भाग – 22
खूप वेळ आरू रडत होती. बऱ्याच वेळानंतर भावनाने तिला उठवून बेडवर बसवलं आणि तिला पाणी पाजलं. भावनाच्या मांडीवर डोक ठेवून आरू तशीच शून्यात नजर लावून बसली होती… भावना तिच्या केसांत हात फिरवत होती… कधीतरी उशिरा तिला तशीच झोप लागून गेली…
आज लग्न होतं. सगळ्यांची घाईगडबड सुरू होती. मंडप सजला होता. सनई चौघड्याचे सूर सगळीकडे घुमत होते. डीजेवर गाणी वाजत होती. लहान-मोठी मुले त्यावर नाचत होती…
राम आणि शिवची वाजतगाजत वरात निघाली होती, घोड्यावर बसून… ते मारुत च्या मंदिरात दर्शन करून लग्नमंडपात येणार होते. इकडे आरू आणि सिया, त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये तयार होत होत्या…
“वॉव दि! खूप सुंदर दिसतेस तू…” पूर्वी आरशातून सियाकडे पाहात हसून म्हणाली.
त्यावर सिया गालात हसली… आज सियाच्या चेहऱ्यावर ग्लो चढला होता… तिच्या डोळ्यांत आनंद झळकत होता… शेवटी आज तिला तिचं प्रेम मिळणार होतं! इतक्या वर्षाचा विरह आज संपणार होता. ज्याच्यावर प्रेम होतं, तो आज तिचा नवरा होणारं होता… भलेही नशिबाने तिच्यासोबत अजीब खेळ खेळला होता… दुसरे पणा तिच्या नशिबी आला होता, पण तिला खात्री होती, राम तिला या गोष्टीची जाणीव देखील होऊ देणार नाही… भलेही सध्या तो रागात असला तरी! त्याच्या रागाचं कारण माहीत नाही… तरीही तो तिला त्रास होईल, असं वागणार नाही, याची खात्री होती. त्यामुळे तिने सगळ्या गोष्टी बाजूला सारून, हे लग्न मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न ती करणार होती.
हेही वाचा – राम आणि पवनच्या बोलण्यातून आरूला समजलं की…
तसं तर हे सोपं नव्हतं. पाहिल्या लग्नातून मिळालेल्या जखमा खूप खोलवर होत्या. कठीण होतं सगळं विसरून नवी सुरुवात करणं… पण ज्याच्यासोबत ती नवीन सुरुवात करणारं होती, तो तिला यातून सावरण्यासाठी पुरेपूर साथ देणार याची खात्री होती…
त्या उलट आरू आज उदास होती. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी त्रासदायक होते. असं अचानक लग्न करावं लागतंय म्हणून होणारा त्रास! स्वप्न अधूरं राहण्याची खंत… काहीही चूक नसताना झालेली बदनामी… यामुळे ती तणावात होती. पण यातूनही काहीतरी चांगलं होत होतं. तिच्या दादाचं अपूर्ण राहिलेलं प्रेम त्याला मिळणार होतं… म्हणून तिने स्वतःला सावरलं होतं…. हे लग्न देखील ती स्वीकारत होती!
पण कालच कळलेल्या त्या सत्याने ती हादरून गेली होती. ज्याच्यासोबत तिचं अख्खं आयुष्य जाणार होतं, तोच तिच्या त्रासाचं कारण होता! ज्या इज्जतीसाठी ती आयुष्यभर जपून वागत आली होती, ज्या बापासाठी इज्जत जीवापलीकडे महत्त्वाची होती, तीच इज्जत तिच्या या होणाऱ्या नवऱ्याने धुळीत मिळवली होती! त्याच्यामुळे तिच्या भाऊंना जगासमोर मान खाली घालावी लागली होती आणि त्यासाठी ती शिवला कधीच माफ करणारं नव्हती.
