नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे. माझ्या लेकीने एकदा मला विचारलं, “आई, उषा कशी आहे गं?” मी ओरडलेच तिला… “अगं त्या काय तुझ्या वयाच्या आहेत का? किती मोठ्या आहेत, वयाने, मानाने! अरे तुरे करतेस त्यांना? मी पण त्यांना ‘अहो, उषा ताई’ म्हणते.” यावर लाडकी लेक म्हणते कशी, “आई, उषा तुझ्या आईपेक्षा एक दोन वर्षांनी लहान असेल म्हणून काय मी तिला आजी म्हणायचं का? बरं, तुझी मैत्रीण म्हणून मी तिला मावशी पण नाही म्हणणार. कारण ती आजी मटेरियल किंवा मावशी मटेरियल नाहीये. She is so cooool… आणि मी तिला उषा म्हणते, ते तिला चालतं. तुला काय प्रॉब्लेम आहे?” झालं माझं तोंड बंद! पण हे आजी मटेरियल, मावशी मटेरियल म्हणजे काय ते मला कळत नाही बाई. खरंतर, उषा ताई कळणंच कठीण आहे…
आता उषा ताई म्हणजे कोण? तर जगप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी. मराठी आणि हिंदी मनोरंजनाच्या दुनियेत धुमधडाका गाजवणाऱ्या अभिनेत्री… आऊ अशी ओळ असलेल्या माझ्या उषा ताई. सहज सुंदर अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणा ही त्यांची खासियत! त्यामुळे इंडस्ट्रीत त्यांना फाटक्या तोंडाची म्हणणारे जास्त आहेत. To the point बोलणे… उगाच कोणाशी लाडे लाडे वागणं नाही… अशी ही स्वच्छ मनाची बाई. उगाच मनात एक ओठात एक हे त्यांना कधी जमणारच नाही. पडद्यावर खाष्ट, कजाग भूमिका करत असल्या तरी त्या स्वभावाने एकदम कूल आहेत…
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…
लोक त्यांना किती ओळखतात माहीत नाही, पण त्यांच्याशी फारशी ओळख नसलेली माणसे सुद्धा विनाकारण त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतात, चुकीचं पसरवत असतात. हे चालूच असतं. पण ते हा विचार नाही करत की, आपण आपली करमणूक करतोय, पण आपल्या बोलण्याचा त्या बाईवर काय परिणाम होत असेल!
बरं, मधे केवढा तो वाद की, त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहात नाही. त्या एकट्याच राहतात… ठिकाय नं, त्यांनी स्वतःच सांगितलं होतं ते. त्याच्यावरून कोण कोण काय काय बोलले!
उषाताई बँकेत नोकरी करून ॲक्टिंग करायच्या. तेव्हा त्या काय, लहान मुलाला पाठीवर बांधून नोकरी, नाटकाच्या तालमी, प्रयोग, शूटिंगला जाणार होत्या का? हक्काचे आजी आजोबा असताना पाळणाघरात तरी का ठेवायचं? त्यामुळे त्यांचा मुलगा आजी, आजोबा, मामा यांच्या सोबत वाढला. काय चुकीच आहे? लोकांना बोलायला काय जातं? बोलून मोकळे होतात, पण कोणाच्या गरजेला मदत करतात का? नाही. हो, मी उषा ताईंबद्दल वाईट बोलू शकत नाहीच, पण ऐकूही शकत नाही. येतो मला राग…
माझ्या लेकीचं लग्न होतं, तेव्हा त्या म्हणाल्या, “मी लग्नाला येणार.” त्यावेळी कोरोनाने थैमान घातले होते. मी आणि माझी बहीण त्यांना पत्रिका द्यायला गेलो होतो. आईस्क्रीम देऊन त्यांनी पाहुणचार केला. सगळं घर दाखवलं. खूप खूश होत्या. निमंत्रणाला मान देऊन त्या लग्नालाही आल्या… मस्त पैठणी नेसून तयार होऊन घरच्या लग्नाला यावं तशाच! मास्क मात्र लावला होता, तेव्हाची ती गरजच होती. इतर नातेवाईकांप्रमाणेच त्या लग्नाच्या हॉलमध्ये बसल्या होत्या… कसल्याही विशेष पाहुणचाराची अपेक्षा न करता! जो तो “अगं बाई उषा नाडकर्णी?” म्हणत होता… कौतुकच वाटत होतं सगळ्यांना. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता. उपवास म्हणून त्यांनी काहीच खाल्लं नाही, याचं मात्र आम्हाला वाईट वाटलं… कोरोना पसरलेला असताना, आता तुम्हीच सांगा काय गरज होती, त्यांना माझ्या मुलीच्या लग्नाला यायची? पण त्या आल्या. त्या खरंतर प्रेमळ आहेत… माणुसकी तर एवढी भरलीय की, त्यांना ओरडावे लागते. किती लोकांना त्यांनी आर्थिक मदत केली. अशी लोक की, जे पैसे तर परत करत नाहीत वर तोंडही लपवतात आणि त्यांच्याबद्दल वाईट-साईट पसरवतात.
हेही वाचा – मानो या ना मानो…
त्यांची नात, मुलाची मुलगी उड्या मारत असताना पडली, उठलीच नाही. या घाबरल्या… तिला उचललं तर, पोट्टी म्हणते कशी, “मी ॲक्टिंग करत होते!” म्हटलं, “घ्या, उषाताई लेकाने नाही, पण नातीने घेतला तुमचा गुण…” त्यांचा फोन आला की, माझा नवरा म्हणतो, ‘चला तासभर फुरसत.’ मग तो फोन पूर्ण होईपर्यंत तो मला हाक पण नाही मारणार. काही हवे असेल तर तो स्वतःच घेतो. इतकी छान आहे माझी मैत्रीण. लोकांना कुचाळक्या करायला आवडतात. मग मला राग येतो.
एकच सांगण, ज्यांना आपण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल तोंड सोडून बोलू नये. कोणी दाखवलं नाही तरी, संबंधित व्यक्ती दुखावली जातेच!


