“ए आई कसला मस्त वास येतोय गं भाजीचा!” कालच माहेरी आलेली मीना स्वयंपाकघरात आली. “ए आई, किती दिवस झाले गं तुझ्या हातची बटाट्याची भाजी खाऊन, चल मला तर लगेचच वाढ.”
लेक माहेरी आलेली आहे. तिच्या आवडीच्या भाज्या, गोडाचे जेवण सगळे करण्यात धन्यता मानणारी आई लेकीला थोडे थांबवत म्हणाली,
“अगं पण बटाटा शिजू तर दे. तोपर्यंत पोळी करते, मग निवांत सगळे ताट वाढून देते.”.
मीना, ”काय गं आई, मग असा वास येऊच द्यायचा नाही ना!”
“बरं चल, तोपर्यंत आपण गप्पा तर मारू शकतो; जेणेकरून भाजी होईपर्यंत तुला थांबता येईल.” आई म्हणाली.
“अगं आई, हे भाज्यांचे वास कसले भन्नाट असतात गं. म्हणजे बघ ना, तू नेहमी वेगवेगळ्या भाज्या करतेस. वासावरूनच लक्षात येते की, कोणती भाजी केली आहे ते! तू म्हणतेस ना, तसेच माझ्या सासूबाई पण म्हणतात की, पदार्थ हा वासावरूनच लक्षात येतो. काही कमी-जास्त असेल तर पदार्थाचा वास लगेच सांगतो…”
आई – ”ओ मॅडम, हे समजण्यासाठी आधी स्वयंपाक येतो का? चालल्या वासावरून पदार्थ ओळखायला!”
मीना – “मातोश्री, प्रत्येक वेळेस गानसेनच व्हावं असं काही नाही, कानसेन पण तेवढेच महत्त्वाचे…”
आई – “बरं बाई… पण काय गं, एकदम हे वाक्य! काय झाले?”
मीना – “काही नाही गं. आता बघ ना गेले 3-4 महिने माझ्याकडे वेगवेगळे वास होते. त्यामुळे आता वास आला की, छान म्हणजे भारीच वाटते. आधी मी तुला नेहमी म्हणायचे, ‘काय गं काय करत आहेस? कसा विचित्र वास येत आहे. तू हे करत जाऊ नकोस. पण आता मला सगळेच वास भारी वाटायला लागले आहेत.”
आई – “म्हणजे गं, काय, झाले काय? बरे आहे ना सगळे? काही होत आहे का तुला?”
मीना – “अगं बाई मी छानच आहे. आता बघ ना प्रिया म्हणजे माझी नणंद घरी आली तेव्हा तिला नववा महिना लागला होता. आता कधीही दवाखान्यात जावे लागेल, असे माझ्या सासुबाई सारखे म्हणायच्या; नंतर खूप गडबड होईल म्हणून त्यांनी किती तयारी आधी करून ठेवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रियाला खाण्यासाठी त्या रोज वेगवेगळे पदार्थ करत होत्या. त्यामुळे माझी मजाच सुरू होती. आम्ही तिघीजणी मजाच करत होतो म्हण ना! आमच्या आई मला म्हणायच्या, मीना तू पण खाऊन घे, एकदा का बाळ घरात आले की, कोणाला वेळ मिळणार नाही”
आई – अगं बाई! मग काय मॅडम खूशच असणार की… आयतेच नवनवीन पदार्थ खायला मिळत होते म्हणजे!
मीना – तसं काही नाही बरं का आई. अगं या काळात आईंनी मला आणि प्रियाला खूप पदार्थ शिकवले. त्यांच्या वासामुळेच मी आणि प्रिया ते पदार्थ खात होतो. तसाही आधी 7-8 महिने प्रियाला कोणताच वास सहन होत नव्हता, असे तिने आल्यावर लगेचच आम्हाला सांगितले होते. त्यामुळे मला त्रास देऊ नका, असेच ती म्हणत होती. पण आई कधी लेकीला उपाशी ठेवेल का? हो ना आई मला देणार ना, आता भाजी पोळी…
आई – देणार बरं, बस तू… मी तुझे ताट वाढते.
मीना – तुला माहीत आहे का आई! त्यावेळेस किती वेगवेगळे पदार्थ आम्ही खाल्ले. असे तू नाही कधी करत… हरकत नाही मी तुला शिकवेन सगळे पदार्थ.