दोघीही तयार होऊन बसल्या होत्या. बस, आता बोलावणं येण्याची प्रतीक्षा आणि दोघी लग्नमंडपात हजर होणार होत्या. दोघींच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणारं होती…
“चला लग्नाची वेळ झाली.. नवरीच्या मामाने नवऱ्या मुलींना घेऊन यावे…” भटजींनी माइकवर घोषणा केली. तसं दोन्ही नवऱ्यामुली लग्नमंडपात आल्या… अर्थात मामाच घेऊन आले. शिव आणि राम आधीच तिथे उपस्थितीत होते. दोघांची नजर त्या दोघींवर गेली तसं त्यांना कसं रीॲक्ट करावं, ते कळेना. खरंतर, सियाला पाहून शिवला समाधान वाटलं होतं, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून!
त्यात ती दिसतही खूप छान होती. नऊवारी साडी… पारंपरिक दागिने… अंबाडा अन् त्यात माळलेले गजरे… तिला नवरीच्या वेशात सजलेलं पाहून त्याचा ऊर भरून आला होता… हलकेच डोळ्यांच्या कडा पाणावल्या…
परदेशातून आला तेव्हापासून उदासीनता तिच्या चेहऱ्यावर तो पाहात आला होता, पण आज तिच्या चेहऱ्यावर ती उदासीनता नव्हती आणि तिचा तो आनंदी चेहरा पाहून, आपण जे केलं ते योग्यच केलं. असं त्याला वाटलं.
त्याच विचारांबरोबर त्याची नजर आरूवर गेली आणि आता जे समाधान त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या बहिणीला पाहून पसरलं होतं, ते जाऊन अपराधीपणाची भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागली आणि त्याला स्वतःचाच राग आला. स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आरूला त्रास दिला होता. तिचा आज जो उदास चेहरा आहे, त्याला तो स्वतः कारणीभूत होता.
आज तिचं लग्न होतं. एका मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे तिचं लग्न! जिथे ती नवीन स्वप्न मनाशी बाळगून, नव्या आयुष्यात प्रवेश करणार असते… एकीकडे माहेर सुटण्याच दुःख तर दुसरीकडे नवीन नाती ती बनवणार असते, आपल्या साथीदारासोबत! गुलाबी स्वप्नांचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर असतो…
पण आरूच्या ना मनात असे विचार होते, ना चेहऱ्यावर दिसत होते… तिनेही सियाप्रमाणेच साजशृंगार केला होता… थोड्याफार फरकाने दोघी सारख्याच सजल्या होत्या… पण कमी होती ती, त्या स्माईलची! आरूच्या डोळ्यांत दुःख होतं…
रामचीही अशीच अवस्था होती. पण त्याने आहे ते स्वीकारलं होतं. त्याला शिवची खात्री पटली होती की, तो आरूला खूश ठेवेल… त्याने शिवच्या डोळ्यात आरूसाठी प्रेम बघितलं होतं… आपल्या बहिणीच्या सुखासाठी दाखवलेला स्वार्थीपणा, केलेला अपराध त्याने प्रामाणिकपणे मान्य केला होता. बाकी आरूचा पण स्वभाव त्याला माहीत होता आणि शिव तिला सांभाळू शकेल, असं त्याला वाटत होतं. पण आपली नाराजी मात्र तो सोडत नव्हता… त्याला खरंच यावेळी आरूचा राग आला होता. पण तिने त्याच्या सुखासाठीच हे सगळं केलं होतं… एकंदरीत काय तर, आरू आणि शिव दोघे सारखेच भासले त्याला! आपल्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात… बाकी या सारख्या स्वभावाचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार होता, ते तर येणारा काळच ठरवणार होता…
सगळ्यांचे आपापले विचारचक्र सुरू होते…
“चला, विवाह सोहळा संपन्न झाला… आता एकमेकांना हार घाला…” भटजी म्हणाले.
