सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥118॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् । कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥9॥
चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली ॥119॥ मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥120॥ जैशीं जवळिकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें । मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥121॥ तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणीं । बोधेंचि मिरवी ॥122॥ जैसें सूर्ये सूर्यातें वोवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें । नातरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ ॥123॥ तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥124॥ तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें । मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों ॥125॥ पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥126॥ जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें । दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥127॥ तैसेनि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत । मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥128॥ ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें । केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं ॥129॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें
अर्थ
जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे, असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे, असे निश्चित समज. ॥118॥
माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे (म्हणून जे मद्रूप झाले) आणि माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत (म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत) असे (ते ज्ञानी) परस्परांना (माझ्याविषयी) ज्ञान देत आणि नित्य माझे (माझ्या गुणांचे) वर्णन करीत समाधान पावतात आणि आनंदात मग्न होतात. ॥9॥
अंत:करणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात आणि अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्ममरणाला विसरतात. ॥119॥ मग त्या ज्ञानाच्या मदाने, प्रश्नोत्तररूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात. आता ते एकमेकांस ज्ञानच देतात आणि घेतात ॥120॥ ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता, त्यांचे पाणी उसळून एकमेकांत मिसळते, अशा स्थितीत लाटांत लाटांचीच घरे होतात ॥121॥ त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता, आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते, अशा स्थितीत बोध बोधानेच बोधांचे अलंकार मिरवतो. ॥122॥ ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे, किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिळावेत ॥123॥ (प्रयागास जसा गंगा आणि यमुना यांचा संगम होतो) तसा तेथे (म्हणजे भक्ताला भक्त जेव्हा भेटतात तेव्हा) ऐक्यरसाचा संगम होतो आणि त्या ऐक्यरसाच्या पुरावर अष्टसात्विक भावांचे पुराड तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. ॥124॥ तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर धावत येऊन (देहतादात्म्य टाकून) माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. ॥125॥ गुरु आणि शिष्य हे उपदेशाकरिता एकांत स्थळी जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा (ॐ संज्ञक ब्रह्माचा) उपदेश करतात, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात. ॥126॥ ज्याप्रमाणे पूर्ण उमलेली कमळाची कळी, ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तर ती राजास अथवा गरीबास सुवासाची (सारखीच) मेजवानी देते ॥127॥ त्याप्रमाणेच (हे भक्त) सर्व जगात माझे वर्णन करीत असतात आणि त्या वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात आणि त्या विसरामध्ये अंगाने आणि जीवाने विरतात. ॥128॥ याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे, त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस अथवा रात्र याचे भान राहिलेले नसते. ॥129॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न


