Thursday, February 5, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : पाहें पां तरंग होत जात, परि तेथ उदक तें अखंड...

Dnyaneshwari : पाहें पां तरंग होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत…

अध्याय आठवा

जैसें आटलिया रूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अळंकार होती ॥173॥ इयें दोन्ही जैसीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूंचां ठायी ॥174॥ तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिद्ध ॥175॥ जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥176॥ पाहें पां तरंग होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥177॥ नातरी आटतियें अळंकारी । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥178॥

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् । यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥21॥

पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्यया । यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥22॥

जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हे ऐसे नावडे ॥ जे मना बुद्धी न सांपडे । म्हणऊनियां ॥179॥ आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकारलोपें न विसंचे । नित्यता गा ॥180॥ म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुही उपजे । जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ॥181॥ पैं आघवां इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारू करवी ना करी । म्हणऊनियां ॥182॥ एऱ्हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजी एकही न ठके गा सुभटा । दाही इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाति ॥183॥ उकलूं विषयांचा पेटा । होता मनाचां चोहटां । तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥184॥ परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥185॥ तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥186॥ हे देहक्रिया आघवी । न करितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले ॥187॥ अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं । म्हणोनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥188॥ आणि प्रकृतिपतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें ।
येणेंही कारणें जयातें । पुरुषु म्हणों ये ॥189॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जैं चोकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये…

अर्थ

ज्याप्रमाणे अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात आणि पुढे ज्यावेळी त्या लगडीचे  निरनिराळे अलंकार होतात, त्यावेळी त्या लगचीचा लगडपणा नाहीसा होतो. ॥173॥ अलंकार आणि लगड या दोहींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार (जग) आणि निराकार (माया) यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. (म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांस आधार चैतन्यच आहे). ॥174॥ ते चैतन्य तर साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही कालात असणारे असेही म्हणता येत नाही आणि क्षणभंगुर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्यसिद्ध आहे. ॥175॥ ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी, त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे, परंतु विश्वपण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. ॥176॥ हे पाहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार असलेले पाणी सर्वकाळ असते, त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणिमात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य, ते अविनाशच असते. ॥177॥ अथवा आटणार्‍या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्यजीवांच्या आकारात जे अमर आहे ॥178॥

ज्यास अव्यक्त, अक्षर असे म्हणतात, त्यालाच परम (अत्यंत श्रेष्ठ) गती म्हणतात. ज्याप्रत गेल्यावर (प्राणी) परत येत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ असे स्वरूप आहे. ॥21॥

हे पार्था, ज्याच्यामध्ये ही सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व (विश्व) व्यापलेले आहे, तो पर (श्रेष्ठ) पुरुष अनन्य (एकनिष्ठ) भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. ॥22॥

ज्याला (परब्रह्माला) कौतुकाने अव्यक्त असे म्हटले, तर त्याची (ती) स्तुती केली, असे होत नाही, कारण ते मन-बुद्धीला अगोचर आहे, म्हणून. ॥179॥ आणि अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकारपण जात नाही आणि आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही. ॥180॥ म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो आणि ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असे म्हणतात ॥181॥ परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये (जो परमात्मा) निजल्यासारखा (उदासीन) आहे, कारण की, तो कोणताही व्यापार करीत नाही आणि करवीत नाही म्हणून ॥182॥ एरवी शरीराचे जे व्यापार आहेत, त्यापैकी अर्जुना, एकही थांबत नाही तर, देहादी इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत. ॥183॥ मनरूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात आणि त्यापासून होणार्‍या सुखदु:खरूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो. ॥184॥ परंतु राजा सुखाने निजला असता, ज्याप्रमाणे देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते ॥185॥ त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार आणि प्राणवायूची हालचाल, ॥186॥ ही सर्व देहक्रिया (परमात्म्याने स्वत:) न करविता चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वत: लोकांना व्यापार करावयास न लावता, लोकांचे व्यापार चांगले चालतात ॥187॥ अर्जुना, याप्रमाणे (आत्मा) हा शरीरातच निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात, असे समज. ॥188॥ आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की, हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती, तिच्याशी एकपत्नीव्रताने असतो. या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते. ॥189॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari :  एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!