तसं हे चौघेही भानावर आले… एकमेकांकडे पाहिलं… नजरानजर झाली… आरू आणि सियाने आधी हार घातले. मग शिव आणि रामने हार घातले… अन् ढोल-ताशांचा आवाज आला… त्या चौघांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला. त्यांच्यासोबत समर, पूर्वी, साधना, भावना, पवन, आकाश हे सगळे होते… सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता… तिकडे तुळशीला पाणी घालणाऱ्या दोन्ही आयांच्या डोळ्यांत पाणी होतं… सखाराम भाऊ सुद्धा भरल्या डोळ्यांनी पाहात होते…
सखाराम दिनकररावांसमोर आले आणि भरल्या डोळ्यांनीच त्यांना हात जोडत म्हणाले, “साहेब, माझी लेक आता तुमची झाली. काळजी घ्या साहेब. काही चुकलंमाकलं तर, मोठ्या मनाने माफ करा. आमची इज्जत राखून लई उपकार केलेत तुम्ही…”
“हं… आम्ही केलेल्या उपकारांची जाणीव ठेवा फक्त, बाकी सगळं होतंच राहील! तुमच्या मुलीला काहीच त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊच, पण तुम्हीही आमचं बोलणं लक्षात ठेवा आणि अंमलात आणा…” दिनकर कोरड्या स्वरात आणि ताठ्यात म्हणाले.
” हो, हो, लक्षात ठेवीन,” सखाराम अडखळत म्हणाले.
स्टेजवरून शिवची नजर या दोघांवर गेली, तसं त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या… कारण, सखाराम यांच्या चेहऱ्यावर हतबलता दिसत होती आणि दिनकररावांच्या चेहऱ्यावर काहीतरी जिंकल्याचा भाव होता… त्याला चांगलंच माहीत होतं की, दिनकरराव या लग्नाने विशेष खूश नाहीत आणि… आणि आता त्या दोघांचे असे भाव त्याला खटकले…
“चला, कन्यादान आणि पुढच्या विधींसाठी… वधू-वरांनी इथे समोरासमोर बसा आणि दोन्ही आई-वडिलांनी पण इथे या…” भटजी म्हणाले. तसं शिव आराधना आणि राम सिया या दोन्ही जोड्या शेजारी शेजारी पाटावर बसल्या. ते जसजसं सांगतील तसतसं या दोन जोड्या करत होत्या… समोर ताटात मंगळसूत्र, जोडवी, कुंकवाचं पंचपाळं… सौभाग्याचं लेणं असलेल्या या वस्तू मस्त सजवून ठेवल्या होत्या… सियाची नजर त्या ताटावर गेली आणि पुन्हा तिच्या पाहिल्या लग्नाच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. तिने शेजारी बसलेल्या रामकडे पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले… राम तिच्याकडेच पाहात होता… तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला कसंतरीच झालं. तिच्या डोळ्यातले भाव त्याला कळत होते… त्याने डोळ्यांनीच तिला धीर देत, ‘रडू नकोस’ असा इशारा केला आणि अलगद तिच्या हातावर हात ठेवला…
त्याच्या तेवढ्या कृतीनेही तिला जणू आधार मिळाला होता… त्याचा स्पर्श आश्वासक होता… तिने अलगद डोळे मिटले अन् मनोमन ठरवलं, आता मागच्या आठवणींना माझ्या पुढील आयुष्यावर हावी होऊ द्यायचं नाही…
पंडितजींनी दोन्ही मंगळसूत्रांना हळद-कुंकू लावून त्या दोघांच्या हातात दिले आणि नवऱ्या मुलींच्या गळ्यात घालायला सांगितलं, आधी रामने सियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं… आणि मग शिवने ते समोर ठेवलेल मंगळसूत्र हातात घेतलं आणि आरूकडे पाहिलं तर ती नजर खाली ठेवून निर्विकारपणे बसली होती… शिवने सुस्कारा सोडत ‘नाही’ अशी मान हलवली आणि पुढे होऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं.