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
”हो, बरं का बाईसाहेब… पण कसे आहे ना, असे पदार्थ करायचे म्हणजे तुम्ही आधी आम्हाला गोड बातमी तर द्या,” आईने हसून उत्तर दिले.
मीना – समजतात बरं टोमणे! तर असो. पुढे काय झाले माहीत आहे का? आई ना रोज दुपारी काही ना काही भाजून ठेवायच्या, निवडून ठेवायच्या. ड्रायफ्रुट बारीक करून ठेवले. प्रत्येक वासाने भूकच लागायची गं आम्हा दोघींना. मग काय आईंचा डोळा चुकवून दोघीपण सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत होतो. नंतर प्रियाला त्रास सुरू झाल्यावर दवाखान्यात गेलो तर तिकडे सगळ्याच बाळंतीण त्यामुळे तो वास वेगळाच, तिकडे दोनच दिवस होतो, त्यातपण आईच तेथे होत्या. त्यामुळे मला जास्त तो वास अनुभवता आला नाही.”
“अरेरे, मग गं?” आई पण मुद्दामच मीनाला विचारत होती. लेक सासरचे कौतुक करत होती आणि आईला लेकीचे कौतुक वाटत होते. एक वर्षापूर्वीच लेकीचे लग्न झाले होतं, त्यामुळे थोडेसे हळवे होऊन आई सगळे ऐकत होती.
“…तर मी काय सांगत होते? हं, नंतर प्रियाला घरी आणलं, मग तर काय शेक-शेगडीचा वास, खाण्याचा वास, लहान बाळ घरात असताना येतात ते सगळे वास यायला लागले. रूम-फ्रेशनरपेक्षा किती छान वाटत होते माहीत आहे का?” दोन महिन्यांत काय-काय झाले ते सांगत होती आणि आई पण काम आवरून तिच्यासमोर बसून तिचे सगळे बोलणे मन लावून ऐकत होती. अगदी लहानपणापासूनच मीनाचे सगळे बोलणे आई मन लावून ऐकायची.
हेही वाचा – गोफ… सुखद आठवणींचा!
“आई तुला माहीत आहे का? मला ना या सगळ्या वासांची इतकी सवय झाली ना की, दोन महिन्यांच्या सोनूलीला घेऊन जाताना प्रियाला जितके वाईट वाटले नसेल ना, त्यापेक्षा जास्त मला वाईट वाटले. हे वास खूप मिस करते आहे आई मी…” थोडीशी हळवी झाली होती मीना… “आई खरंच किती वेगवेगळे वास असतात ना आपल्या आजूबाजूला जे आपल्याला नेहमी फ्रेश ठेवतात.”
तेवढ्यात बेल वाजते. आई दार उघडायला जाते. मनीष म्हणजेच या घरचे चिरंजीव आलेले असतात.
“काय मॅडम all ok ना? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे? “
त्याने काही सांगायच्या किंवा दाखवायच्या आधीच मीना ओरडली, ”ए तू चाफ्याची फुलं आणली आहेस ना, माझ्यासाठी! थांब हं, मी हात धुवून येते.”
“काय गं, तुला कसे समजले? असो ही घे चाफ्याची वेणी…” मनीषने सर्व फुलं मीनाला दिली. मग काय, किती वेळ मीना पुन्हा वेगळ्या वासामध्ये गुंगून गेली.
आई – काय बाईसाहेब, आता कोणता वास घेत आहात? नवीन पुस्तकं?
मीना – आई हे पार्सल आले ना आत्ता, त्यामध्ये पुस्तक आले आहे, तेही नवीन पुस्तक! मग काय…
आई – खरंच आहे.”
मीना – काय गं आई, बाबा सकाळीच कुठे गेले आहेत?
आई – अगं मागे राहणारे जोशीकाका आहेत ना, त्यांच्या आईंचे निधन झाले; त्यामुळे बाबा सकाळीच तिकडे गेले आहेत.
मीना – अच्छा म्हणजे मघापासून तो वास मागून येत आहे का? हा पण कसला वेगळा वास असतो ना?
“आज काही त्या वासांचे खरे नाही!” आई हसतच म्हणाली.


