आज down/up केलं लोकलसाठी. म्हणजे ठाकुर्लीला चढून, कल्याणकडे जाणाऱ्या गाडीत बसून परतीचा प्रवास केला. थोडा वेळ जास्त जातो, पण हमखास बसून प्रवासाची खात्री असते. वाचायला छान वेळ मिळतो… मुंबईचा प्रवास असला की, मी बऱ्याचदा ही पद्धत अवलंबतो. बरेच असे प्रवासी असतात माझ्यासारखे. अर्थात, शिरस्त्याप्रमाणे मुलुंड किंवा भांडुपला आपण उभं राहून दुसऱ्याला जागा देऊन थोडा परोपकार पण करायचा असतो, तोही मी नियमितपणे करतो. शिणलेले सगळेच असतात! थोडा वेळ बसायला जागा मिळाली की, सगळ्यांनाच बरं वाटतं, तेवढंच.
आज मला मस्त खिडकीची जागा मिळाली. समोर एक पस्तिशीचा तरुण बसला होता. कपाळावर छान चंदनाचा टिळा होता. बॅगा वगैरे रॅकवर ठेवून आम्ही स्थानापन्न झालो… त्याने खिशातून एक कसलंतरी स्तोत्रांचं पुस्तक काढलं… शिस्तीत ते कपाळाला लावून वंदन केलं आणि भक्तिभावाने ते पुटपुटत वाचण्यात गुंग होऊन गेला. ठाकुर्लीहून कल्याणला पोहोचायला साधारण सात-आठ मिनिटं लागतात, तेवढ्या वेळात त्याची त्या छोटेखानी पुस्तकाची दोन-तीन तरी पारायणं झाली असतील…
मी सुद्धा पुस्तक वाचत होतो, पण मधे मधे उगाचच त्याच्याकडे लक्ष जात होतं, का कोणास ठाऊक? कल्याणला गाडी पाचएक मिनिटं थांबते, तशी थांबून निघाली. त्याची स्तोत्र वाचनाची पाटी टाकून झाली होती बहुतेक! पुस्तक घडी घालून शर्टाच्या खिशात गेलं आणि मोबाइल नामक राक्षस हातात आला… पापक्षालन झालं होतं, त्यामुळे तो निवांतला होता. आम्ही मुंबईला जाताना डाव्या बाजूला बसलो होतो. गाडी ठाकुर्लीला आली. माणसं चढली. आता गर्दी वाढत जाणार होती पुढे…
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
ठाकुर्ली आणि डोंबिवलीच्या मधे डोंबिवलीचं ग्रामदैवत म्हणजे गणपती मंदिर दिसतं. समोरच्यानं अगदी लीन होऊन नमस्कार केला गणरायाला. बरेच जण करतात. मीही केला. प्रसन्न वाटतं, ते छान देऊळ आणि त्याचा सुबक कळस दिसला की… डोंबिवली सुटल्यावर स्वामीनारायण मंदिर दिसतं. उजवा हात कपाळावर आणि ओठावर असं करत त्या देवळाला द्रुतगती नमस्कार झाला, डोळे मिटून… हा दुसरा नमस्कार आणि मग मात्र येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या देवळाला, अगदी शेंदूर फासलेल्या दगडाला सुद्धा नमस्कार घडायला लागला…
त्याला मार्गातला प्रत्येक देव आणि देऊळ ठाऊक होतं बहुतेक! मुंब्रा आल्यावर लांब डोंगरावर दिसणाऱ्या देवळाला नमस्कार झाला. मी चकित होऊन बघत होतो…
एका देवाला भक्तिभावाने केलेला प्रणाम त्याला पुरत नव्हता. वाटेतल्या प्रत्येक देवाला द्रुतगती नमस्कार करून तो अधिकचं पुण्य गाठीशी बांधायचा केविलवाणा प्रयास करत होता. एकदा वाटलं हटकावं त्याला, पण आवर घातला मनाला. उगाचच दुसऱ्याच्या खासगी गोष्टीत आपण का ढवळाढवळ करा, म्हणून गप्प बसलो.
हे असे नमुने हल्ली जागोजाग, अगदी रस्त्याने चालताना सुद्धा दिसतात. हा मानसिक रोग की, सतत जाणवणाऱ्या असुरक्षिततेला काडीचा आधार?
हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस
भाव असावा मनात, पण त्याचा हा असा अनिर्बंध अतिरेक झाला की, पाचपोच सुटतो आणि प्रतिक्षिप्त क्रियेसारखा, दिसला देव की घाल नमस्कार अशी वेडगळ परिस्थिती उद्भवते. कुठेतरी बांध हवाच याला. गरज असली तर, मानसोपचार घ्यायला लागला तरी हरकत नाही! पण हे असं विक्षिप्त वागणं थांबायला हवं मुळातच.
विक्रोळी येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. विक्रोळीला महाशय उतरले आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. माझ्या पुस्तकात मी मान आणि मन खुपसलं आणि वाचनात गढून गेलो, घडलेला घटनाक्रम विसरायचा प्रामाणिक प्रयत्न करत…


