भाग – 20
“आई, मला बोलावणं आलंय एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला जायला!” ती उत्साहाने ओरडली.
“बापरे, मोठ्या कंपनीत! वा गं अन्वी…” प्राजक्ता आनंदाने म्हणाली. पण निशाच्या डोळ्यांत एक विचित्र चमक दिसली… ती लगेच अन्वीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली,
“खूप छान गं! आता आपल्यालाही अभिमान वाटेल… एक काम कर, उद्या इंटरव्ह्यूला जाताना आराध्यालाही घेऊन जा. तुझ्याबरोबर तिचाही इंटरव्ह्यू होतो का बघ!”
बोलताना तिचा सूर अगदी सहज होता, पण आतल्या आत तिचा डाव शिजलेला होता — आराध्याला सोबत नेताना काही तरी घडवायचं होतं… एक असं जाळं पसरायचं होतं जिथून आराध्या सहज बाहेर पडू शकणार नाही…
निशा अन्वीला म्हणाली, “उद्या तू इंटरव्ह्यूला जातेस तेव्हा आराध्यालाही सोबत घे. तिलाही मुंबई शहर बघता येईल, तिलाही जर इंटरव्ह्यू देता आला आणि जॉब मिळाला तर उत्तमच होईल.”
हे ऐकताच प्राजक्ता क्षणभर गोंधळलीच. आतापर्यंत आराध्याला टोकणारी, तिच्या अंगावर ओरडणारी निशा… हीच का ती बाई? तिनं इतकं सहजपणे आराध्याला शहरात नेण्याचा सल्ला दिला! बरं वाटतंय हे ऐकून… पण… प्राजक्ताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तरी तिनं काही बोलायचं टाळलं. आराध्याचं भलं होईल, हेच पाहणं तिच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं.
शांताबाई — म्हणजेच लक्ष्मी आजी — या घरातल्या खूप दिवसांच्या साक्षीदार… त्यांनी निशाकडे पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरील कृत्रिम हसू ओळखूनही काही न दाखवत त्या हलकेच म्हणाल्या, “देव बदल घडवतो म्हणतात, पण इतकं पटकन? पण जाऊ दे, घरात माणूस बदलतो हेच मोठं!”
प्राजक्ताच्या खांद्यावर हात ठेवत त्या कुजबुजल्या, “…तरी लक्ष ठेवच, पोरीला आपल्यापासून दूर पाठवताना काळजी घेत जा.”
घरात एक वेगळंच वातावरण होतं — वरून शांत, पण आत खोलवर कुठेतरी अनामिक गूढता होती… सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण कोणाला ठाऊक नव्हतं की, उद्याचा दिवस फक्त इंटरव्ह्यूचा नव्हे, तर एक मोठा वळण असणार आहे आराध्याच्या जीवनासाठी…!
सकाळी लवकरच घरात थोडी लगबग सुरू होती. आराध्या आणि अन्वी नाश्ता करून तयार झाल्या. अन्वीने ट्रेंडी फॉर्मल ड्रेस घातला होता, चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. दुसरीकडे आराध्या एक साध्या पंजाबी ड्रेसमध्ये, चेहऱ्यावर सौम्य कुतूहल आणि थोडासा गोंधळ. तिच्यासाठी ही एक वेगळीच दुनिया होती — मुंबई!
तिच्या डोळ्यांत वेगळं काही पाहण्याची उत्सुकता होती, पण मनात थोडी भीतीही दडलेली होती. “अन्वी सोबत आहे ना,” असं स्वतःला बजावत ती दाराच्या दिशेनं निघाली.
तेवढ्यात दारात शेखर उभा — अन्वीचा कॉलेजमधला मित्र. त्याचं हसणं खूप आपुलकीचं वाटत होतं…
“चला लेडिज! ट्रेन मिस झाली तर, इंटरव्ह्यू तसाच मिस होईल,” तो मिश्कीलपणे म्हणाला.
