सतीश बर्वे
गेल्या महिन्यातली गोष्ट. मी पुण्याला गेलो होतो, आमच्या कुटुंबातील एका मंगलकार्याला उपस्थित राहण्यासाठी. मुहूर्त उशिराचा होता. लग्न लागून जेवणं आटपून आम्ही नुसत्या गप्पा मारत बसलो असताना डोळ्यांवर पेंग यायला लागली म्हणून मी आणि मामेभाऊ त्याच्या स्कूटरवरून कार्यालयापासून दूर पौड रोडला मोरे विद्यालयाच्या जवळच्या एका चहाच्या टपरीवर गेलो होतो. संध्याकाळी साडेपाच-सहाची वेळ होती. तरुणाईची बऱ्यापैकी गर्दी होती तिथे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या खमंग राजकारणावर चर्चा सुरू होती. इतक्यात एका मुलाच्या तोंडून अजब शब्द ऐकले… “अरे यार, तुमचा काही का पक्ष असेना आमचा सध्या एकच पक्ष आणि तो म्हणजे पोरींवर लक्ष!”
ते ऐकून मी दचकून त्या घोळक्याकडे पाहिले. बहुतेक नोकरी धंद्याला नुकतीच सुरवात केलेल्या मुलांचा एक घोळका आडव्यातिडव्या लावलेल्या बाइक्सच्या सीटवर बसून हातात कटिंग चहा धरून उभा होता. माझ्या मामेभावाने मला खुणेनेच, ‘काय झालं?’ असं विचारलं.
हेही वाचा – मुलाचं परदेशी शिक्षण अन् मातृत्वाची परीक्षा!
मी त्याला हसून म्हणालो, “काही नाही रे. हेच वाक्य मी माझ्या एका मित्राच्या प्रोफाइलमध्ये वाचले होते… त्या मित्राची एकदम आठवण झाली. डोळ्याचं काम वाढवणारी आणि अवतीभोवती भिरभिरणारी नजर जवळपास प्रत्येक तरुणाची असते. त्या तारुण्यसुलभ वयातली ती एक नैसर्गिक क्रिया असते. हा माझा मित्र देखील त्याच जातकुळीतील असावा. आमची ओळख जेमतेम पाच वर्षांतील, पण तरीही तरुणपणी याने धीटपणे काय काय केलं असेल, याचा तगडा अंदाज मी आरामात बांधू शकतो.”
आमचं बोलणं सुरू असतानाच त्या घोळक्यातून एक जण पुढे आला आणि त्याने त्याची ओळख करून दिली, “काका, मी अनिकेत पेंडसे…” मी तुमचं बोलणं ऐकलं.
मी त्याला म्हणालो, “मित्रा, तुझा पक्ष एकदम हटकेवाला आहे. फार स्किल लागतं ना तिथे काम करताना?”
“सव्वालच नाही… काका आम्ही डोळ्यांनी इंटरव्ह्यू घेतो आणि हृदयाच्या लॅपटॉपमध्ये नोटिंग करून ठेवतो…”
“अरे व्वा, बघायला पाहिजे तुझी इंटरव्ह्यूची प्रोसेस. पुणे तिथे काय उणे. तो हसायला लागला आणि मला म्हणाला, “I am just kidding . तुम्हाला वाटतो तसा मी नाहीये. इनफॅक्ट आमच्या ग्रुपमध्ये तसं कोणीच नाहीये. नुकतेच नोकरीला लागलो आहोत आम्ही. चहा पिता पिता वातावरण हसतं-खेळतं ठेवण्यासाठी जरा मजा करत असतो इतकंच. बाकी काही नाही.”
“अरे हो हो… एवढं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये मुळात. मी काही तुझी उलटतपासणी वगैरे घेत नाहीये. इनफॅक्ट आपण एकमेकांना तितकंसं ओळखत देखील नाही. येतंय का तुझ्या लक्षात.”
तो अचानक शांत झाला. “खरंच की, तुम्ही म्हणताय ते. पण खरं सांगू का? तुमच्याशी बोलताना ते बिलकुल जाणवलं नाही. तुम्ही खूप कूल आणि ऑसम आहात. तुमच्याशी मैत्री करायला आवडेल मला,” असं म्हणून त्याने हात पुढे केला. मी हस्तांदोलन करून माझी ओळख सांगितली.
इतक्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर थाप मारली. मी मागे वळून पाहिले आणि आश्चर्यचकीत झालो. मागे मृण्मयी उभी होती. माझी पुण्याची फेसबुक मैत्रीण!
“व्हॉट अ सरप्राइज काका. तुम्ही आणि पुण्यात?”
