आपल्या ऋतुचर्या मालिकेतील सहावा आणि शेवटचा ऋतू म्हणजे हेमंत वा हिवाळा. हा वर्षातील सर्वात आल्हाददायक काळ आहे.
महिने : भारतात हिवाळ्याची सुरुवात हेमंत ऋतूच्या प्रारंभापासून होते आणि जानेवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी संक्रांतीने संपते. हिंदू कॅलेंडर लक्षात घेता, मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यांत हेमंत ऋतू येतो, ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ते ऑक्टोबरच्या मध्यापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत हाऋतू असतो.
ऋतू वर्णन
शीतेअग्र्यं, वृष्तिघर्मेअल्पंबलं, मध्यंतुशेषयो: ||
हवेत हळूहळू पण लक्षणीय गारवा येत असल्याने, हेमंत ऋतू थंड सकाळ आणि संध्याकाळी उशिरा थंडगार वातावरण घेऊन येतो. यजुर्वेदात ‘दवाचा ऋतू’ म्हणून उल्लेख केलेला हा काळ. सूर्याचे शक्तिशाली किरण कमी होऊ लागतात आणि दिवस थोडे उबदार असताना राखाडी रंगाचे ढग येतात. रात्री फुलणाऱ्या चमेलीचा किंवा रातराणीचा हवेतील गोड सुगंध तुम्हाला हवाहवासा वाटतो. हेमंत ऋतू हा संध्याकाळी बाहेर फेरफटका मारण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे.
ऋतू आणि दोष
हेमंत ऋतू दरम्यान पचनशक्ती (अग्नी) सगळ्यात जास्त असते, त्यासोबत वातदोष वाढवलेला असतो आणि शरीराला एक भरीव तसेच पौष्टिक आणि वातशामक आहार आवश्यक असतो.
हेही वाचा – Ayurveda : वर्षा ऋतुचर्या
हेमंत ऋतूतील योग्य आहार
- हेमंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळात, तुम्हाला आतून ऊब देणारे पदार्थ खावेत.
- हिवाळ्यात वेलची, जिरे, ओरेगॅनो, लवंगा आणि हळद या औषधी वनस्पती आणि मसाले यांचा वापर करावा.
- हिवाळ्यातील पाककृतींमध्ये गोड, आंबट आणि खारट चवींवर भर दिला पाहिजे.
- योग्य भाज्या : बीट, गाजर, शतावरी आणि रताळे, मेथी, पालक इत्यादी हिरव्या पालेभाज्या तसेच फुलकोबी आणि भोपळा या भाज्यांचा वापर करावा.
- हिवाळ्यातील रात्रीचे जेवण करण्याची सर्वोत्तम वेळ झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी असते आणि ते दिवसाच्या इतर जेवणांपेक्षा हलके असावे.
- काळे हरभरे, मका आणि तांदूळ यांचा उपयोग करावा.
- चिमूटभर वेलचीसह हळदीचे दूध पिणे फायदेशीर असते.
- काजू, बदाम, अक्रोड आणि मनुका यासारखे ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हेमंत ऋतूमध्ये शरीरातील ऊब राखण्यासाठी मदत होऊ शकते.
- Cold pressed तिळाच्या तेलाचे सेवन केल्याने वातदोष कमी होण्यास मदत होते.
- तुळशीच्या पानांसह आले घातलेला चहा हाही आरोग्यदायी आहे.
- या ऋतूमध्ये पचनशक्ती सर्वात शक्तिशाली असते. म्हणूनच, दही, चीज, लोणी, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ खाण्यासाठी हा सर्वोत्तम ऋतू आहे.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, एक चमचा च्यवनप्राश नक्कीच घ्यावा.
- दैनंदिन आहारात गायीचे तूप समाविष्ट केले तर, ते वातदोष संतुलित करण्यास मदत करू शकते.
- कडू, कोरडे, थंड आणि मसालेदार अन्न टाळा कारण ते वातदोष वाढवतात.
हेमंत ऋतूतील योग्य विहार
हिवाळ्यात बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी जीवनशैलीतील काही बदल मदत करू शकता.
- हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते तेव्हा त्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, योग्य औषधी तेल कोमट करून त्वचेला लावू शकता.
- स्नानासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
- आठवड्यातून दोनदा डोक्याला मालिश करा आणि दररोज मोहरीच्या तेलाने पायांना मालिश करा.
- निरोगी जीवनासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा.
- हिवाळ्यात दुपारी झोपणे टाळा.
हेही वाचा – Ayurveda : ग्रीष्म ऋतुचर्या
ऋतूसंधी (The junction period between two seasons )
आपण सहा ऋतूंमध्ये आपल्या आहारात विहारात योग्य बदल करून आपले आरोग्य कसे उत्तम ठेवायचे ते पाहिले, परंतु हे बदल हळूहळू करायचे असतात. दोन ऋतूंच्या मधील काळास ऋतूसंधी म्हणतात.
ऋत्वोरन्त्यादिसप्ताहावृतुसन्धिरिति स्मृतः|
तत्र पूर्वो विधिस्त्याज्यः सेवनीयोऽपरः क्रमात् ||
आधीच्या ऋतूतील शेवटचे सात दिवस आणि येणाऱ्या ऋतूतील पहिले सात दिवस यांना एकत्रितपणे ऋतू संधी म्हणतात. अशाप्रकारे, ऋतू संधी हा 14 दिवसांचा कालावधी असतो.
ऋतू संधी काळात मागील ऋतूतील आहार पद्धती, जीवनशैली, वर्तन यासारख्या पद्धती हळूहळू कमी कराव्यात आणि त्याचवेळी हळूहळू येणाऱ्या ऋतूतील आहार, जीवनशैली आणि वर्तन पद्धतींशी जुळवून घेण्यास सुरुवात करावी.
पण हे करण्याची आवश्यकता काय?
असात्म्यजा हि रोगाः स्युः सहसा त्यागशीलनात् ||
एखादी गोष्ट अचानक खंडित करणे किंवा अचानक नवीन गोष्ट सुरू करणे, यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. कोणत्याही गोष्टीचा सराव करणे आणि अचानक सोडून देणे योग्य नाही, दोन्ही प्रक्रिया हळूहळू केल्यानेच फायदा होतो.
ऋतुसंधीची संख्या
- वसंत-ग्रीष्म दरम्यानचा कालावधी
- ग्रीष्म-वर्षा दरम्यानचा कालावधी
- वर्षा-शरद दरम्यानचा कालावधी
- शरद-हेमंत दरम्यानचा कालावधी
- हेमंत-शिशिर दरम्यानचा कालावधी
- शिशिर-वसंत दरम्यानचा कालावधी
असे एकूण सहा ऋतू संधी काळ आहेत. ऋतुसंधीचे फायदे ऋतुसंधीचे ज्ञान आपल्याला येणाऱ्या ऋतूशी लवकर जुळवून घेण्यास मदत करते. आपल्याला अन्न, जीवनशैली आणि वर्तनाशी संबंधित मागील ऋतूच्या सवयी सोडून देण्यास आणि येणाऱ्या ऋतूतील आहार, जीवनशैली आणि वर्तनाशी संबंधित सवयी आचरणात आणण्यास मदत होते. आपल्याला अनेक ऋतू बदलामुळे होणार्या विकारांपासून बचाव करण्यास सहाय्य करते.