अन्वी पटकन पुढे झाली आणि आराध्या थोडी मागे, पण नजर मुंबईकडं लागली होती. दोघींनीही आपली आजवरची मिळकत असलेली सर्टिफिकेटची फाइल सोबत घेतली होती…
“आराध्या, घाबरू नकोस, मी आहे ना!” अन्वीने तिला दिलासा दिला.
गाडी निघाली… मुंबईच्या गर्दीत एक नव्या अनुभवांची वाट सुरू झाली होती. आराध्यासाठी ही फक्त एक सहल नव्हती — ही होती एका नव्या अध्यायाची सुरुवात… ज्यात नुसतीच नोकरी नव्हे, तर अनेक अनपेक्षित वळणं तिची वाट पाहात होती.
हेही वाचा – आराध्याविरोधात निशा अन् माधवने कट रचला, पण…
ट्राफिकच्या कोलाहलातून तास दीड तासाच्या प्रवासानंतर अखेर ते तिघं एका भव्य, टोलेजंग आणि अत्यंत आधुनिक अशा टॉवरसमोर येऊन थांबले. टॉवरची रचना कोणत्याही कॉर्पोरेट टॉवरसारखी वाटतं नव्हती, जणू प्रत्येक खोलीसमोर सुरेख गॅलरी होती. सिक्युरिटीचा सिग्नेचर रिसेप्शन डेस्क आणि सुरक्षेबरोबरच असलेल्या फॉर्मल पोशाखातील माणसांची लगबग – आराध्यासाठी हे सगळं अगदीच नवीन होतं.
ती एकटक वर पाहत राहिली. त्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक विस्मयाची झलक उमटली.
“अन्वी… हे ऑफिस? हे मी कुठंतरी पाहिलं आहे… हो ना, एका हिंदी मुव्हीत! कुठल्यातरी थ्रिलर सिनेमात!” ती हळू आवाजात म्हणाली.
अन्वी आणि शेखर दोघंही तिच्याकडे पाहून हसले.
“हो गं! अरे, किती फिल्मी आहेस तू! पण खरंय तुझं, इथे बऱ्याच मुव्हींचं शूटिंग झालं होतं… कुठलातरी रोमँटिक थ्रिलर होता ना तो,” अन्वीने मान डोलावली.
शेखर हसत म्हणाला, “बाहेरचं बघायचं काम संपलं असेल तर, आता आत जाऊयात का, मॅडम आराध्या?”
आराध्या ओशाळून थोडं हसली, पण तिच्या मनात काहीतरी उगाचंच खटकायला लागलं होतं. का कुणास ठाऊक, ती बिल्डिंग तिच्या स्मरणशक्तीला केवळ सिनेमापुरतीच नव्हे, तर कुठल्यातरी गूढ, अस्पष्ट आठवणीशी जोडलेली वाटू लागली.
तिघंही आत चालू लागले. रिसेप्शनच्या स्वच्छशा काचेपलीकडून कुठल्याशा नजरा त्यांच्याकडे वळलेल्या होत्या… विशेषतः आराध्याकडे. तिच्या नकळत, तिच्या या पावलांनी एका नव्या रहस्याच्या दाराची कडी वाजवली होती.
आराध्या त्या भव्य बिल्डिंगकडे पुन्हा एकदा आश्चर्याने पाहत होती. नाव वाचून ती लिफ्टच्या दिशेने जाताना थांबली आणि अन्वीला हळू आवाजात विचारलं, “अगं, हे तर फाइव्ह स्टार हॉटेल आहे ना? आपला इंटरव्ह्यू आहे असं म्हणाली होतीस… मग इथे?”
अन्वी आणि शेखर एकमेकांकडे पाहून हसले. शेखर थोडा मिश्कीलपणे म्हणाला, “तुला काय वाटलं? कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे नेहमी लांबलचक काचांची इमारत असते का? काही काही लोकांना खासगीपणा लागतो, म्हणून ते अशा जागांवर बोलावतात.”
