वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक ॥28॥ जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें ॥29॥ तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो । म्हणोनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥30॥ परि अनुवादलो मीं प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें ॥31॥ तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे | परि निवृत्तिकृपादीपउजियेडें । देखेन मी ॥32॥ जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥33॥ ना तरी धातुवादाही न जोडे । ते लोहींचि पंधरें सापडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥34॥ तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणऊनि ते अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥35॥ तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचे रूप दावीन । अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥36॥ आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥37॥ म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आतां ॥ 38॥
हेही वाचा – Dnyaneshwari : कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसें तान्हेलिया तोय सेविजे…
अर्थ
ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार आणि स्वर्ग हे ओवाळून टाकले आहे, त्यांच्यावाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजू शकत नाहीत. ॥28॥ ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही, आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे, ॥29॥ त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानांना तर हे अनोळखीचे ठिकाण आहे. म्हणून पाहा, याविषयी फार बोलण्याचे कारण नाही. ॥30॥ परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतानी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले, ते सांगतो. ॥31॥ ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचित सांगता येईल; तरीपण माझे गुरु निवृत्तिनाथ, यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन. ॥32॥ जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर, जे दृष्टीला दिसत नाही, ते डोळ्यांशिवाय पाहता येते. ॥33॥ दैववशात परीस जर हाताला येईल तर, किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. ॥34॥ त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा होईल तर, प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावर ती (कृपा) अलोट आहे. ॥35॥ त्या सद्गुरूकृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन आणि माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. जरी ते (ब्रह्म) इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी, त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल, असे मी करीन. ॥36॥ ऐका; यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा उच्चप्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात ॥37॥ म्हणून ज्यास भगवंत म्हणतात आणि जो सर्वसंग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे, तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता तू पूर्ण लक्ष दे. ॥38॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें…


