सुधीर करंदीकर
शेगावचे श्री गजानन महाराज यांनी सर्व भक्त मंडळींना एकच मंत्र दिला होता आणि तो म्हणजे – गण गण गणात बोते… महाराज स्वतः या मंत्राचा सतत जप करत असत आणि त्याप्रमाणे तो आचरणात आणत असत.
कुठलाही मंत्र म्हटला की, त्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे, ध्यानस्थ बसून त्या मंत्राचा नित्यनियमाने जप करणे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, नित्य जप करण्याबरोबरच त्या मंत्राचा अर्थ समजावून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे आणि ठेवणे!
आपण बरेचजण ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नित्य जप करत असतो. असा जप केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं आणि त्यामुळे जप करणाऱ्यांना मानसिक शांतता नक्कीच मिळते. पण बऱ्याच जणांना या मंत्राचा अर्थ माहीत नसतो, त्यामुळे तो आचरणात आणणे दूर राहते. परिणामी आपली वैचारिक पातळी / अध्यात्मिक पातळी उंचावण्याकरिता या अतिशय साध्या आणि आचरणांत आणायला अतिशय सोप्या अशा मंत्राचा उपयोग करण्याला आपण मुकतो.
हेही वाचा – भारतातील शक्तिपीठे
या मंत्राचा अर्थ आपल्याला समजला, तर तो आचरणात आणणे सोपे असते आणि मग आपण मनात तसं ठरवलं, तर आपली वाटचाल त्या दिशेने सहजपणे होऊ शकते. या मंत्राचा अर्थ सांगतात तो असा :-
जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. भगवान सर्वत्र आहेत आणि सर्व सत्ता भगवंतात आहे.
हा अर्थ वाचून मला किंवा सगळ्यांना समजेल असा अर्थ लक्षात येत नव्हता. त्यामुळे मंत्र आचरणात कसा आणायचा हे लक्षात येत नव्हते… म्हणून मी प्रत्येक शब्दाचा सर्व बाजूंनी अर्थ लक्षात घेऊन या मंत्राद्वारे महाराजांना काय सांगायचे असेल आणि ते सगळ्यांना कसे समजेल, असा या मंत्राचा अर्थ मी लिहून काढला.
मला या मंत्राचा सोपा अर्थ दिसतो तो असा —
(पहिला) गण = कुणीही व्यक्ती, कुणीही प्राणी
(दुसरा) गण = शिव म्हणजेच ईश्वर म्हणजेच देव
गणात = हृदयात
बोते = बघा
म्हणजे सगळ्या व्यक्तींमध्ये / प्राण्यांमध्ये ईश्वर आहे, हे लक्षात घ्या आणि ही जाणीव ठेवा. मग त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवा. सगळ्या व्यक्ती म्हणजे आपण स्वतः पण त्यामध्ये येतो, म्हणून स्वतःमध्ये पण ईश्वर आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय किंवा ज्या व्यक्तीविषयी बोलतोय, त्या व्यक्तीमध्ये ईश्वर आहे, हे जर आपल्या प्रत्येकाला उमगलं, तर आपण त्या व्यक्तीशी खोटं बोलू शकणार नाही / नाटकीपणाने बोलू शकणार नाही / त्याच्यावर आरडाओरडी करू शकणार नाही / त्याला घालून पाडून बोलू शकणार नाही / त्याला फसवू शकणार नाही / त्याला खोटी आश्वासने देऊ शकणार नाही / कुठेही भेसळ करू शकणार नाही / भ्रष्टाचार करू शकणार नाही. यामुळे सगळेच नातेसंबंध / मैत्रीसंबंध आणि व्यवहार स्वच्छ होतील आणि राहतील.
आपण अनेक मंदिरांची यात्रा करतो, देवांची पूजा करतो, देवांचे सण साजरे करतो, पण आपल्याला देवदर्शन कधीच होत नाही. कारण देवळातला देव म्हणत असेल, इथे तू माझ्यासमोर हात जोडतो आहेस / माझ्या आरत्या करतो आहेस आणि बाहेर गेल्यानंतर तू लोकांना म्हणजेच मला (कारण सगळ्याच व्यक्तींमध्ये देव आहे) फसवतो आहेस / लोकांना म्हणजेच मला शिवीगाळ करत आहेस, तुला मी कसं काय दर्शन देणार आणि तुझ्यावर कसा प्रसन्न होणार!
समोरच्या व्यक्तीमध्ये देव आहे, हे जर आपल्याला मनापासून पटलं, तर आपलं आचरण आपोआपच भक्तासारखं होईल आणि मग देव स्वतः आपल्या दाराशी दर्शन देण्याकरिता येईल, हे नक्की. पुराणकाळात अशी उदाहरणे भरपूर आहेत.
हेही वाचा – देशविदेशातील शक्तिपीठे
आता दुसरा भाग म्हणजे, स्वतःमध्ये देव आहे, हे जर आपल्या मनात रुजलं तर, एक गोष्ट सहज लक्षात येईल की, आपले स्वतःचे शरीर हेच त्या देवाचे मंदिर. देवाचे वास्तव्य जागृत ठेवायचे असेल तर, ते मंदिर म्हणजेच आपण आपले शरीर आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि पवित्र ठेवायलाच पाहिजे… आणि हे अगदी सोपे आहे. आपण याकरिता काय करायला पाहिजे –
रोज आपल्या शरीराची बाहेरून स्वच्छता करायला पाहिजे. नियमित व्यायाम, नियमित फिरणे, नियमित प्राणायाम, आपल्या आवडी / छंद जोपासणे, चांगले खाणेपिणे, वेळेवर झोपणे आणि उठणे, हे करायलाच पाहिजे. आपली घरची / बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय, हे सगळे नेहेमीच मन लावून करायलाच पाहिजेत. सगळ्यांशी प्रेमानी बोलणे / वागणे / कायम चेहेरा हसरा ठेवणे, तसेच कुणाही कडून कसलीच अपेक्षा न ठेवणे यामुळे पण मन स्वच्छ राहते.
संत तुकाराम महाराजांचं याच विषयावर एक सुंदर भजन आहे –
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर l
देव देहात देहात, का हो जाता देवळात l
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना II
गजानन महाराजांच्या मंत्राचा सोपा अर्थ आता लक्षात आला असेलच. चला तर मग आपण सगळेच जण आजपासून आचरणात आणूया –
गण गण गणात बोते l गण गण गणात बोते l
मोबाइल – 9225631100


