दोन महिन्यांपूर्वी एकटीने रेल्वेने प्रवास करण्याचा योग आला. प्रवास बराच लांबचा होता. मला ‘साइड अप्पर’ सीट मिळाली होती, त्यामुळे मी, हातातील पुस्तक आणि मधेच येणारा चहा अशी आमची तिघांची मस्त मैफल जमली होती…
माझ्या समोरच्या उजवीकडच्या लोअर बर्थवर एक स्त्री आणि डावीकडच्या लोअर बर्थ वर एक पुरुष असे दोघं बसले होते. सुरुवातीला त्यांच्या नात्याचा अंदाज आला नाही, पण थोड्या वेळाने चित्र स्पष्ट झाले. तो माणूस एका स्टेशनवरून पेपर घेऊन चेहऱ्यासमोर धरून बसला होता. ती स्त्री मात्र घरच्या काही तक्रारी, जावेबद्दल किंवा नणंदेबद्दल काहीतरी सांगत होती. तिचे बोलणे अतिशय सौम्य शब्दांत होते, पण तो पुरुष साधं ‘हं’ म्हणण्याची तसदीही घेत नव्हता. ती बराच वेळ बोलत राहिली आणि नंतर खिडकीबाहेर पाहू लागली. तिच्या डोळ्यांत पाणी आल्याचा भास मला झाला. तो माणूस पेपर वाचून झाल्यावर दुपारी शांतपणे झोपूनही गेला. ती स्त्री मात्र तशीच खिडकीकडे बघत बसून राहिली.
त्यानंतर एका स्टेशनवर एक वयस्कर जोडपे माझ्या खालच्या सीटवर आले. दिवस असल्यामुळे ते दोघेही ‘साइड लोअर’वर छान गप्पा मारत बसले होते. त्यांच्यातला संवाद बघण्यासारखा होता. मधेच चहावाला आला, तेव्हा आजोबांनी कॉफी विचारली. कॉफी नव्हती, तेव्हा आजी म्हणाल्या, “मी चहा घेत नाही, पण तुम्ही तर घ्या.” त्यावर आजोबा प्रेमळपणे म्हणाले, “काही हरकत नाही, आपण दोघे नंतर कॉफीच घेऊ.” खिडकीत पाहणारी ती पहिली स्त्री हे सर्व कौतुकाने बघत होती.
हेही वाचा – आदर्श बनण्याच्या ओझ्याखाली दबला आयुष्याचा आनंद!
जेवणाची वेळ झाली, तेव्हा तो झोपलेला माणूस उठला. त्या स्त्रीने डबा काढून त्याला जेवायला वाढले. तो गपचूप जेवला आणि तिने एकटीनेच पुन्हा सगळे डबे आवरून ठेवले. मला आता पुस्तकापेक्षा या वास्तवातील पात्रांत जास्त रस वाटत होता. थोड्या वेळाने खालचे वयस्कर जोडपे जेवू लागले. आजोबा आजींना म्हणत होते, “आज भाजी खूप छान झालीये.” नंतर ते आजोबा मलाही आपुलकीने म्हणाले, “मुली, तू काही आणलं नसेल तर, आमच्या डब्यातले जेव. माझी बायको खूप छान स्वयंपाक करते, एकदा खाऊन बघ!”
खिडकीत बघणारी ती स्त्री हे सर्व शांतपणे ऐकत होती. किती छोटी गोष्ट, पण किती मोठा फरक! दोन्ही जोडप्यांमध्ये एकाच गोष्टीचा फरक होता, तो म्हणजे ‘संवाद’. खिडकीकडे पाहणाऱ्या स्त्रीच्या नवऱ्याला तिच्याबद्दल भावना नसतील असे नाही, पण त्याला त्या व्यक्त करता येत नव्हत्या. याउलट, खाली बसलेल्या आजोबांना आपल्या भावना शब्दांत मांडता येत होत्या.
प्रवास रेल्वेचा असो किंवा आयुष्याचा, जोडीदारासोबत योग्य संवाद असेल तर दोन्ही प्रवास फार सुखकर होतात. तसे बघता स्त्रियांच्या तुलनेत पुरुष कमी व्यक्त होताना दिसतात, त्यांना त्यांची त्यांची मनोवैज्ञानिक, जैविक आणि सामाजिक कारणे आहेत. हे जरी खरं असलं तरी, स्त्रियांची जशी सामाजिक कामे बदलली, तसेच स्त्रियांनी स्वतःला बदललं; त्यांचे कपडे, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचे विचार करण्याची पद्धत इथपर्यंत त्यांनी स्वतःला बदललं, मग पुरुष स्वतःमध्ये हा छोटासा बदल का नाही करून घेऊ शकत?
हेही वाचा – सौंदर्याचा सुवर्णपाश!
योग्य शब्दांत व्यक्त होणे म्हणजे खूप बडबड करणे असे नाही, परंतु आपल्या हक्काच्या स्त्रीला भावनिक एकटेपणा जाणवू नये, तिने स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगू नये आणि तिच्या प्रत्येक बोलण्यात आपल्याला रस आहे, तिच्या आयुष्यात ज्या अनेक समस्या येतात त्या मला जाणवतात, हे दाखवण्यासाठी तरी त्याने थोडासा संवाद साधायला हवा. संवादाचा सेतू नसलेले जोडपे दोन समांतर रेषांसारखे वाटतात, ज्यांची एकमेकांना सोबत तर असतेच, पण त्या एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत.
नवल म्हणजे व्यक्तींचे दोन प्रकार :
- ज्यांच्या मनात असतं, पण ते कधीच बोलू शकत नाहीत.
- ज्यांच्या मनात काहीच नसतं, ते फक्त बोलतात, बाकी त्यांचं मन साफ असतं.
खरोखर बऱ्याचदा पुरुष या दोन कॅटेगिरीमध्येच आपल्याला बसलेले दिसतात. मला वाटतं, यांचं मुख्य कारण म्हणजे, आधीपासून ‘पुरुष हा कणखरच असायला हवा’ असं त्यांच्या मनावर सारखं बिंबवलं गेलं आहे. पण जे वाटतं ते व्यक्त होणे म्हणजे दुबळेपणा नसून ते एक कौशल्य आहे, असं म्हणायला सुरुवात करायला हवी.
अंतर
ऐलतीरावर मी
तू पैलतीरावर दूर
उरात माझ्या असंख्य
प्रश्नांचे काहूर
तुझ्या माझ्या कवितेला
कायम मौनाचं अस्तर
कसा व्हावा संवाद
तू मोघम मी सविस्तर


