रस्त्याने चालत होतो… संध्याकाळची वेळ, हलकासा वारा… आणि मनात विचारांची गर्दी. अचानक वाटेत दोन जुने मित्र भेटले, दुःख आणि सुख… दोघेही माझ्याकडे बघून हसले. थोडं आश्चर्य वाटलं!
“कुठे चाललास?” त्यांनी विचारलं.
मी सहज म्हणालो, “बस, आयुष्यात थोडं पुढे चालत जातोय!”
दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, “आम्हालाही तुझ्यासोबत यायचं आहे.”
क्षणभर थांबलो. मनात विचार आला की, दुःख नकोच… फक्त सुख सोबत असलं तर किती छान होईल!
हेही वाचा – संध्याकाळ, समुद्र आणि ती…;
मी सुखाकडे पाहून म्हणालो, “तू चल माझ्यासोबत पण दुःखाला इथेच राहू दे.”
सुख हसला… आणि शांतपणे म्हणाला, “मी एकटा कधीच येत नाही. जिथे मी आहे, तिथे दुःख कुठेतरी आसपास असणारच!”
मी खूप समजावलं… खूप वेळ बोललो… पण सुख हट्टावर ठाम होतं.
शेवटी पर्याय नव्हता — मी दोघांनाही सोबत घेतलं.
प्रवास सुरू झाला…
पहिल्या काही दिवसांत दुःख वारंवार माझ्या खांद्यावर हात ठेवायचं… कधी शांतपणे, कधी जरा जडपणे. कधी राग यायचा, कधी उदास वाटायचं… पण त्याच वेळी सुख कधी हसून, कधी एखाद्या छोट्या क्षणातून मला हलकं करायचं!
हेही वाचा – तेरे बिना जिया जाए ना…!
हळूहळू मला कळायला लागलं —
दुःख मला मजबूत करत होतं…
आणि सुख मला जगायला शिकवत होतं…
आता जाणवतंय की, जर त्या दिवशी मी दुःखाला तिथेच सोडलं असतं, तर कदाचित मला सुखाची खरी चवच कळलीच नसती.
आता आम्ही तिघेही सोबत चालतो… दुःख कधी पुढे, कधी मागे… सुख कधी उजवीकडे, कधी डावीकडे…
आणि मी?
मी फक्त चालत राहतो… कारण मला कळलंय की, जीवनाचा खरा अर्थ हा दोघांना स्वीकारण्यातच आहे.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


