Sunday, June 15, 2025
Homeललितमन ‘वडा’य ‘वडा’य...

मन ‘वडा’य ‘वडा’य…

मनोज जोशी

‘वडा’! हा शब्द नुसता कानावर पडला तरी, तोंडाला पाणी सुटतं. एकेकाळी मी रोज वडा खाणारा. नंतर नंतर, ‘साखर कारखानदार’ झाल्यानंतर सर्वच जण दम देत होते, अगदी घरच्यांपासून मित्र-मैत्रिणींपर्यंत. पण मन काही ऐकत नव्हतं. तथापि, अलीकडे मी वडा खाणं पूर्णपणे बंद केलंय. लहानपण गिरगावात गेलं. त्यावेळी आमच्या गल्लीच्या नाक्यावर सिनकर हा वडापावची गाडी लावत असे. त्याच्याकडे मिळणारा वडा मस्तच होता. त्यानंतर कांदेवाडीत नानिवडेकरच्या दुकानासमोर बोरकर असायचा. तेथेही वड्यांसाठी खूप गर्दी असायची. आता हे दोघेही आहेत की नाहीत… माहीत नाही. लहानपणापासूनच अशी चटावलेली जीभ असल्यानं रस्त्यात जाता-येता कुठे गरम-गरम वडा पाहिल्यावर पावलं थोडीशी घुटमळायचीच.

एकवेळ ‘मला वडा ‘फारसा’ आवडत नाही,’ असं सांगणारी व्यक्ती भेटेल; पण ‘मला वडा अजिबात आवडत नाही,’ असं सांगणारा माणूस विरळाच! आता हा विषय तसा पट्टीच्या खवय्याचा आहे. मी वडा खात असे, तो केवळ शौक म्हणून… वडा जर खमंग, चविष्ट असेल तर जिव्हा तृप्त होते! यासाठी सर्व ‘भट्टी’ जमून येणं, गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं वड्याचं कव्हर! हे कव्हर पातळ असेल आणि मिश्रण मसाला देखील प्रमाणात असेल तर, क्या बात है! गर्दी आपोआप तिथं खेचली जाते. काही वडेवाले आहेत, जे ‘लालबागच्या राजा’सारखा फंडा वापरतात. ‘लालबागचा राजा’ जसा ‘नवसाला पावणारा’ असतो, तसा त्याच्याकडला वडा ‘खमंग, रुचकर’ वगैरे वगैरे असतो. पण जे अस्सल खवय्ये आहेत, ते अशा गोष्टींना फसत नाहीत. असो.

माझी पहिली पसंती होती ती, दादरच्या कबुतरखान्याजवळील ‘शिवसेना वड्या’ला. तो ‘सुध्याचा वडा’ म्हणूनही ओळखला जातो. जवळपास 50 वर्षांपूर्वी सुधारकर म्हात्रे यांनी ही वडापावची गाडी सुरू केली आणि तिचं उद्घाटन प्रत्यक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. आता हा व्यवसाय त्यांचा मुलगा वैभव म्हात्रे सांभाळत आहे. ती गाडी जिथं उभी राहते, त्या गल्लीत माझं आजोळ होतं. त्यामुळं लहानपणापासून या वड्याची चव मला परिचित आहे. आजही ती तशीच आहे, जिभेवर रेंगाळणारी. त्यातही या वड्याचा लौकिक असा आहे, तिथे लोक गाड्या थांबवून पार्सल घेतात आणि पुढे जातात, महिलाही तिथे उभं राहून त्या वड्याचा आनंद घेताना दिसतात.

हेही वाचा – सेम टू सेम!