अन्वीनेही लगेच हसत आराध्याच्या खांद्यावर हात ठेवला, “आरू, आपण शेखरच्या ओळखीतून इथे आलोय. इंटरव्ह्यू नाही, ही तर आपल्यासाठी खास मीटिंग आहे आणि शेखर म्हणाला ना, जॉब तर फिक्स आहेच. केवळ फॉर्मल भेट आहे… कंपनी ओनरला थोडक्यात आपल्याला एकदा पाहायचंय इतकंच.”
पण आराध्याच्या मनात काहीतरी गडबड असल्याचं जाणवत होतं. तिचं अंतर्मन तिला सावध राहायला सांगत होतं.
“तरीसुद्धा… इतक्या मोठ्या कंपनीचा ओनर जर भेटायला बोलावत असेल, तर त्यांनी कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये बोलावलं असतं ना?” ती नकळत पुटपुटली.
हेही वाचा – गुरुजी आराध्याला म्हणाले, “सावध रहा”; कारण…
शेखरने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत लिफ्टचे बटन दाबलं.
“रिलॅक्स आराध्या, तू खूप विचार करतेस. मुंबईत अशा गोष्टी नॉर्मल आहेत. हाय लेव्हल लोकांचं सगळंच थोडं वेगळं असतं.”
लिफ्टमधून वर जाताना आराध्या शांत होती. तिच्या मनात अस्वस्थतेचे हलकेसे वादळ उठत होते.
पंधराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली. दार उघडल्यावर समोर आली एक आलिशान लॉबी… मंद सुगंध आणि अत्यंत खास आणि प्रायव्हेट असणाऱ्या खोलींची रचना…
ते क्षण होते तिच्या नशिबाच्या एका नव्या वळणाच्या उंबरठ्यावरचे….
हाऊसकिपींग करणाऱ्याला सांगताच त्याने एक रूम उघडून दिली…
आराध्या खोलीत प्रवेश करताच जणू क्षणभर विस्मरणात जाते. खोलीत मंद सुगंध दरवळत होता, गुलाबी-निळ्या प्रकाशात न्हालेली भिंती, मखमली सोफे, आणि मोठ्या काचेच्या खिडकीतून दिसणारा अथांग समुद्र… ती पहिल्यांदाच इतक्या भव्य, आलिशान जागेत आली होती.
शेखर आणि अन्वी आरामात बसले होते. शेखरने हाऊसकिपिंग करणाऱ्याला काही सूचना दिल्या आणि त्याने एका सौम्य हसऱ्या चेहऱ्याने, “सर लवकरच येतील, तोवर तुम्ही फ्रेश होऊन या,” असं म्हणून दरवाजा लावून घेतला.
आराध्या मात्र एका बाजूला उभी राहून खोलीचे बारकाईने निरीक्षण करत होती. दरवाज्यापासून खिडकीपर्यंत, सजावट, पडदे, शोभेच्या वस्तू – सगळ्या गोष्टी तिला विलक्षण आकर्षक आणि थोड्याशा परक्याही वाटत होत्या.
तिचं लक्ष समोरच्या पारदर्शक काचेच्या मोठ्या खिडकीकडे गेलं… आणि त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक निरागस आनंद झळकला.
“इतकं सुंदर दृश्य मी फक्त चित्रपटांमध्येच पाहिलं होतं…” ती स्वतःशीच बोलली.
समुद्राच्या लाटा लांबवर, किनाऱ्यावर आदळत होत्या. सूर्यप्रकाश त्या लाटांवर चमकत होता आणि तिच्या डोळ्यांत एक अनामिक चमक निर्माण करत होता. तिचं मन क्षणभर सगळी शंका, सगळं अस्वस्थतेचं सावट विसरून त्या दृश्यात हरवून गेलं.
पण हाच क्षण… तो क्षणच होता जिथून गोष्टी अचानक कलाटणी घेणार होत्या… आराध्याचं अंतर्मन तिला काहीसं सावध करायचा प्रयत्न करत होतं, पण त्या भव्यतेच्या मोहात ती हलक्याच सुरात हरवलेली होती…


