मयुरेश गोखले
आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं… फोनवर तिचा सारखा एकच विषय सुरू होता… “श्री सांग ना रे, आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ! श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?”
त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. फोनवर प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. “मी तुझ्यासोबत वाट तर चुकत नाहीये ना!” याचीच आवर्तन सुरू होती. शेवटी श्रीरंगने तिला संध्याकाळी त्यांच्या नेहमीच्या जागी भेटायला बोलावले.
संध्याकाळ झाली, दोघे भेटले. वातावरण ढगाळ आणि हवेत चांगलाच गारठा होता. समोर टेबलवर ठेवलेला चहाचा वाफाळलेला एक कप उचलून श्री तिच्याकडे एकटक बघत होता आणि तिला त्याच्या अशा बघण्याने काहीच सुचत नव्हते. श्रीला हसायला येत होते. शेवटी श्रीरंगने शांततेचा भंग करत तिला बेचैन असण्याचे कारण विचारले.
हेही वाचा – मी मज हरपून बसले गं…
ती म्हणाली की, काल तिची एक नातलग तिला भेटली, त्या नातलग बाईने खूप कौन्सलिंग केलं. तू खूप मोठी चूक करतेय… असं गुंतत नको जाऊ… इतक्या कमी वेळात इतकं प्रेम कधी होऊच शकत नाही… तुझं भविष्य तुलाच घडवायचं आहे… घरच्यांचा विचार कर… वगैरे वगैरे वगैरे वगैरे…
श्रीला तिच्या बेचैनीचे कारण आता नीट समजले होते. नातलग बाई काय बोलली, हे पुराण अजून संपलेच नव्हते आणि त्या बाईच्या सांगण्यामुळे तिला काय वाटले, ही बडबड सुरूच होती. पण आता श्रीचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तिच्या डोळ्यातले क्षणाक्षणाला बदलणारे भाव पाहून त्याला खूप मजा येत होती. मधेच तिची एक बट तिच्या गालावर येत होती, श्री त्या बटेकडे पाहत होता. तिच्या ओठांच्या हालचाली तो पाहत होता…
हेही वाचा – गहिवरला मेघ नभी…
श्रीने आजूबाजूला पाहिले, हॉटेलमध्ये फक्त ते दोघेच बसले होते. त्याने आपला चहाचा कप अगदी तिच्या कपला चिटकून ठेवला आणि खुर्चीवरून उठून तो तिच्याजवळ आला… तिचे बोलणे आता बंद झाले होते… ती त्याच्याकडे पाहत होती. त्याने हात धरून तिला उठवले आणि काही कळायच्या आत तिला एक घट्ट मिठी मारून हळूच तिच्या कानात सांगितले की, तो उद्या आई, बाबांना घेऊन तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला येणार आहे!
श्रीचे वाक्य पूर्ण झाले, पण ओठ काही कानाजवळून दूर झाले नाहीत आणि मिठी पण काही क्षण तशीच राहिली. त्या काही क्षणांत तिला तिचे उत्तर मिळाले होते!
“मी कशी तुझ्यासवे, चुकले वाट रे!!!”
काही चुकत नाहीये माझं… ही मिठी मला अशीच आयुष्यभर हवी आहे…
मोबाइल – 9423100151
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


