अध्याय आठवा
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः । तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥14॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥15॥
जे विषयांसि तीळांजळी देऊनि । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥124॥ परि भोगितया नाराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादिकां । कवण पाडू ॥125॥ ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजसी लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ॥126॥ तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥127॥ पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंतीं धांवां गा धांवां म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धांवणे । काय न घडे मज ॥128॥ आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥129॥ तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा । तो आभारुही जीवा । साहवेचि ना ॥130॥ तें ऋणवैपण देखोनि आंगी । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचिया तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥131॥ देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सकुमारा । म्हणोनि आत्मबोधाचां पांजिरां । सूयें तयांतें ॥132॥ वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली । ऐसेनि नित्यबुद्धि संचली । मी आणीं तयातें ॥133॥ म्हणोनि देहांतींचें सांकडें । माझिया कहींचि न पडे । मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥134॥ वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥135॥ आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं । म्हणऊनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥136॥ नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपयातें न्यावें । हेंही नाहीं स्वभावें । जे आधीचि मज मीनले ॥137॥
हेही वाचा – Dnyaneshwari : चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें…
अर्थ
पार्था, जो सतत अनन्यचित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, त्या (माझ्याशी) निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सुलभच आहे. ॥14॥
(ही) श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना मजप्रत आल्यानंतर, दु:खाचे आगर असलेला आणि नश्वर असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ॥15॥
जे विषयांना तिलांजली देऊन, प्रवृत्तीला बेडी घालून (निरोधून) मला अंत:करणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात ॥124॥ परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी, त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक आणि तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे? ॥125॥ अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंत:करणाने मला चिकटले, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ॥126॥ ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर, त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली? ॥127॥ जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने मला, देवा धावा हो धावा, असे म्हणाला तर, त्याच्या संकटासमयी मी धावत नाही काय? ॥128॥ आणि भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल, तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरिता करावयाचा? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. ॥129॥ त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी, त्य़ावेळेला स्मरण करताच मी पावावे, एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. ॥130॥ तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून, त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरिता मी भक्तांच्या देह पडण्याच्यावेळी त्यांची सेवाचाकरी करतो. ॥131॥ देहान्तसमयीच्या व्याकुळतेचा संबंध कदाचित् माझ्या सुकुमार भक्ताला लागेल, म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजर्यात ठेवतो. ॥132॥ शिवाय, आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त्त आणि थंडगार अशी सावली, ती त्या पिंजर्यावर मी करतो. अशा तर्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. ॥133॥ म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पाडता आणतो. ॥134॥ आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून, अहंकाररूपी वरवर असणारी धूळ झाडून, शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन, त्या भक्ताचे (मी) आपल्याशी ऐक्य करतो. ॥135॥ आणि भक्तांना तरी देहात असताना देखील, विशेषत: देहतादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना त्यात (देहाचा) वियोग असा वाटत नाही. ॥136॥ अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे (म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे), असे करावे लागत नाही, कारण ते (भक्त) आधीच मला सहज मिळालेले असतात. ॥137॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे…


