सुहास गोखले
(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)
मनात असेल तर, पोलीस अधिकारी हे अनेक लोकोपयोगी कामेही करू शकतात हे लक्षात आल्याने, मी भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन पोलीस दलात प्रवेश करण्याचा निश्चय त्यावेळी जाहीर केला. खरंतर, नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ 1984मध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला आणि मी पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला. मी खाकी युनिफॉर्म परिधान केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला.
वस्तुत:, नासिकसारख्या छोट्या शहरातून मुंबईला आलो आणि अभ्यासात बरा असल्याने Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात 10 वर्षं ट्रेक्स, स्नो स्किईंगचे दोन कोर्स केले.
तरुणपणी मी सह्याद्री आणि हिमालयात अनेक वर्षे ट्रेकिंग केले आहे. अनेकदा रात्रीही आम्ही जंगलात चालत असू, त्यावेळी दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आम्ही प्राचीन पद्धतीचा म्हणजेच आकाशस्थ नक्षत्रांचा वापर करायचो. त्यावेळी मनात विचार आला की, पूर्वीच्या काळी ऋषीमुनीही आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना हीच पद्धत वापरली असेल आणि या निमित्ताने त्यांनी आपल्या खगोलशास्त्राचा अभ्यास कथानिर्मितीसाठी केला असावा… आणि त्यातूनच पुराणकथांचा जन्म झालेला असावा.
हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट
उदाहरणार्थ भारतात विंध्य पर्वतरांगा कर्क वृत्तावर आहेत, त्यामुळे कर्कवृत्तापर्यंत आल्यावर सूर्याचा दक्षिणेस प्रवास सुरू होतो. यावरूनच विंध्यमुनींनी स्वत:ची उंची वाढवून सूर्याचा मार्ग रोखल्याची कथा सुचलेली असावी.
त्याचप्रमाणे सप्तर्षी नक्षत्रावरून सात ऋषींची नावे आलेली आहेत किंवा आकाशातल्या उल्का जळत येत धरणीवर आदळतात आणि त्यांचे अशनी शेतात नांगराच्या फाळाला लागतात त्यावरून जनककन्या सीता नांगराच्या फाळाखाली जन्मली आणि सीतेला अखेरीस अग्निदिव्य करावे लागले. त्यानंतर तिला धरणीनी उदरात सामावून घेतल्याचा कथाभाग आलेला असावा.
हेही वाचा – उकितामो आणि आरीगातो
त्यानंतर मी सर्वच नक्षत्रांच्या पुराणकथा संकलित केल्या, त्या पुढील लेखापासून क्रमाने कथन करतो.
(क्रमश:)