दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 01 एप्रिल 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 11 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्दशी 07:06; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 16:17;
- योग : वृद्धि 14:50; करण : विष्टी 19:20;
- सूर्य : मीन; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:34; सूर्यास्त : 18:51;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
हनुमान जन्मोत्सव उपवास
पौर्णिमा प्रारंभ सकाळी 07:06
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समाजवादी नेते एस एम जोशी
टीम अवांतर
एक निष्ठावंत समाजवादी नेते आणि कामगार पुढारी श्रीधर महादेव जोशी यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1904 रोजी जुन्नर (पुणे) येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. ‘एसएम’ या नावाने ते सुपरिचित आहेत. 1929 साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बीए झाले तर, 1934मध्ये एलएलबी झाले. विद्यार्थिदशेतच महात्मा गांधींच्या चळवळीकडे ते आकर्षित झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना करून मुंबईला यूथ लीगची परिषद भरविली. हरिजनांना पुण्यातील पर्वतीवरील मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. तत्पूर्वी, त्यांनी सायमन आयोगाविरुद्ध मोर्चा काढला होता. ते मिठाचा सत्याग्रहात सहभागी झाले, म्हणून त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली.
या काळात त्यांनी मार्क्सचे विचार आणि समाजवाद यांचा अभ्यास केला आणि ते समाजवादी बनले. मानवेंद्रनाथ रॉय यांना मुक्त करावे, म्हणून त्यांनी वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. तत्पूर्वी, त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने काँग्रेस सोशॅलिस्ट पक्ष स्थापन केला. त्यांनी काँग्रेस मंत्रिमंडळ असताना शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि छोडो भारत आंदोलनाच्या वेळी ते भूमिगत झाले, पण नंतर त्यांना अटक झाली.
हेही वाचा – ही वाट एकटीची…
राष्ट्र सेवा दलाच्या संस्थापकांपैकी ते एक होत. 1940-41 आणि 1947-51 या काळात ते त्याचे दलप्रमुख होते. 1948मध्ये ते महाराष्ट्राच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. साने गुरूजी सेवापथकात त्यांनी भाग घेतला आणि साधना हे साप्ताहिक चालावे, म्हणून विश्वस्त समिती स्थापन करून हे साप्ताहिक पुढे चालू ठेवले.
भाववाढ, भूदान वगैरे चळवळींत त्यांनी भाग घेतला. तसेच, ते गोवा विमोचन समिती आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांत आघाडीवर होते. 1956-61 या काळात संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते सरचिटणीस होते. 1957मध्ये ते मुंबई विधानसभेवर निवडून गेले. पुढे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनचे चिटणीस, ऑल इंडिया स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र परिवहन कामगार सभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 1967 साली लोकसभेवर ते निवडून गेले.
त्यांचा उर्मी हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच आस्पेक्ट्स ऑफ सोशॅलिस्ट पॉलिसी हा समाजवादी विचारांवर त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांच्यावर दोन गौरवग्रंथ प्रसिद्ध झाले असून त्यांची व्याख्याने, पत्रे व इतर स्फुटलेख एस्. एम्. जोशी : व्यक्ति, वाणी, लेखणी या नावाने प्रसिद्ध झाले आहेत. एक साधे, प्रामाणिक आणि तळमळीचे कार्यकर्ते म्हणून एसेम प्रसिद्ध असून विविध प्रकारच्या अन्यायांविरुद्ध परखडपणे लढा देण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले. 1 एप्रिल 1989 रोजी पहाटे एसएम जोशी यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – महत्त्वाची कामे कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल, असे वाटत असेल तर, ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. परिस्थितीचे भान ठेवून निर्णय घ्या. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा जोडीदाराशी वाद होऊ शकतो. ज्येष्ठांनी तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. त्यांचे पथ्यपाणी सांभाळा.
वृषभ – मोठा आणि महत्त्वाचा व्यवहार करताना, आत्मसात केलेले ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच धार देईल. चांगला धनलाभ होईल, त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल.
मिथुन – वाद, संघर्ष टाळा, अन्यथा अडचणी वाढत जातील. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा योग्य बचत कराल, ही गोष्ट जाणून घ्या. अन्यथा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आज चांगला बदल झालेला दिसून येईल. कौटुंबिक स्तरावर चांगले वातावरण राहील. फक्त तोंडावर ताबा ठेवा, अन्यथा वातावरण बिघडेल.
कर्क – तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामांचे नीट नियोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ असेल. पण वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मदत मिळेल.
सिंह – चांगली प्रगती साध्य करण्यासाठी निराशावादी दृष्टिकोन सोडून द्यावा लागेल. अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने कुठलेही काम करू नका. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुटुंबात सुसंवाद राहील, याची काळजी घ्या.
कन्या – जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे व्यावसायिक अडचणीत येऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना संयम दाखवावा लागेल, नाहीतर वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. शेजारची व्यक्ती आज पैसे उधार मागण्यास येऊ शकतो. मदत देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या. इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील.
तुळ – जवळच्या व्यक्तीसोबत भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. सहकारी किंवा सहकर्मचारी यांची खूप मदत होईल. आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत जोडीदार पाठीशी उभा राहील. परिस्थिती बदलून अनुकूल होऊ शकते, यावर विश्वास ठेवा.
वृश्चिक – कुणी जुना मित्र व्यवसायात नफा मिळवण्यासाठी सल्ला देऊ शकतो. हा सल्ला अमलात आणला तर, धनलाभ नक्कीच होईल. नवीन गुंतवणूक करताना सखोल विचार करुन निर्णय घ्या. दिवसाची सुरुवात थोडी मेहनतीची असेल परंतु, जसजसा दिवस पुढे सरकेल चांगले फळ मिळायला लागतील.
धनु – दीर्घकालीन परिणाम डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून काही चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. कोणत्याही संकटावर मात कराण्यासाठी ठाम मानसिक तयारी पाहिजे. जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
हेही वाचा – स्वयंपाक म्हणजे उत्तम कला आणि निखळ आनंद!
मकर – अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते, हे लक्षात घ्या. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो.
कुंभ – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. व्यवसायात नवीन प्रकल्प हाती घेण्याची तयारी कराल. मान अथवा पाठीच्या वेदना उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे.
मीन – मतभिन्नता आणि दडपण यामुळे चिडचिडे आणि बैचेन व्हाल. पण ही परिस्थिती बदलेल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात.


