वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवति कश्चन ॥2॥
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जे जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥52॥ जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥53॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥3॥
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥54॥ येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे असनाचिये पाउलवाटे । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥55॥ मग प्रत्याहाराचा आधाडा । बुद्धीचियाहि पाया निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥56॥ तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळे । नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥57॥ ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव ॥58॥ मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीचि हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥59॥ जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे ॥60॥ येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयांचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइकें ॥61॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जें दिठीही न पविजे, तें दिठीविण देखिजे…
अर्थ
अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे, असे जाण. ज्याचा (कर्मफलाविषयीचा) संकल्प सुटला नाही, असा कोणीही (मनुष्य) योगी होत नाही. ॥2॥
ऐक जो संन्यासी आहे तोच योगी आहे, अशी आपली एकवाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले; ॥52॥ ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो, त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व (ब्रह्म) प्राप्त होते, असे हे ज्याला अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे (तोच संन्यासी आणि तोच योगी होय). ॥53॥
योग प्राप्त व्हावा, अशी इच्छा करणार्या मुनीला कर्म हे साधन आहे, असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन आहे, असे सांगितले. ॥3॥
अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल, त्याने या कर्ममार्गरूपी पायर्यास चुकू नये. ॥54॥ तो या यमनियमरूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने, प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. ॥55॥ नंतर प्रत्याहाररूपी तुटलेला कडा लागतो, त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. ॥56॥ तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणार्या प्रात्याहाररूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी (घोरपडीसारखी) हळूहळू चिकटेल (आणि याप्रमाणे) चढावयास आश्रय मिळेल. ॥57॥ याप्रमाणे प्राण आणि अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. ॥58॥ मग त्या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयची आहे, अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमधे ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य आणि साधन यातील भेद नाहीसा होतो, ॥59॥ ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ति बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहाते. ॥60॥ या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला, त्याची चिन्हे तुला स्पष्ट करून सांगतो, ऐक. ॥61॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आइकें सकळ संमते जगीं, अर्जुना गा तोचि योगी…