वडे त्या गाडीवर तयार होत नाहीत, जवळच एक रूम आहे, तिथे ते बनतात आणि ते गाडीवर आणले जातात. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वड्यासाठी स्वच्छ काचेचं बॉक्स तयार केले आहे. त्यात कोणी हात घालून वडा गरम आहे का? हे बघायला गेलं तर, (अशी घाणेरडी सवय काहीजणांना आहे) वैभव हात ढकलून देतो आणि सांगतो, ‘वडा गरमच आहे, हात लावायचा नाही. माझ्याकडे इतरही गिऱ्हाईक येतात. त्यांच्यासाठी हे चांगलं नाही. तुम्हाला खायचं असेल तर खा, नाहीतर जाऊ शकता’! यासाठीत बहुदा त्याच्याकडे वडे खायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असावी…

चिंचपोकळी स्टेशनजवळ पुलावरून खाली उतरलं की, विजय परब यांचा ‘टेस्टी वडा’देखील खूपच रुचकर आहे. ‘लोकमत’ जॉइन केलं (2002-2003) तेव्हा ऑफिस चिंचपोकळीला होतं. विजय परब यांच्या गाडीवर सायंकाळी कायम गर्दी दिसायची. सुरुवातीला तिथे खाऊ की नको, असा प्रश्न पडायचा. ऑफिसमध्ये कुणाला वडा किंवा वडापाव पाहिजे, असेल तर ऑफिसबॉय आणून द्यायचा. एक दिवस मीही मागवला आणि…. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या गाडीवर थांबल्याशिवाय ऑफिसमध्ये येत नसे. कालांतराने विजय परबही चांगला ओळखीचा झाला होता. तो ‘थांबा’ अशी खूण करायचा, गरम वड्याचा घाणा आला की पहिला वडापाव मला द्यायचा.

‘लोकमत’चं ऑफिस चिंचपोकळीवरून सानपाड्याला शिफ्ट झालं. तिथं सानपाडा स्टेशनसमोरच वडापावचे दुकान होते. तिथेही वडापाव खात असे, पण केवळ वडा आवडतो म्हणूनच! 2012मध्ये ‘लोकमत’ पुन्हा जॉइन केले, तेव्हा ते ऑफिस काही काळासाठी ‘निरलॉन हाऊस’ला होते, नंतर ते वरळी नाक्याला नेले. तिथं ट्रॅफिक पोलीस चौकीच्या समोर वडा चांगला मिळतो. अतिशय उत्कृष्ट नसला तरी, चांगली चव आहे. तेथूनच थोडं चालत बीडीडी चाळीच्या दिशेनं गेलं तर, तिथं ‘मंचेकर वडा’ प्रसिद्ध आहे. वडा टेस्टी आहे. ऑफिसला जाताना दोन स्टॉप आधी उतरून ‘थोडंस चालणं आणि वडा खाणं,’ असे दोन्ही हेतू साध्य करीत होतो. पण दादरला उतरल्यावर प्राधान्य शिवसेना वड्यालाच!

हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह

विरारमध्ये दोन वडेवाले फेमस. एक विठ्ठल मंदिरच्या पाठिमागे (तो आता रिलायन्स मॉलसमोर आहे) आणि दुसरा दोन नंबर प्लॅटफॉर्मजवळ होता. (आता तिथे मोबाइल एक्सेसरीजचं दुकान आहे). आता सर्वात फेमस आहे तो, ‘परेश वडापाव.’ इतरांच्या तुलनेत त्याची किंमत जास्त असली तरी, त्याची चव आणि आकार पाहता, ती योग्यच होती.

रेल्वे स्टेशनवरील वडेही टेस्ट केले

वडे खाण्यासाठी मी कुठंही जात होतो आणि कुठलाही वडा खात होतो. म्हणून रेल्वेस्टेशनवर मिळणारे वडेही मी टेस्ट करत असे…

वरळी नाक्याला लोकमतचे ऑफिस शिफ्ट झाल्यावर मी प्लाझाच्या समोर, टिळक ब्रीजवर बस पकडत होतो. त्यावेळी मी विरारवरून दादर ट्रेनने येत असे. त्यामुळे मी पाच नंबर प्लॅटफॉर्मवर विरारच्या दिशेने दुसऱ्या स्टॉलवर वडापाव खात असे. तिथेही खास गरम वडे माझ्यासाठी बाजूला केले जायचे.

