दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 26 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 04 आश्विन शके 1947; तिथि : चतुर्थी 09:32; नक्षत्र : विशाखा 22:08
- योग : विष्कंभ 22:49; करण : बव 22:47
- सूर्य : कन्या; चंद्र : तुळ 15:22; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:31
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
ललिता पंचमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस संमिश्र असेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कायदेशीर वादात यश मिळेल. आज असा एखादा निर्णय घ्यावा लागेल, ज्याचा इतरांना त्रास देईल. हा निर्णय तुम्हालाही मनापासून घ्यायचा नसला तरी, परिस्थितीमुळे तो घ्यावा लागेल. संततीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो.
वृषभ – आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. दुपारी नशिबाची मोठी साथ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. त्याचवेळी आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संध्याकाळी एखाद्या परिचिताच्या अचानक येण्यामुळे आनंदी व्हाल. रात्री एखाद्या शुभ समारंभाला उपस्थित रहाल.
मिथुन – आजचा दिवस सकारात्मक असेल. तुमचे वर्तन आणि सामाजिक प्रतिमा फायदेशीर ठरेल. कामावर सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे देखील दिसतील. दुसरीकडे,, नोकरीच्या ठिकाणी कामाची गती मंदावल्याने मानसिक ताण येऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमागे दुहेरी अर्थ असू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा.
कर्क – कर्क राशीच्या जातकांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. डॉक्टरांची भेट घेणे योग्य ठरेल. यानंतरच दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. आज मानसिकदृष्ट्या देखील सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
सिंह – सिंह राशीच्या जातकांचा दिवस खूप छान जाणार आहे. आज व्यवसायाची काळजी करण्याची गरज नाही, कारण व्यवसायाची गाडी व्यवस्थित सुरू राहणार आहे. शिवाय, वरिष्ठांकडून मिळालेला पाठिंबा कामाला बळकटी देईल. आज टीकाकार आणि विरोधकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जात रहा.
हेही वाचा – ऐलमा पैलमा…
कन्या – या राशीच्या जातकांना इतरांना मदत करायला आवडते. मूड चांगला असेल तर हे जातक प्रियजनांना तसेच पाठीमागून त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांनाही मदत करू शकतात. आज मित्रांसोबतचे तुमचे संबंध मजबूत होतील. याव्यतिरिक्त, त्यांच्याशी काही फायदेशीर चर्चा देखील होऊ शकते.
तुळ – तुळ राशीच्या जातकांसाठी एखादी परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही कागदपत्रे असतील तर ती आजच पूर्ण करणे चांगले राहील. दुपारची वेळ इतर कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने चांगली आहे. या वेळेत हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत.
वृश्चिक – आजचा दिवस संमिश्र तरीही फलदायी असेल. तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या गोष्टी घडू शकतात. तुम्ही जिला सज्जन व्यक्ती समजत होतात, तीच तुमचा विश्वासघात करू शकते. त्यामुळे आज थोडे सावध राहण्याची गरज आहे. काही कामांमधील यश आनंद देईल, निराशा दूर करेल.
धनु – आजचा दिवस धनु राशीच्या जातकांसाठी काहीसा दिलासा देणारा असेल. गेल्या काही दिवसांपासून कामात ज्या समस्या येत होत्या त्या दूर होतील, परिस्थितीत सुधारणा दिसायला लागेल. मात्र या सर्वांमध्येही, काही अनावश्यक गोष्टी चिंता निर्माण करतील. घाईत निर्णय घेणे टाळा, संयमाने काम करणे फायदेशीर ठरेल.
मकर – आजचा दिवस बुद्धिमत्तेला चालना देणारा असेल. काही आदरणीय व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे फायदे मिळतील. प्रियजनांकडून एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते. कुटुंबात होणाऱ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्याबाबत तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.
कुंभ – आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाशी संबंधित बाबींवर विशेष लक्ष द्या. जवळच्या व्यक्ती तुमच्या चिंतांमध्ये भर घालतील. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. कौटुंबिक जीवनाबद्दलचे कोणतेही प्रश्न सामंजस्याने लवकरच सोडवावे लागतील.
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
मीन – आजचा दिवस खूप व्यग्र राहील. दुपारपर्यंत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल, प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. दुपारनंतरचा वेळ फारसा अनुकूल नाही. या काळात विविध अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण देखील येऊ शकतो.
दिनविशेष
नाटककार, संपादक विद्याधर गोखले
टीम अवांतर
संगीत नाटकांचे सिद्धहस्त लेखक आणि संपादक विद्याधर गोखले ऊर्फ अण्णा यांचा जन्म 4 जानेवारी 1924 रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला. विद्याधर गोखले यांचे शालेय शिक्षण आणि त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावती येथेच झाले. त्यांनी संस्कृत आणि मराठी या दोन विषयांत एम. ए. पदवी मिळवली. अमरावतीमधील नाटककार आणि स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी यांच्या लेखनाचाही विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. वीर वामनराव जोशी आणि अमरावतीतील इतर दिग्गजांच्या सहवासात अण्णांनी वक्तृत्वकलेवरही प्रभुत्व मिळवले. त्याच काळात उर्दूचादेखील अभ्यास केला. पुढील काळात संस्कृत, उर्दू आणि मराठी या भाषांवरील प्रभुत्व त्यांना अतिशय उपयोगी पडले. 1944 साली ते मुंबईत आले. कुर्ला येथील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत काही वर्षे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे अध्यापन त्यांनी केले. पुढे शिक्षकी पेशा सोडून गोखले यांनी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. पुढे अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. ‘लोकसत्ता’चे संपादक म्हणूनही त्यांनी जवळजवळ पाच वर्षे काम केले. पत्रकारिता करत असताना नाट्यलेखनाला सुरुवात केली. अण्णांनी मरगळ आलेल्या मराठी रंगभूमीला नवीन संजीवनी देण्याचे अतुलनीय काम केले. अण्णांनी 1960 ते 1983 या काळात 18 नाटके आणि 66 नाट्यगीते लिहिली. त्यांची ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा अनेक विषयांवर लिहिलेली नाटके प्रचंड गाजली. त्यांची संगीत नाटके आणि त्यातील नाट्यपदे यांची मोहिनी मराठी मनावर तरळत आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके ‘मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले’ असे जणू समीकरणच होते. त्यांच्या गाजलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकासह संगीत सुवर्णतुला, पंडित राज जगन्नाथ, मंदार माला, मदनाची मंजिरी, जय जय गौरीशंकर, स्वर सम्राज्ञी, बावन्न खणी, जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा या सारखी संगीत नाटके आणि अण्णांनी लिहिलेली. “जय गंगे भागीरथी”, “जय शंकरा गंगाधारा”, “जयोस्तुते हे उषा देवते”, “नयन तुझे जादुगार”, “नारायणा रामा रमणा”, “भरे मनात सुंदरा”, “मदनाची मंजिरी साजिरी”, “ऋतुराज आज वनी आला” यासारखी त्यांची नाट्यगीते आजही रसिकप्रिय आहेत. 1993 मध्ये सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याआधी 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दादर भागातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले होते. अशा या बहुआयामी व्यक्तीचे 26 सप्टेंबर 1996 रोजी निधन झाले.


