प्रणाली मंगेश महाशब्दे
असे म्हणतात की,
तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते…
एका गावात एक छोटे कुटुंब रहात होते. नवरा, बायको आणि त्यांच्या सुमन आणि मीनल या दोन मुली. दोन्ही मुली शाळेत जात होत्या. मुली खूप हुशार असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत त्यांना यश हमखास मिळत होते. वडिलांना खूप पगार नव्हता, पण आईने कधी त्याबद्दल तक्रार केली नाही.
एकेदिवशी शाळा तपासणीसाठी काही अधिकारी शाळेत आले. अधिकारी प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाबरोबर बोलत होते, प्रश्न विचारत होते. गावातील काही बड्या लोकांची मुलं पण या शाळेत शिकत असल्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर असलेले इतर कर्मचारी त्या मुलांची आवर्जून ओळख करून देत होते. ही मुले पण उद्धटपणेच त्या अधिकाऱ्यांबरोबर बोलत होती. काही प्रश्न विचारले तरी, उत्तरे देत नव्हती. अधिकाऱ्यांनी त्याबद्दल शिक्षकांना सुद्धा सांगितले, पण शिक्षकही काही बोलू शकले नाही.
अधिकारी प्रत्येक मुलांबरोबर बोलत होते. बोलत असताना ते मीनलच्या वर्गात आले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकेका मुलाला प्रश्न विचारता विचारता अधिकारी मीनलजवळ आले, तिने प्रथम त्यांना नमस्कार केला, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला योग्य ते उत्तर दिले आणि नंतर त्यांचे आभार पण मानले. अधिकाऱ्यांना खूप आश्चर्य वाटले, तसेच त्यांना आनंद सुद्धा झाला. असाच अनुभव त्यांना सुमनच्या वर्गातही आला.
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
मुलांबरोबर बोलून अधिकारी त्या शाळेतील हुशार मुलांचे कौतुक करणार होते. त्यामुळे सर्व मुलांबरोबर बोलून झाल्यावर सर्वजण एका ठिकाणी जमले. अधिकाऱ्यांनी मुलांच्या अभ्यासाबद्दल मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. उत्तरे चांगल्याप्रकारे दिली हेसुद्धा सांगितले. पण खास कौतुक झाले ते सुमन आणि मीनल या दोघींचे. मोठ्यांबरोबर कसे बोलावे, कसे वागावे हे या दोघींना खूप चांगले माहीत आहे, असे ते आवर्जून म्हणाले. अधिकारी गेल्यावर गावामध्ये पण दोघींचेच कौतुक बरेच दिवस होत होते.
खरंच, दोघींचे वागणे हे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांवर केलेल्या संस्कारांचेच प्रतिबिंब होते. Robert Fulghum यांनी म्हटले आहे की,
Don’t worry that children never listen to you; worry that they are always watching you.
दोघींनीही त्यांच्या आई-वडिलांची मान उंचावली होती. पैशांपेक्षा संस्कार महत्त्वाचे हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवले होते.
हेही वाचा – अबोला… जास्त किंवा कमी दोन्ही घातकच!
संस्कार म्हणजे मनावर आणि व्यक्तिमत्त्वावर केलेला चांगल्या गुणांचा, मूल्यांचा आणि उच्च विचारांचा ठसा असतो. असे संस्कार लहानपणापासूनच द्यावे लागतात. यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो, जीवन आदर्श बनते, आनंदी बनते. या संदर्भातील पुढील कविता किती बोलकी आहे,
तेजस्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार
मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार
मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार
मना आधार संस्कार, मना घडावी संस्कार
मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार
मना बुद्धी दे संस्कार, मना सिद्धी दे संस्कार
मना शक्ती दे संस्कार, मना घडावी संस्कार
मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौन्दर्य संस्कार
मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार
मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार
अशीच संस्कारक्षम पिढीच आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य घडवेल यात काही शंका नाही.
मोबाइल – 973002049