तर घरी येताना मरीन लाइन्सला प्लॅटफॉर्म नंबर एकवर चर्चगेटच्या दिशेने दुसरा स्टॉल माझा वड्यासाठी ठरलेला होता. वरळी नाक्यावरील ऑफिसमधून रात्री साधारणपणे बारा-सव्वाबारा वाजता निघत असे. पण कधीतरी सुदैवानं (माझ्या आणि त्या वडेवाल्याच्या) अर्धा तास लवकर ऑफिसमधून निघायला मिळालं तर, महालक्ष्मीवरून थेट मरीन लाइन्सला जात असे आणि तिथं वडे खात होतो.

तर कधी फारसा वेळ हाती नसला तर, महालक्ष्मीवरून एलफिन्स्टनला (आताचे प्रभादेवी स्टेशन) जात असे. चर्चगेटच्या दिशेला असलेल्या या स्टॉलवर कायम गर्दी असायची. (आता असते का, ते माहीत नाही. सध्या प्लॅटफॉर्मवर काहीही तळण्यास बंदी आहे) प्लॅटफॉर्मवरच्या इतर स्टॉलवर शुकशुकाट असायचा. या स्टॉलवरचा रगडा जास्त फेमस आहे. पण तिथे माझ्यासारख्या वडा खाणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती.

रात्री उशिरा विरारला जाता-जाता कांदिवलीलाही उतरत असे. प्लॅटफॉर्म नंबर एकवर विरारच्या दिशेनं दुसऱ्या स्टॉलवर वडा खात असे. पण आता बहुधा कॉन्ट्रॅक्टर बदलला असावा, कारण स्टॉलवरची माणसंही वेगळी आहेत आणि चवही बदलली आहे.

रात्री उशिरा दादर स्टेशनच्या मेनगेटसमोर लागणाऱ्या वडापावच्या स्टॉलवरही मी जात असे. तिथेही वड्याची चव चांगली होती. तो विक्रेता आहे बंगाली आणि मालक आहे मराठी!

नाशिकमध्येही वड्यासाठी वणवण

सर्वात गमतीची गोष्ट अशी की, 2011-12 ला मी नाशिकमध्ये होतो. तिथे ‘दिव्य मराठी’मध्ये रुजू झालो होतो. पण वडा खायचा शौक काही सोडला तयार नव्हतो. तिथेही मी ठिकठिकाणी ‘वडा’ खात असे (म्हणजे टेस्ट करीत असे). अशोक स्तंभाजवळ दोन वडेवाले आहेत. ‘मुंबईचा वडा’ म्हणून ते ओळखले जात असल्याचे अनेकांनी सांगितलं. पण मला वडा पसंत पडला तो, ‘फ्युजन फास्टफूड’मधला! वकीलवाडी अर्थात पंचवटी हॉटेलजवळच हे फास्टफूड होतं. नाशिकमध्ये आणखी एक खासियत आढळली; तिथे अशा काही वड्याच्या गाड्या होत्या की, श्रावण महिन्यात ज्यावर वड्याऐवजी साबुदाण्याचे वडे मिळत होते!

हेही वाचा – लेखिका कविता महाजन यांची अविस्मरणीय भेट

बिच्चारा, पितळे वडेवाला

कॉलेजला असताना हनुमान रोडवरील चौकात पितळे यांच्याकडे वडा खात असे. मी आणि एक मित्र वरचेवर जात असू. पैसे मित्राचे असो वा माझे, ते द्यायला जायचा तो मित्रच. शेवटचा घास तोंडात ठेवून तो, तिथल्या काऊंटरवर जायचा… तिथं त्याला विचारलं जायचं कितीचे घ्यायचे, तो बोटांनी ‘दोन’ची खूण करायचा अन् तो काऊंटरवरचा माणून दोन वडापावचे पैसे घ्यायचा. प्रत्यक्षात आम्ही दोघे प्रत्येकी दोन-दोन वडापाव खात होतो. नंतर-नंतर त्यांनी कूपन सिस्टीम सुरू केली!


(ही सर्व ठिकाणं उत्कृष्ट आहेत अन् तिथल्या वड्याला तोड नाही, असा माझा अजिबात दावा नाही. फक्त जिभेचे चोचले पुरवणारी ही माझी ठरलेली ठिकाणं होती, एवढंच!)

[क्रमश:]

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!