डॉ. किशोर महाबळ
वर्गात नियमित येणारी, गृहपाठ नियमित करणारी एक मुलगी एक दिवस गृहपाठ न करताच शाळेत आली. शिक्षिकेला आश्चर्य वाटले आणि तिने त्या मुलीला कारण विचारताच त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली की, “काल रात्री मी अभ्यास करायला बसले. आमच्या झोपडीत एकच दिवा आहे. बाबा दारू पिऊन घरी आले आणि रागाने त्यांनी तो दिवाच फोडून टाकला व त्यामुळे मला गृहपाठ करता आला नाही!” नागपूर महानगरपालिकेच्या एका शाळेतील एका मुलीचा हा अनुभव आहे. यासारखे असंख्य चांगले-वाईट अनुभव सर्व समाजघटकांतील, शालेय स्तरावरील मुलामुलींना रोज येत असतात. या अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. आपले आईवडील, शिक्षक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि समाजातील अन्य लोक यांच्या वागण्याकडे ते बारकाईने बघत असतात.
शाळेत बराच वेळ जात असल्याने शाळेतील शिक्षकांचे वर्तन ते जास्तच बारकाईने बघत असतात. शिक्षक शाळेत, वर्गात, कसे वागतात, कशी भाषा बोलतात, सकारात्मक बोलतात की, सतत चिडचिड करतात, चेहऱ्यावर हास्य असते का, सतत विद्यार्थ्यांचे दोष शोधतात की, त्यांचे कौतुक करण्याची संधी शोधतात… विद्यार्थ्यांना घाबरवतात का, मारहाण करतात का, यासारख्या असंख्य गोष्टी ही मुलेमुली बघत असतात. शिक्षक, आईवडील आणि समाजातील इतर व्यक्तिंच्या वर्तनाचे ही मुले असेच निरीक्षण करीत असतात. त्या वर्तनातील काही गोष्टी आत्मसात करीत असतात. काही प्रकारच्या वागण्याचा त्यांना अर्थच लागत नाही, त्याबाबतीत ते कोड्यात पडतात. पण त्या वर्तनाचा परिणाम मात्र त्यांच्यावर होत असतोच!
कसे वागावे, कसे वागू नये याचा हे सारे नेहमी उपदेश करतात. या उपदेशात अनेकदा विरोधाभास असतो. अनेकदा उपदेश करणाऱ्यांचे वागणे बरोबर त्यांच्या उपदेशाविरुद्ध असते. अशा असंख्य अनुभवांबद्दल ही मुलंमुली आपल्या समवयस्कांशी नेहमी बोलतात. या अनुभवांची देवाणघेवाण करताना त्यांना कधी आनंद तर, कधी दुःख वाटते. हे अनुभव अनेक अर्थानी महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत हे चांगले वाईट अनुभव खूप दूरगामी परिणाम करतात.
या अनुभवाच्या देवाण-घेवाणीशिवाय बालवयात गोष्ट ऐकणे हाही एक आवडीचा छंद असतो. गोष्ट, कथा ऐकण्यात रमून जाण्याचे हे वय असते. एकतर आपले अनुभव एकमेकांना सांगायचे किंवा आपण वाचलेल्या कथा, गोष्टी एकमेकांना सांगायच्या हे विद्यार्थी जीवनात नेहमीच घडते. कथा, गोष्टी या विद्यार्थी जीवनात एक महत्त्वाचे स्थान मिळवतात. शाळेतील मुलांचे थोडे निरीक्षण केले तर कथा वाचून त्या आपल्या मित्रमंडळाला सांगणारे विद्यार्थी प्रत्येक वर्गात असतात. त्यांच्या आजूबाजूला नेहमी मित्रमैत्रिणींचा घोळका असतो, कारण ही मुले चटकदारपणे कथा सांगताना दिसतात. या विद्यार्थ्यांमधे भाषिक गुणवत्ता असते. प्रत्येक शाळेत अशी गुणवत्ता असलेले विद्यार्थी असतात. पण या गुणवत्तेची दखल घेणारी शाळा क्वचितच आढळते. कारण, या गुणवत्तेची दखल घेतली पाहिजे आणि लहान वयातील प्रतिभावंतांचा शोध घेतला पाहिजे, या गोष्टीचे महत्त्वच आपल्या शिक्षण व्यवस्थेत लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार व. पु. काळे यांच्यासारखी प्रतिभा सुप्त रूपात असलेले विद्यार्थी दुर्लक्षितच राहतात.
हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!
कथा, वाचकाला एका वेगळ्या विश्वात नेते. कथा संस्कार करते, विचार करायला लावते, समाजातील परंपरा, सण, उत्सव, जीवनमूल्ये, जीवनशैली, संस्कृती याबद्दलच्या असंख्य गोष्टी शिकविते. ती वाचकाला संवेदनशील करते. भावभावनांचे महत्त्व रुजविते. लहान मुलांच्या आयुष्यात चांगल्या संस्कारक्षम कथा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शाळेतील कथालेखनाची क्षमता असलेले विद्यार्थी म्हणूनच आपल्याला शोधायचे आहेत.
आपण आपल्या शाळेत असे कोणकोण विद्यार्थी आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाळेतील सर्व मुलामुलींना आपण त्यांचे अनुभव लिहिण्यास प्रोत्साहन देऊया. हा उपक्रम अनेक अर्थानी उपयुक्त ठरेल. कोणता विद्यार्थी आपला अनुभव चांगल्या प्रभावी भाषेत लिहू शकतो, कोणाकडे अशी भाषिक गुणवत्ता आहे, हे भाषेच्या शिक्षकाला ओळखता येईल. यातून शाळेतील कथालेखन करण्याची प्रतिभा असलेले विद्यार्थी आपण शोधू शकतो.
हे करण्यासाठी आपल्या शाळेतील सर्व मुलामुलींना त्यांचे अनुभव लिहायला प्रोत्साहन द्यायचे आहे. घरात, शाळेत, समाजात, त्यांना आलेला अनुभव विद्यार्थ्यांनी लिहावा असा आपण प्रयत्न करूया. शाळेतील सर्व मुलामुलींना प्रोत्साहन द्यायचे आहे. घरात, शाळेत, समाजात, त्यांना आलेला अनुभव विद्यार्थ्यांनी लिहावा, असा आपण प्रयत्न करूया. शाळेतील सर्व मुलामुलींना प्रोत्साहन दिले तर, असंख्य अनुभव गोळा करता येतील. त्यातून भाषिक गुणवत्ता असलेले भविष्यातील कथालेखक आपल्याला शोधून काढता येतील.
हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध
आपले अनुभव सगळ्यांना सांगायला काही विद्यार्थी निश्चितच तयार असतील. अशांना आपण वर्गात ते अनुभव सांगायला प्रोत्साहन देऊ. त्यामुळे कोणाला कथा चांगली सांगता येते म्हणजे कोण भविष्यातील चांगला कथाकथनकार होऊ शकतो, हे आपल्याला कळू शकेल. या मुलांना संधी दिली तर, प्रार्थनेच्या वेळी एक एक छोटी कथा सांगण्याचा उपक्रम या विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण सुरू करू शकू.
या प्रयत्नातून आपल्याला लिखित रूपात असंख्य अनुभव मिळतील. त्यांचा संग्रह केल्यास दरवर्षी या अनुभवांचा एक चांगला संग्रह प्रकाशित करता येईल. प्रत्येक वर्गातील असे कथालेखक आणि कथाकथन करणारे आपण शोधूया.