“का मी येऊ शकत नाही तुमच्या पुण्यात?”
“तसं नाही हो काका. पण अचानकपणे दिसलात म्हणून मी आपलं विचारले. बाय द वे मी ओळख करून देते. असं म्हणून काही मिनिटांपूर्वी मी ज्याच्याशी मैत्री केली, त्याच मुलाकडे मृण्मयीने बोट केले…
“माझी नुकतीच ओळख झाली आहे, या पक्षप्रमुखांबरोबर…” असं म्हणून मी हसायला लागलो. मृण्मयीला काहीच कळेना. इतक्यात अनिकेतने पुढे होऊन खुलासा केला आणि आम्ही तिघेही हसायला लागलो.
“दादा, तुझ्या पुण्यात देखील ओळखी आहेत. तू इथे देखील इतका पॉप्युलर असशील, असं वाटलं नव्हतं मला.” इतका वेळ शांतपणे सगळं ऐकून माझा मामेभावाने अखेर तोंड उघडले.
“अरे, फेसबुकमुळे जग आणखी जवळ आलंय.”
“बाय द वे मृण्मयी, तू इथे कशी काय?”
“काका, माझा आणि अनिकेतचा लवकरच साखरपुडा होणार आहे. त्याला भेटायलाच आले आहे मी.”
“अरे वा छान. अभिनंदन तुम्हा दोघांचे! अनिकेत, थोडक्यात सांगायचे म्हणजे, तुझा ‘आमचा पक्ष’ आता तुम्हा दोघांचा ‘आपला पक्ष’ होणार आहे तर… म्हणजे आता तुला तुझ्या पक्षाची ध्येय धोरणे आणि नियमावली सरसकट बदलावी लागणार.”
“काका किती दिवस आहात पुण्यात?” मृण्मयीने मला विचारले.
“उद्या सकाळी निघेन मी, मुंबईला जायला.”
“काका साखरपुड्याचे आमंत्रण मी पाठवीन तुम्हाला. कुठलीही सबब न सांगता तुम्हाला यायचं आहे. माझे मुंबईचे फेसबुक काका म्हणून तुमची ओळख करून देणार आहे, मी सगळ्यांना. तुमच्या कथा मी नेहमी आमच्या नातेवाईकांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये कॉपी-पेस्ट करून पाठवत असते, त्यामुळे तुम्हाला नावाने सगळे ओळखतात. साखरपुड्याला आलात की, सगळ्यांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटता येईल.”
“नक्की येईन मी. चला मी निघतो आता. वरातीची वेळ होईल. सामान आवराआवरी करायची आहे, आम्हा दोघांना. असं म्हणून मी आणि माझ्या मामेभावाने अनिकेत आणि मृण्मयीचा निरोप घेतला.”
हेही वाचा – दुसऱ्यांना जगण्याची ताकद देणारा ‘अन्नसोहळा’
दोघांच्याही बोलण्यातून मला एक गोष्ट लक्षात आली ती ही की, मुंबई काय, पुणे काय किंवा आणखी कुठचं शहर असो आजची तरुण पिढी खुप सॉर्टेड आहे. आपली स्वप्नं आणि ध्येय याबाबतीत त्यांचे विचार खूप स्पष्ट आहेत. मज्जा, मस्ती, धमाल जरूर करतात; पण आपल्या जबाबदारीची जाणीव त्यांना पुरेपूर आहे. आयुष्यात छानपैकी स्थिर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्याची त्यांची तयारी आहे. ते जिद्दी आहेतच पण छोट्या छोट्या अपयशांशी आणि पराभवांशी दोन हात करायला ते कायम सज्ज असतात. कारण आज पावलापावलांवर त्यांना कष्ट, उपेक्षा, ताणतणावांना आणि अचानकपणे आलेल्या आव्हानांना कळत नकळत सामोरे जावे लागते. या पिढीच्या भविष्याचे चित्र स्पष्ट आणि सकारात्मक आहे एवढं नक्की.
शेवटी काय ‘आमचा पक्ष’ म्हणून वावरणाऱ्या या पिढीतील प्रत्येकाच्या हातात घरचे कुळाचार, चालीरीती आणि प्रथा सोपविण्यासाठी त्याचे कुटुंबीय सदैव दक्ष असतात. परंपरा या पाळण्यासाठीच असतात आणि तसं झालं की, घराण्याच्या अस्तित्वाचा डेरेदार वृक्ष पिढ्यांपिढ्या मुळांपासून तग धरून उभा रहातो. सगळ्या घराण्यांचा इतिहास आणि आपण जपत आलेली आपली संस्कृती, हेच सांगते.


