स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, कोशिंबीर, मिरचीचा ठेचा करताना या टिप्स वापरून पाहा.
- टोमॅटो सॉस किंवा सूप केल्यावर आपण टोमॅटोचा रस गाळून घेतो. त्या वेळी गाळणीच्या वर राहिलेला टोमॅटोचा चोथा फेकून न देता त्याचा असा उपयोग करता येईल – चमचाभर तेलावर थोडा कांदा लाल होईतो परतून त्यात चमचाभर लसूण-आल्याची पेस्ट आणि थोडे मीठ टाकावे. नंतर त्यात वरील चोथा टाकून चांगले परतावे. हे मिश्रण पिझ्झावर पसरायला, ब्रेडवर पसरायला किंवा भाजीचा रस्सा दाट आणि लाल करण्यासाठी उपयोगी पडेल.
- या दिवसांत आंब्याचं लोणचं जुने झालेलं असते. तर त्याच्या खारात (दोन टेबल स्पून, पाव किलो कारल्यासाठी) धणे पूड, कोथिंबीर, एक चमचा गरम मसाला घालून हे सारण कारल्यात भरून फोडणीस टाकावं. झाकणावर पाणी ठेवून शिजवावं तसेच शेवटी भरपूर गूळ घालावा आणि उतरवावं. असा उरलेल्या खाराचा उपयोग खूप छान होतो आणि भाजी अजिबात कडू होत नाही.
हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…
- मसाल्याच्या भाज्या (जसे वांगी, छोले, आलू, मटार) रसरशीत आणि खमंग लागण्याकरिता एक किंवा छोटी दोन वांगी वाफवून कुस्करून फोडणीत टाकावीत. भाज्या मसालेदार दिसतात, रंग छान येतो आणि तेल संपूर्ण वर येते.
- कुठलीही कोशिंबीर असो, ती जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोशिंबिरीत पोह्याचा थोडा चुरा किंवा पोहे टाकावेत. कोशिंबिरीला पाणी न सुटता ती जास्त वेळ टिकते आणि अजिबात वास येत नाही, कुठलाही कार्यक्रम, विशेषतः आता लग्नप्रसंगी विशेष उपयुक्त आहे.
- वांग्याचे भरीत करावयाचे असेल, तर वांगी भाजून घेतल्यावर श्रीखंडाच्या यंत्रातून काढून घ्यावे म्हणजे त्यात रेषा मुळीच राहत नाही. यामुळे खाताना छान वाटते.
- जुने मिरचीचे लोणचे काही दिवसांनंतर चवीमध्ये बदलते. अशा वेळी त्या मिरच्या लागेल तेव्हा थोड्याशा तळून घ्याव्यात. खमंग लागतात, भेळ-मिसळीबरोबर चांगल्या लागतात.
हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
- काकडी चोचविण्यासाठी खमंग काकडी किंवा काकडीच्या कोशिंबिरीसाठी काकडीचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवावेत. एकदा चमच्याने फिरवून (खाली-वर करून) पुन्हा मिक्सर चालू करावा. झटपट सुंदर काम होते. (मिक्सरचे लहान किंवा मोठे भांडे चालू शकते) मुळा आणि गाजराच्या कोशिंबिरीसाठीही असाच उपयोग वेळ आणि कष्ट वाचवितो.
- हिरव्या मिरच्या ताज्या बघितल्या की, मराठी माणसाला मिरचीचा खर्डा/ठेचा आठवतो. पण बऱ्याचशा लोकांना तो तिखटपणामुळे खाता येत नाही. अशा वेळी ठेचा करताना हिरव्या मिरच्या थोड्याशा घेऊन बाकीच्या कोवळ्या गवारीच्या शेंगा घ्याव्यात आणि तेलावर परतून मीठ-लसूण घालून ठेचा केल्यास तिखटपणा कमी होऊन भरपूर खाता येईल.