मंगळसूत्र घालताना मागून मानेला त्याच्या थंडगार हातांचा स्पर्ष झाला, तसा तिच्या अंगावर शहारा आला… आणि तिने मान आकसून घेतली… शिवला पण ते जाणवलं… तसा हलकासा हसला आणि पुन्हा एकदा जाणूनबुजून हात मागे घेताना तिच्या मानेवरून फिरवला…
तसं आरुने ओठ दाबून घेत डोळे मिटून स्वतःच्या हृदयाचे वाढणारे ठोके कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अस करण्याने तिच्या अंगाची थरथर होत होती… तिला समजत नव्हतं काय होतंय तिला… आणि तिची ही धांदल शिव मात्र एन्जॉय करत होता… पण एवढं सगळं होऊनही आरूने त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं!
आता एक एक करून पुढचे विधीही पंडितजींनी उरकून घेतले… या सगळयात राम-सियाच्या नजरेचे खेळ सुरू होते तर, दुसरीकडे आरूने एक नजर आपल्याकडे पाहावं म्हणून शिव तिला जाणूनबुजून स्पर्श करत होता… त्याच्या स्पर्शात होता तो फक्त खट्याळपणा! काहीही करून तिने एकदा आपल्याकडे पाहावं, असं त्याला वाटत होतं, पण त्याला माहीत नव्हतं की, आरु किती महाजिद्दी आहे ते! ते त्याला हळूहळू कळणारच होतं… आणि त्यात तिची जी दमछाक होणार होती. त्याची तर त्याला कल्पनाच नव्हती…
आता कन्यादानासाठी त्यांच्या आई-वडिलांना बोलावण्यात आलं. आधी सियाचं कन्यादान करण्यात आलं. त्यात भटजींनी सांगितलं तसं दिनकर यांनी सियाचा हात रामच्या हातात दिला… खाली तांब्याचे भांड मांडल होतं सुधा यांनी सियाला हळद-कुंकू लावलं… तसंच दिनकर यांनी रामला कुंकवाचा टिळा लावला आणि मग त्या दोघांच्या हातात शगून म्हणून अकरा रुपये ठेवून त्यावर हळद, कुंकू, अक्षता टाकून, मग त्यावर पाणी सोडलं… भटजींनी मंत्रोच्चार करत कन्यादान विधी संपन्न झाला, असं घोषित केलं.
यावेळी दिनकरराव आणि सुधा या दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. सिया त्या दोघांकडे पाहात होती. तिच्या पण डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. दिनकररावांनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला हलकेच थोपटले आणि उठून निघून गेले… ते गेले त्या दिशेला शिव आणि सिया दोघेही पाहात होते…
हेही वाचा – शिवने रामकडे काय कबुली दिली?
पदराने डोळे पुसत सुधा रामला, “माझ्या मुलीची काळजी घे,” असं म्हणून त्याही बाजूला झाल्या…
मग आरू आणि शिवचा देखील त्याच पद्धतीने कन्यादान विधी झाला… आरूसाठी पण हा भावूक क्षण होता… तिच्या डोळ्यांतून तर पाणी थांबायच नावच घेत नव्हत .. ती रामकडे पाहून रडत होती… तिच्या रडण्याचा आवाजही वाढला होता. तसं कलावती यांनी तिला डोळे वटारून शांत बस म्हणणं सुरू केलं, पण ती नेहमीसारखं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रामकडे पाहून रडत होती…
भटजींचं काम झालं होतं… त्यांनी त्यांचं सामान गोळा केलं आणि दानदक्षिणा घेऊन तिथून निघून गेले.
“आरु, अगं किती रडणार आहेस? अजून तुझ्या पाठवणीला वेळ आहे ना? थांबव बरं हे रडणं,” भावना तिला समजावत होती. तरी तिचं लक्ष फक्त रामकडे होतं आणि राम तिच्याकडे अजिबात पाहात नव्हता…
आता आरूच्या रडण्याचा आवाज ऐकून सगळे तिच्याजवळ जमले होते..


