ती श्रीमंताघरची लेक तिच्या आईच्या सोबतीने हुरडा पार्टीसाठी सोलापूरमध्ये त्यांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांकडे उतरली होती. सोलापूर परिसरातील फार्मवर मस्त हुरडा पार्टी पार पडली. त्यानंतर सर्वांनी मिळून देवदर्शन केले. असा साग्रसंगीत पाहुणचार करणाऱ्या त्या नातेवाईकांना एक बाब सतत खटकत होती… शेवटी एक दिवस न राहवून त्यांनी मुलीच्या आईला तो खटकणारा प्रश्न विचारलाच, “तुमची कन्या कशातच इंटरेस्ट दाखवत नाहीय. आमच्याकडून पाहुणचारात काही चूक होत असेल तर प्लीज तसं सांगा.”
त्यावर मुलीची आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “तुमचा पाहुणचार तर अगदी दृष्ट लागेल असा आहे. पण माझ्या मुलीचं नशीबच खोटं आहे. त्या बिचारीला पहिल्या प्रेमातच अपयश आलं आहे. त्यामुळे ती अशी उदास असते.”
हे ऐकल्यावर त्या नातेवाईकांना लगेच माझी आठवण झाली. त्यांनी त्या आईला विचारलं की, “याक्षणी तुमच्याकडे मुलीची जन्मपत्रिका आहे का?”
हेही वाचा – ही वाट एकटीची…
सुदैवाने आईच्या स्मार्टफोनमध्ये मुलीची पत्रिका सेव्ह केलेली होती. मग ताबडतोब त्या नातेवाईकांनी मला फोन करुन भेटीची वेळ ठरवली. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या बंगल्यावर हजर झालो. तिथे प्रशस्त हॉलमध्ये ती मुलगी आणि तिची आई एका सोफ्यावर बसल्या होत्या. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसल्यावर तिच्या आईने मला तिची पत्रिका दाखवली. पत्रिकेत पंचम स्थानात असलेला चंद्र दूषित झालेला होता. त्यामुळे प्रेमप्रकरणात अपयश येणार हे जवळपास निश्चित होते. चंद्राचा मानवी भावनांवर प्रभाव असतो. त्यामुळेच तिचे भावविश्व पूर्ण उद्ध्वस्त झालेले असण्याची शक्यता होती. अर्थात, या सगळ्या गोष्टी लगेच तिला सांगण्यात अर्थ नव्हता. त्याआधी तिला वेगळ्या पद्धतीने समजावणे अतिशय आवश्यक होते.
मी तिच्या आईला म्हटलं की, “तिच्या पत्रिकेप्रमाणे ती भविष्यात लग्न करुन सुखाने संसार करेल.” माझं वक्तव्य ऐकल्यावर तिने एकदम चमकून माझ्याकडे बघितलं व ती म्हणाली, “तुम्ही म्हणताय ते कधीच शक्य नाही. पहिलं प्रेम आयुष्यात एकदाच होत असतं.”
मी किंचित हसून म्हणालो, “जेव्हा तू जन्माला आलीस, तेव्हा तुला पहिलं प्रेम तुझ्या आई-वडिलांनी दिलं आहे. त्यानंतर तुझे भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शिक्षक असं दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं प्रेम तुला मिळत गेलं आहे. तू विसाव्या वर्षी ज्या तरुणाच्या प्रेमात पडली होतीस, ते तुझं सहावं प्रेम होतं. या सहाव्या प्रेमात अपयश आल्यावर तू आधीच्या तुझ्या जिवाभावाच्या माणसांचं प्रेम विसरून आयुष्य उधळून टाकायला निघाली आहेस. हे असं वागणं योग्य आहे का याचा नीट विचार कर!”
“तू ज्याला पहिलं प्रेम म्हणत आहेस आणि ज्याच्यासाठी इतकी व्याकुळ झाली आहेस, ते प्रेम तर पहिल्या पावसासारखं असतं. दरवर्षीच मान्सून येत असतो आणि पहिला पाऊस पडत असतो. तृषार्त झालेली पृथ्वी तृप्त होऊन तिचा सुगंधाने सारा आसमंत दरवळून टाकत असते. निरपेक्ष, कायम टिकणारं, शाश्वत असं प्रेम फक्त आई-वडील हेच त्यांच्या मुलांवर करत असतात. इतर सर्व प्रेमांत काही ना काही स्वार्थ दडलेला असतो.”
ती माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते की, तिला माझे म्हणणे पटलेले आहे. पण ती कमालीची हट्टी होती, असं तिच्या पत्रिकेवरुन मला जाणवलं होतं. त्या हटवादीपणामुळे ती म्हणाली की, “पण मी त्याला विसरू शकत नाही.”
मी म्हणालो, “तू एका श्रीमंत घरात जन्माला आलीस, हे तुझे सुदैव आणि दुर्दैव असे दोन्ही आहे. सुदैव अशासाठी की, लहानपणापासून तू म्हणशील ती वस्तू तुला मिळत गेली आहे. त्यामुळे आता तू “नाही” हा शब्दच ऐकू शकत नाहीस, हे तुझे दुर्दैव आहे. म्हणून तू त्या तरुणाचा नकार सहन करु शकली नाहीस. तुझे खरे दुःख प्रेमभंग हे नसून त्याने तुला स्पष्टपणे नाकारले हे आहे.”
माझे बोलणे संपता संपता आषाढातील आभाळासारखे तिचे डोळे भरून आले आणि ती हमसाहमशी रडायला लागली. तिची आई तिचं सांत्वन करण्यासाठी सरसावली, पण मी तिला इशारा करुन जागीच रोखले. त्या क्षणी तिला मनसोक्त रडू देणं, हे फार महत्त्वाचं होतं. अश्रूंमध्ये फार मोठी ताकद असते. सर्व दुःख, वेदना, अपमानाची जाणीव, अपेक्षाभंगाचं शल्य हे अश्रूंवाटे निघून जात असतं. ती बराच वेळ रडल्यानंतर काहीशी शांत झाली. मग हलकेच डोळे पुसून मला म्हणाली, “तुम्ही म्हणता ते सगळं अगदी खरं आहे, पण आता मला कशातच आनंद वाटत नाहीय.”
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…
मी तिला समजावलं, “तू आनंद हा माणसांमध्ये शोधत आहेस, म्हणून तुला तो गवसत नाहीय. आनंद हा माणसांमध्ये कधीच शोधायचा नसतो. आनंद नेहमी निसर्गात आणि स्वतःच्या आवडत्या छंदात, पसंतीच्या कामात मिळत असतो. आनंद हा आत्मगौरवात, आत्मसन्मानात मिळत असतो. आपल्याला आवडणारे काम, आपले कर्तव्य सातत्याने करत राहिल्यानेच आत्मसन्मानाची प्राप्ती होत असते.”
माझे बोलणे ऐकून पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली.
ती प्रसन्नपणे हसून मला म्हणाली, “तुम्ही माझ्या जीवनाला ग्रासलेला अंधार दूर करून मला प्रकाशाची वाट दाखवलीत. मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही.”
मग मी तिला आणि तिच्या आईला तिच्या जन्मपत्रिकेतील बिघडलेल्या पंचम स्थानाची आणि त्या स्थानात दूषित झालेल्या चंद्राची सविस्तर माहिती दिली. त्यावर असलेले उपाय त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले. त्या दोघींनी माझे पुन्हा पुन्हा आभार मानले.
मग तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी समाधानाने तिथून बाहेर पडलो.


