Saturday, June 14, 2025
Homeफिल्मीभावास पाठबळ... सावत्रपणा पुसून टाकला

भावास पाठबळ… सावत्रपणा पुसून टाकला

उमा सुहास काळे

आपल्या जन्मदात्या वडिलांच्या वंशात न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच मायपित्यासोबत राहणाऱ्या सावत्र  भावास आपल्याच वडिलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का? नाही ना?

पण एक माणूस होता असा, गिरीश कर्नाड त्याचं नाव.

गिरीश कर्नाड यांच्या मातोश्री किशोरीविधवा होत्या. कृष्णाबाई त्यांचं नाव. घरी त्यांना कुट्टाबाई म्हणत असत. तितक्या अल्पवयातही पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगा झाला होता. पतीच्या निधनानंतर काही काळ खचलेल्या कृष्णाबाईंना पुन्हा उभारी घेणं सोपं नव्हतं. पण थोड्याच दिवसांत त्यांनी स्वतःला सावरलं! कर्मठ कुटुंबात जन्मास येऊनही त्यांनी पुनर्विवाह करायचं ठरवलं. त्याकाळी असं धाडस करणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. त्या पेशाने नर्स होत्या आणि त्यांना ज्यांच्यासोबत पुनर्विवाह करायचा होता ते रघुनाथ कर्नाड हे डॉक्टर होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं.

पण कृष्णाबाईंना खात्री वाटत नव्हती की, हा माणूस आपल्यासारख्या विधवेशी लग्न करेल किंवा नाही? खरंतर त्या प्रेमासोबतच आसरा शोधत होत्या. त्यांचं मत एकवेळ ग्राह्य धरता येत होतं, पण रघुनाथ यांना समाज काय म्हणेल, याची भीती होतीच.

शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्याआधी ते दोघं पाच वर्षे एकत्र राहत होते. त्या काळी असा निर्णय घेणं, हे देखील मोठ्या धाडसाचं काम होतं. शेवटी त्यांनी लग्न केलं. तेव्हा तो विषय खूप चर्चेचा झाला होता.

हेही वाचा – बाप… हा बापमाणूसच असतो

समाजात कृष्णाबाई आणि रघुनाथ यांच्याविषयी काहीबाही बोललं जात होतं. तेव्हा कृष्णाबाईंचा पहिला मुलगा आठ-नऊ वर्षांचा होता. त्या सर्व चर्चा, सगळं बरंवाईट त्याच्या कानावर येत होतं. ते ऐकून त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा विचार करवत नाही.

कृष्णाबाई आणि रघुनाथ यांच्या पोटी गिरीश यांचा जन्म झाला. आपल्या पहिल्या मुलाची हकीकत मात्या-पित्यांनी गिरीश यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तोही आपलाच सख्खा भाऊ आहे, असे गिरीश यांना वाटायचं! हा समज अनेक वर्षे तसाच दृढ राहिला. गिरीश यांच्या मातोश्रींनी वयाच्या 82व्या वर्षी आपली कहाणी लिहिली, तेव्हा त्यांना त्याविषयी समजले. मात्र त्यामुळे ते विचलित झाले नाहीत की, त्यांना त्याचे दुःखही वाटले नाही की, दृष्टीकोनही बदलला नाही.

खरा प्रश्न निर्माण झाला तो त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर. कारण तेव्हा लोक म्हणू लागले की, गिरीश यांच्या मोठ्या भावाला वडिलांना अग्नी देण्याचा अधिकार नाही. कारण तो त्यांचा मुलगा नाही. तो गिरीश यांनाच देता येईल किंवा त्यांच्या मधल्या भावाला देता येईल. गावाला हरकत असली तरी, गिरीश कर्नाड यांना मात्र त्याचं वावडं नव्हतं. कारण तो सावत्र भाऊही जन्मभर कर्नाड हेच नाव लावत होता. त्यामुळे त्या सावत्र भावाला आपल्या वडिलांचे नाव लावण्याचा अधिकार तसेच अग्निसंस्काराचा हक्क मिळावा यासाठी गिरीश कर्नाड यांनी समाजाशी संघर्ष केला आणि नाव मिळवून दिलं!

हेही वाचा – सदाफुली… आयुष्यातील सुख

गिरीश कर्नाडांच्या विद्रोहात, बंडखोरीत आणि परखडपणात कारणीभूत असणारा त्यांचा इतिहास कमालीचा टोकदार आहे. त्यांच्या प्रतिभाशाली साहित्यकृतीतून याची सार्थ अनुभूती येते.

गिरीश कर्नाड यांच्या ‘नागमंडल’ नाटकामधून समोर येणारे तत्व विलक्षण क्रांतिकारक होतं. स्त्रीच्या शोषणावर फोकस करणाऱ्या या नाटकातून ‘स्त्रीचा खरा पती कोण?’ या प्रश्नाचा खिळा ते प्रेक्षकांच्या मस्तकात ठोकतात, हे मान्य. पण प्रत्यक्षात हे नाटक लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर जन्मदात्या आईचा दुःखद भूतकाळ आला असेल तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील नाही का!

गिरीश कर्नाड यांना जेव्हा पुत्ररत्न प्राप्ती झाली तेव्हा त्यांनी वडिलांच्या स्मृती जागवल्या आणि त्याचं नाव ठेवलं, ‘रघु’! रघु कर्नाड!!

गिरीश कर्नाड गेले त्यास 10 जून रोजी सहा वर्षे झाली. आजही त्यांच्या कलाकृती नवा आयाम बहाल करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!