जवळपास दोनएक महिन्यांपूर्वीच गोष्ट. शनिवार होता आणि दुपारच्या वेळेस ऑफिसला चाललो होतो. सुट्टीच्या दिवशी दुपारी, हक्काची वामकुक्षी सोडून ऑफिसला जाणं म्हणणे फारच जीवावर येणारं काम… पण जायला हवंच होतं. निघालो होतो, अनिच्छेनेच! ठाकुर्ली स्टेशनला गाडी मिळाली. अगदी तुरळक माणसं होती गाडीला. माझ्याच डब्यात स. वा. जोशी शाळेची चार-पाच मुलं चढली. हल्ली अशी बरीच मुलं रोज लोकलने दिव्याहून डोंबिवलीपर्यंत प्रवास करून शाळेत येतात. बेसुमार आणि अनियंत्रित वाढ झालेल्या अन् ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या, दिवा नावाच्या बकाल गावात असलेली सुविधांची वानवा, हे मुख्य कारण!
या मुलांमुळेच आज जोशी शाळेची धुगधुगी अजूनही टिकून आहे. अन्यथा, इंग्रजी माध्यमाच्या दबावाखाली, कित्येक सुदृढ पिढ्या घडवलेली ही शाळा कधीच इतिहासजमा झाली असती. प्रथम वर्गाच्या डब्यात चढलेली ही पाचवी-सहावीतली मुलं, माझ्यासमोरच येऊन बसली. मुलांच्या बालसुलभ गप्पा सुरू होत्या आणि गाडीला अजिबात गर्दी नसल्याने, त्या मला अगदी सहज ऐकू येत होत्या. पुस्तकातलं माझं लक्ष साहजिकच त्यांच्याकडे वळलं. मी पुस्तक मिटलं आणि ऐकू लागलो त्यांच्या सुरस गप्पा…
मी बसलो होतो तिथेच बाजूला, सारस्वत बँकेची ‘कार लोन’ची जाहिरात डकवलेली होती. त्यात दोन उच्च श्रेणीच्या गाड्या आणि कर्जाशी संबंधित इतर माहितीसुद्धा होती. ती जाहिरात बघून त्यांची चर्चा या गाड्यांकडे वळली आणि त्यांच्यातला एक काळा सावळा, चुणचुणीत मुलगा म्हणून गेला, “मी मोठा झाल्यावर, ती काळी गाडी आहे ना, तशी गाडी घेणार.”
“गपरे तू, काय पण बोलू नकोस!” बाकीच्या मुलांचा त्याच्यावर हल्ला.
पण तो परत ठासून म्हणाला, “नाय! मी घेणार म्हणजे घेणार.”
आत्तापर्यंत श्रवणभक्ती करत असलेला मी, त्यांच्या संवादात हलकेच सहभागी झालो आणि म्हणालो त्याला, “अरे, महाग असतात या गाड्या. परवडत नाहीत त्या आपल्याला. खूप पैसे कमवावे लागतात, अशी गाडी घेण्यासाठी.”
हेही वाचा – पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!
“काका, मी खूप शिकेन, मेहनत करेन… पण तशी गाडी मी घेणार म्हणजे घेणार!”
एवढ्या लहान वयातलं ते सुस्पष्ट लक्ष्य मला आवडून गेलं.
आमच्या लहानपणी, मी डॉक्टर होणार किंवा मी इंजिनीअर होणार, यापुढे जाऊन असं पोपटाच्या डोळ्यासारखं लक्ष्य ठेवण्याची आमची कुवतच नव्हती, किंवा कोणाचीही तेवढी दूरदृष्टीही नव्हती! स्वतःला कुठे जायचंय, ते आत्ताच ठरवून ठेवणारा तो नव्या पिढीतील मुलगा, आवडून गेला मला एकदम… त्याच्या बोलक्या डोळ्यांमधली चमक मोहवणारी होती, लक्षवेधी होती आणि जाणवत होती ती मला, त्याच्याकडे बघताना.
मी वाचत असलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर रतन टाटा आणि सायरस मिस्त्री या दोघांचे फोटो होते. मी सहजच विचारलं मुलांना, “ठाऊक आहेत का, कोण आहेत हे?”
इतर मुलं शांत, हा एक तेवढा म्हणाला, “ते चष्मेवाले कोण ते नाही माहीत, पण ते दुसरे रतन टाटा आहेत, नॅनो गाडीवाले.” माझ्या शाबासकीची थाप आपसूक गेली त्याच्या पाठीवर. कौतुक वाटलं मला त्याचं अतोनात…
“ते दुसरे आहेत ते सायरस मिस्त्री, तुला नसतील ठाऊक, पण वाच त्यांच्याबद्दल, जमलं तर. आता हे दोघेही नाहीत या जगात.”
“काका, तुम्ही इंग्रजी पुस्तक वाचता, मला पण येईल वाचता?”
परत एकदा मला जाणवला सच्चेपणा त्याच्या स्वरात, जाणवली कळकळ आणि उमेद.
“येईल की, का नाही येणार? प्रयत्न केला की सगळं जमतं.”
खूश झाली स्वारी हे ऐकून आणि मस्त दिलखुलास हास्य अवतरलं त्याच्या चेहऱ्यावर… मलाही माझ्या नकळत हसू आलं.
ठाकुर्ली ते दिवा हा जेमतेम दहा मिनिटांचा प्रवास, पण आज दिव्याच्या आधी गाडी दोन-तीन मिनिटं थांबली होती आणि या उण्यापुऱ्या बारा-तेरा मिनिटांत, मला उद्या प्रकाशात येऊ पाहणारा एक हिरा, लख्ख चमचमताना दिसला होता.
हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…
दिवा स्टेशन आलं तेवढ्यात आणि ती मुलं पटापटा उठून उभी राहिली. मी भरभरून आशीर्वाद दिला त्या अनामिक, छोट्या दोस्ताला… ती मुलं गाडीतून उतरून गेली, माझ्या मनावर तरंग उमटवत.
खरंच, कशी असेल त्याची भविष्यातील वाटचाल? होईल तो मोठा आणि घेईल त्याच्या स्वप्नातली कार, का ‘गाडीच्या पायदानां’शी झुंजण्यात आयुष्य जाईल त्याचं? प्रश्न अनेक होते, पण उत्तर येणारा काळच देणार होता.
नव्या पिढीच्या, होतकरू बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते, हे मात्र वादातीत सत्य. खरोखर होत्या उद्याच्या आशा आणि उद्याची स्वप्नं, त्याच्या भिरभिणाऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये… या ओल्या मातीला आकार देणाऱ्या, कुशल कुंभाराची गरज होती फक्त!


