उमा सुहास काळे
आपल्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने संगीत, गाणी यांचा समावेश हा असतोच असतो. खूप आनंद झालेला असो की, मन काहीसं उदास असो, या दोन्ही विरोधाभासी गोष्टींना सावरून घेतं, तोलून धरतं ते संगीत. काही जटील समस्या असली तरी, रामबाण उपाय म्हणजे सगळं काही विसरून संगीतात तल्लीन होणं. जीवनात कितीही समस्या येवोत, त्या काही प्रमाणात कमी करणं, त्यावर उतारा मिळवून देण्याची ताकद या संगीतात असते, हे नक्की.
काही गोष्टी अशा असतात की, त्या घेणाऱ्याइतकाच आनंद, किंबहुना त्याहूनही जास्त आनंद हा देणाऱ्यालाच होतो. कुठलाही चांगला पदार्थ हा खाणाऱ्याइतकाच आनंद खिलवणाऱ्याच्या सुगरणवृत्तीला पण होतो. संगीताचं देखील तसंच. ते ऐकवणाऱ्याला तर आनंद मिळतोच, पण जास्त आनंद हा ऐकणाराच घेऊन जातो.
खरंच संगीतात एक अनोखी जादू आहे. रुग्णालयातसुद्धा संगीत थेरपीचा खूप छान फायदा होतो, असं आढळून आलंय. या संगीताचा लाभ आपल्याला अनेक दिग्गज गायकांनी मिळवून दिला आहे. याशिवाय, गाण्याच्या विविध प्रकारांचे सुद्धा आपल्या आयुष्यात खूप मोलाचं स्थान आहे. व्यक्तीसापेक्ष यातील आवडी-निवडीमध्ये फरक पडू शकतो… कुणाला भावगीत, कुणाला शास्त्रीय संगीत, कुणाला सुगम संगीत, कुणाला हिंदी तर कुणाला मराठी, कुणाला सोलो तर कुणाला ड्युएट गाणी आवडतात; पण संगीत, गाणी आवडत नसलेली व्यक्ती तर बहुदा सापडायचीच नाही.
माणूस एकटा असतानाही त्याला त्याचे एकटेपणा जाणवू न देण्याची किमया या संगीतात आहे. खूपदा गाणी इतकी अर्थपूर्ण असतात की, अगदी मोजक्या शब्दांत खूप मोठा आशय सांगून जातात. आपण मनापासून केलेली आर्त आळवणी याच भक्तीगीतांमार्फत परमेश्वराकडे पोहोचतात, अशी आपली श्रद्धा असते. प्रत्यक्ष बोलून सांगण्याची हिम्मत नसलेले आपले मनोगत बहुतेक प्रेमवीर या प्रेमगीतांद्वारेच योग्य जागी पोहोचवण्याची जादू साधतात. खचलेल्या मनाला उभारी देण्याची ताकद या संगीतामध्ये असते. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचं तसंच रुग्णांना संजीवनी म्हणूनही संगीत उपयोगात येतं.
हेही वाचा – आपणच आपल्याशी शर्यत करावी…
अगदी उजाडता उजाडता ऐकावीशी वाटतात ती सकाळची भक्तीगीतं, भूपाळ्या… खूप आनंद झालेला असताना पटकन आठवतात, ती उडत्या चालीची गाणी… कठीण प्रसंगी जीवनाचे सार शिकविणारी अर्थपूर्ण गंभीर गाणी… संगीत आपलं अवघं जीवनच मुळी सुरेल बनवितात.
आज 24 मे, मजरूह सुलतानपुरी यांचा स्मृतिदिन. पन्नास वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिलीत. 1945च्या सुमारास, ते एका मुशायरात भाग घेण्यासाठी मुंबईला आले होते आणि त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते कारदार यांनी आपल्या शाहजहान या नवीन चित्रपटासाठी त्यांना गाणी लिहिण्याची संधी दिली. या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक कुंदनलाल सहगल यांनी गायली आहेत. ‘गम दिए मुस्तकील’ आणि ‘जब दिल ही टूट गया’ ही गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. त्याचे संगीतकार होते नौशाद. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली सीआयडी, चलती का नाम गाडी, नौ-दो ग्यारह, तीसरी मंझिल, पेइंग गेस्ट, काला पानी, तुम सा नही देखा, दिल देखे देखो, दिल्ली का ठग अशा अनेक चित्रपटांतील गाणी लोकप्रिय झाली. 1994मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना 1980मध्ये गालिब पुरस्कार आणि 1992मध्ये इक्बाल पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा – पुढे जायचं तर जुनं मागे टाकावंच लागेल!
कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर यामधील प्रचंड लोकप्रिय झालेली गाणी आठवताना आपल्याला आठवतात अमीरखान, जुही चावला आणि आयेशा जुल्का, पण ही लोकप्रिय गीतं नेमकी कोणी लिहिलीत हे फार कमी लोक जाणून घेऊ इच्छितात. या चमकत्या क्षेत्रात फ्रंटफूटवरील कलाकारांकडे जास्त लक्ष जातं, त्यामानाने बॅकफूटवरील कलाकारांना फार कमी लोक ओळखतात. या स्मृतीदिनी प्रतिभावान गीतकार, शायर मजरूह सुलतानपुरी यांना आदरांजली.