींनी सुसज्ज असा आर. के. स्टुडिओ उभारला. त्याचबरोबर आर. के. फिल्म्स या निर्मितीसंस्थेचीही स्थापना केली. त्यांचा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आग हा पहिला चित्रपट. राज कपूर अभिनित-दिग्दर्शित संगम (1964) हा आर. के. फिल्म्सचा पहिला रंगीत चित्रपट होता. शिवाय, हा दोन मध्यांतर असलेला भारतातील पहिला चित्रपट आहे. आर के फिल्मस् च्या बॅनरखाली त्यांनी एकापेक्षा एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती केली. राज कपूर यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कार, विविध प्रकारांतील अकरा फिल्मफेअर पुरस्कार आणि तब्बल एकवीस वेळा नामांकने मिळाली होती. 1971 साली भारत सरकारने राज कपूर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. तर, 1987मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला. 2 जून 1988 रोजी हा ग्रेट शोमॅन काळाच्या पडद्याआड गेला.